आले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे निवड या बाबींवर लक्ष द्यावे. गेल्या हंगामात हरभरा, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य यांसारखी द्विदलवर्गीय पिके घेतलेली जमीन आले पिकासाठी उत्तम असते. या जमिनीत आले पिकाची वाढ जोमदार होते. लागवड पूर्वतयारीमुळे आल्याचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी फायदा होतो.
आले लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम भारी प्रकारची भुसभुशीत जमीन निवडावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ ते १ टक्का एवढे असल्यास ती जमीन उत्तम समजावी. पाणथळ, क्षारपड व चोपण जमीन निवडू नये. चुनखडीचे प्रमाण चार टक्यांपेक्षा जास्त असणारी जमीन अयोग्य समजावी. कारण अशा जमिनीमध्ये आले पिवळे पडून वाढ खुंटते. त्याकरिता जुन्या बंधाऱ्यातील गाळ जमिनीत मिसळावा.
गेल्या ३ ते ४ वर्षांत आले किंवा हळद लागवड न केलेली जमीन या वर्षीच्या आले लागवडीसाठी निवडावी. गेल्या हंगामात हरभरा, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य यांसारखी द्विदलवर्गीय पिके घेतलेली जमीन आले पिकासाठी उत्तम असते. या जमिनीत आले पिकाची वाढ जोमदार होते. गेल्या हंगामात ऊस, गहू, ज्वारी, मका यांसारखी एकदल वर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची वाढ मध्यम होते. अशा जमिनीत लागवडीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर ताग, धैंचा, चवळी यांसारखी हिरवळीची पिके फुलोऱ्यात गाडावीत किंवा सेंद्रिय खतांची मात्रा वाढवून द्यावी. त्यानंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी जमिनीचे माती परीक्षण करावे. जमिनीचा सामू ६ ते ८ या दरम्यान असावा. अत्यंत आम्ल किंवा विम्लधर्मीय जमिनीची निवड करू नये. निवडलेल्या जमिनीची खोल नांगरट सकाळच्या वेळी करावी. नांगरटी दरम्यान निघालेले हुमणी किंवा तत्सम हानिकारक किडींचे कोष पक्षी वेचून खातात. त्यामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण होते. नांगरटीनंतर १५ दिवस जमीन तापू द्यावे. नंतर एकरी दहा ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत वापरून कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन पाळ्या द्याव्यात. म्हणजे शेणखत मातीत चांगले मिसळले जाईल. त्यानंतर पुन्हा जमीन २० दिवस उन्हात तापू द्यावे, म्हणजे शेणखतातील हानिकारक बुरशी किंवा हुमणीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल. लागवड पूर्वी एक आठवडाभर अगोदर रोटाव्हेटरने रान भुसभुशीत करून ४ फूट अंतरावर गादीवाफे ट्रॅक्टरच्या साह्याने सोडावेत. त्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार १५० ते २०० फूट ठेवावी. म्हणजे पाणी व्यवस्थापन ठिबक किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीने करणे सोपे होते. लागवडीपूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादी वाफे फावडे किंवा दाताळ्याच्या सहायाने एक फूट उंचीचे करून सावरून घ्यावेत. म्हणजे जादा पावसात पाणी साचून कंद कूज होत नाही. तसेच कंद चांगला पोसण्यास वाव मिळतो. त्याकरिता गादीवाफ्याची तळाची रुंदी ४ फूट, माथा रुंदी ३.५ फूट व उंची १ फूट ठेवावी. गादी वाफे तयार करताना एकरी चांगले कुजलेले एक टन सेंद्रिय खत किंवा गांडूळखत, २०० किलो निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. कच्चे शेणखत गादीवाफ्यावर अजिबात वापरू नये. माती परीक्षणानुसार प्रतिहेक्टरी १२० किलो नत्र,७५ किलो स्फुरद ७५ किलो पालाश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळेस मातीत फेरस पाच किलो, झिंक चार किलो ही सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून द्यावीत. लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी भरणी करताना फेरस पाच किलो, झिंक चार किलो ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा उगवणीनंतर २ ते ३ समान हप्त्यांत विभागून द्यावी. माती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचन संचातून दिल्याने पिकाची वाढ चांगली होऊन खतांची बचत होते. प्रदेशानुसार शेतकरी माहीम किंवा सातारी, वरदा, सुप्रभा, व्यानाड, रिओ-डी-जानेरो, जमैका, मारन, औरंगाबाद, उदयपुरी, छत्तीसगड, गोध्रा, हिमाचल या जातींची लागवड करतात. त्यानुसार आपल्या भागात चांगली वाढणारी जात निवडावी. ताज्या आल्याची विक्री करावयाची असल्यास माहीम किंवा सातारी, औरंगाबाद, छत्तीसगड, गोध्रा, उदयपुरी या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या जाती निवडाव्यात. प्रक्रिया करावयाची असल्यास वरदा, सुप्रभा, वायनाड, रिओ-दि-जानिरो, जमैका, मारन यांसारख्या कमी तंतुमय जातींची लागवड करावी. लागवडीकरिता मागील वर्षी कंदकूज, कंदमाशीचा प्रादुर्भाव न झालेला क्षेत्रातील आले वेगळे काढून त्याचा बेणे म्हणून वापर करावा. बेणे म्हणून आले निवडताना पीक सुप्तावस्थेत असताना म्हणजेच साधारणतः १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान पाने पूर्णपणे गळून गेलेली असताना व सुप्तावस्थेनंतर अंकुरण न झालेल्या क्षेत्रामधील आले निवडावे. एक एकर क्षेत्रासाठी १० ते १२ क्विंटल बियाणे लागवडी पूर्व एक महिना अगोदर साठवून ठेवलेले असावे. संपर्क : अंकुश सोनावले ९४२०४८६५८७ (कृषी सहायक, नागठाणे, जि. सातारा)