नवीन रोपांना मातीची भर द्यावी. वाढीच्या टप्प्यात काठीचा आधार द्यावा. आळ्यामध्ये आच्छादन करावे. रोपांना आधार देताना रोपाची तंतूमुळे उघडी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
वन वृक्ष किंवा फळझाडांची लागवड पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात करणे गरजेचे आहे. सततचा पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी किंवा पावसाळ्यात उशिरा लागवड केल्यामुळे जमिनीचे तापमान कमी होऊन मुळे जमिनीत तग धरण्यास वेळ लागतो. उशिरा वृक्षारोपण केल्यास जमिनीतील पुरेसा ओलावा रोपांना मिळत नाही. वनरोपे, फळझाडे लावल्यानंतर बुंध्यात मातीची भर दिल्यास उबदारपणा वाढून जमिनीत पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे मुळे चांगली वाढतात. मातीची भर दिल्याने बुंध्यात पाणी साठत नाही. मात्र, हे करताना बुंध्याच्या जवळील माती काढताना शेजारी खड्डा पडतो, हे टाळावे. मातीची भर दिल्यामुळे रोपांच्या खोडास आधार मिळतो. पावसाळ्यात वाऱ्याबरोबर पावसाची झड येते. वेगवान वाऱ्यामुळे रोपे वाकतात. यासाठी एक मीटर उंचीच्या रोपांना एकेरी काठीचा आधार देऊन दोन ठिकाणी दोरीची सैल गाठ बांधावी. मात्र, आधाराची काठी रोपांच्या मुळाजवळ न खोचता रोपापासून सहा इंच अंतरावर थोडीशी तिरकी करून आधार द्यावा. कोणत्याही परिस्थितीत आधार देताना तंतूमुळे उघडी पडणार नाहीत याची काळजी घेऊन मातीची भर द्यावी. वनवृक्ष किंवा फळझाडांच्या बुध्यात प्लॅस्टिक आच्छादन करावे. गवताचेही आच्छादन फायदेशीर ठरते. आच्छादित गवत पावसाळ्यात कुजणे अपेक्षित आहे; अन्यथा उन्हाळ्या गवताच्या आच्छादनामुळे आगीचा धोका वाढतो. अाच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून रहातो. त्याचा रोपांना फायदा पावसाचा कालावधी संपल्यानंतर होतो. बागेच्या चारही बाजूस आग प्रतिबंधक पट्टे काढावेत. जेणेकरून वणवा बागेत येणार नाही. आग नियंत्रण करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी. संपर्क : ०२३५८-२४१०४८ (मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी.)