सध्या द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये कमी-अधिक पाऊस पडत आहे. अवेळी पावसामुळे वाढीच्या विविध अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये रोगांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन कॅनोपी व्यवस्थापन करताना पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा.
पावसामुळे बागेतील आर्द्रता वाढली असून काडीवर कॅनॉपीही जास्त प्रमाणात तयार झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पाऊस आणखी काही दिवस राहिला तर घड कुजण्याची समस्या दिसून येईल. लवकर फळछाटणी झालेल्या बागांमध्ये द्राक्ष घड वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत दिसून येत आहेत. या बागांमध्ये सध्याच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बागेत मोकळी कॅनोपी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. सर्वसामान्यपणे दाट कॅनोपीमध्ये रोगकारक घटकांची वेगाने वाढ होते व त्याचा प्रसार घडापर्यंत होतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक काडी सुटसुटीत राहील याकडे लक्ष द्यावे. काड्या तारेवर बांधून घ्याव्यात. काडीवर निघालेल्या बगलफुटीसुद्धा काढून घ्याव्यात. त्याचबरोबर काडीच्या तळातील ३ ते ४ पाने काढून दोन फांद्या दरम्यान योग्य अंतर ठेवले तर वेलीमध्ये योग्य हवा परिसंचरण होईल. त्यामुळे फवारणीचे कव्हरेज पूर्ण कॅनोपीमध्ये होईल. सूर्यप्रकाश प्रत्येक भागाला मिळाल्यामुळे रोगांच्या प्रसारास आळा घालता येईल. पानाच्या पृष्ठभागावर बुरशीनाशक, धूळ किंवा स्टीकरचा लेप तयार होऊ देऊ नये. पाने निरोगी व रोगमुक्त ठेवावीत. रासायनिक नियंत्रण भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी,
फळछाटणीनंतर ४० दिवसांच्या अवस्थेतील बागांमध्ये ट्रायअझोल गटातील हेक्साकोनॅझोल किंवा डायफेनोकोनॅझोल किंवा टेट्राकोनॅझोल १ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. फळछाटणीनंतर ३० ते ३५ दिवसांच्या अवस्थेतील बागांमध्ये डायमेथोमॉर्फ किंवा मॅंडीप्रोपॅमाइड १ ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलीकार्ब अधिक प्रॉपिनेब (संयुक्त बुरशीनाशक) २.२५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. केवडा रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या बागेत अमिसलब्रोम १५० मिलि प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर मेट्राफेनॉन १ ग्रॅम प्रति लिटर किंवा सायफ्लुफेनामाईड ५०० मिलि प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी असेल तर जैव नियंत्रक जसे ट्रायकोडर्मा २ ग्रॅम आणि अँपिलोमायसिस ३ ते ४ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. - डॉ. सुजोय साहा, ८९७४०३६७४७ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)