सद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध प्रकार हे सर्व बाहेरील देशांमधून आलेले आहेत. भारतामध्ये, पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल आणि पांढरा गर व पिवळी साल इत्यादी प्रकार लागवडीस उपयुक्त आहेत. विविध कृषी संशोधन संस्थांमार्फत फळांच्या जातींबाबत संशोधन चालू आहे. ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग कुळातील महत्त्वपूर्ण फळ पीक आहे. फळ आकर्षक व सुंदर आहे. प्रामुख्याने साल आणि गराच्या रंगानुसार फळाचे प्रकार पडतात. भारतामध्ये पांढरा गर व लाल साल असणाऱ्या प्रजातीची जास्त प्रमाणात लागवड झाली आहे, त्याचबरोबर लाल गर व लाल साल आणि पांढरा गर व पिवळी साल असलेल्या जातींची लागवड वाढत आहे. फळाचे महत्त्व
फळांमध्ये चांगल्या प्रमाणात पोषक तत्त्वे आणि रोगप्रतिकारक घटक आहेत. फळापासून जाम, ज्यूस, जेली, कँडी, सिरप, तसेच वाइन इत्यादी प्रक्रियायुक्त उत्पादने तयार होतात. फळाच्या सालीमध्ये उच्च प्रमाणात पेक्टिन असल्याने त्यांचा वापर फळ प्रक्रियेत जेलिंग एजंट म्हणून केला जातो. सालापासून खाद्य रंग तयार करतात. पानांचा आणि फुलांचा उपयोग परंपरागत हाइपोग्लाइसेमिक, मूत्रवर्धक एजंट, म्हणून केला जातो. जीवनसत्त्व ‘क’ आणि ‘ब’ तसेच फ्लावोनोइड्स सारखे विविध रोग प्रतिकारशक्ती असलेले घटक फळात असल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल व उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होते. फळामध्ये तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असल्याने हे पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. फळामध्ये खूप कमी प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीसाठी हे फळ उत्तम मानले जाते. फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शिअम सारखे खनिज पदार्थ अधिक प्रमाणात असतात, जे हाड आणि दातांच्या योग्य वाढीसाठी फायदेशीर आहेत. दृष्टी सुधारण्यासाठी फळांचा आहारात वापर महत्त्वाचा आहे. काळी, मुरमाड, कमी खोलीच्या जमिनीत लागवड शक्य. पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये योग्य ती काळजी घ्यावी. जेणेकरून खोडाभोवती जास्त प्रमाणात पाणी साठून राहणार नाही. जास्त पाणी साठल्याने खोड सडण्याचे प्रमाण वाढते. चांगल्या वाढीसाठी मातीचा सामू ५.५-६.५ योग्य मानला जातो. काही प्रमाणात आम्लयुक्त जमीन योग्य असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या भागात, जमिनीमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी साठून राहिले तर फूल आणि फळांची गळ होते. पिकासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. परंतु जास्तीत जास्त ४० अंश सेल्सिअस तापमानातही (थोड्या दिवसांकरिता) हे पीक तग धरू शकते. अति तापमान व सूर्यप्रकाश या पिकांस काही प्रमाणात हानिकारक ठरते. अशा परिस्थितीमध्ये सनबर्न व रोगाचे वाढते प्रमाण दिसून येते. यासाठी बागेमध्ये काही प्रमाणात सावली (२०-३० टक्के) ठेवल्याने झाडाचे संरक्षण करता येते. - विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि.पुणे )