हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. हळद हे एक प्रमुख मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधने, जैविक किटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. महाराष्ट्रातील हवामान हळद पिकासाठी उत्तम आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. सध्या हळद लागवड होऊन १२० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हळदीची शाकीय वाढ पूर्ण होण्यासाठी ४६ ते १५० दिवसांचा कालावधी महत्त्वाचा असतो. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात तसेच नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते. पावसाळ्यात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते. याकाळातील २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान शाकीय वाढीसाठी पूरक ठरते. तापमानात जास्त घट झाल्यास हळद पिकांवर विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकारावर विपरीत परिणाम होतो. खत व्यवस्थापन हळद पिकास खतांमधील सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते.
हळद पिकांस हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी आणि नत्र २ समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी तर दुसरा हप्ता भरणीच्यावेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा. ज्या ठिकाणी अद्याप भरणी करायची राहिली आहे, तेथे तत्काळ मातीची भर देवून घ्यावी. आणि हेक्टरी २१५ किलो युरिया तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये (१२.५० किलो फेरस सल्फेट (हिराकस) आणि १० किलो झिंक सल्फेट आणि २ टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा. भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. माती परीक्षण केल्यानंतरच विद्राव्य खतांचा वापर करावा. फर्टिगेशनवेळी एखादा अन्नघटक शिफारशीत प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक दिला गेल्यास त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. उदा. नत्राचा पुरवठा जास्त झाल्यास शाकीय वाढ जास्त होते आणि हळद काडावरती जाते. हळद हे कंदवर्गीय पीक असल्याने जेवढे अधिक फुटवे येतील तेवढे कंदाचे वजन वाढते. परिणामी कंद मोठा होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरीक ॲसिड आणि पांढरे पोटॅश यांचा वापर करावा. जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा वेगवेगळी असते. पाणी व्यवस्थापन पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यामुळे मुळांना हवा (ऑक्सिजन) मिळण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून मलूल होतात. त्यासाठी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
सध्या पावसाचा कालावधी असल्याने वाकोज्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. ठिबकच्या दोन लॅटरमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ठेवावे. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. ठिबक सिंचनामुळे जमिनीत वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो, सूक्ष्मजीवांच्या क्रिया सुधारते, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारणक्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होऊन शोषण अधिक होते. तसेच कुरकुमीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. हिवाळ्यामध्ये दोन पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. पाऊस समाधानकारक झाला असल्यास, हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात. पिकांस शिफारशीत मात्रेपेक्षा कमी पाणी मिळाल्यास, कंदांची योग्य वाढ होत नाही. प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडून चमक घटते. तणवर्गीय वनस्पती विविध रोग-किडींसाठी यजमान म्हणून कार्य करतात. त्यामुळे पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे असते. लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने निंदणी करून घ्यावी. हळद उगवणीनंतर तणनाशकांचा वापर टाळावा. हळद उगवणीनंतर तणनाशकाची फवारणी केल्यामुळे पिकाच्या शारीरीक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तूर, एरंडी सारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये हळद पीक चांगले वाढते. आंतरपिके ही हळद पिकापेक्षा कमी उंच आणि जागा व्यापणारी असावीत. हळद लागवडीपासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरवात होते. हळकुंडे येणापूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते. आंतरपिकासाठी श्रावणी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग, मटकी या पिकांची निवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. -डॉ. मनोज माळी,९४०३७ ७३६१४ डॉ. दिलीप पेंडसे ...९७३०९१०२७२ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज जि.सांगली)