अन्न सुरक्षेसाठी आहार पद्धतीतील बदल आवश्‍यक

अन्न सुरक्षेसाठी आहार पद्धतीतील बदल आवश्‍यक
अन्न सुरक्षेसाठी आहार पद्धतीतील बदल आवश्‍यक

आपल्या आहार पद्धतीमध्ये बदल केल्यास कृषिक्षेत्रातील सध्याचे उत्पादनही सन २०५० मधील संभाव्य लोकसंख्येला पुरेसा पोषक आहार पुरवू शकेल, असे मत लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘इलेमेंटा, सायन्स ऑफ दि अँथ्रोपोसीन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी जागतिक आणि प्रादेशिक अन्नपुरवठ्याची स्थिती आणि त्यातून मिळू शकणारे पोषण उदा. कॅलरी, प्रोटिन्स आणि अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे यांचे विश्लेषण केले. या माहितीची सांगड जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अन्न पोषकता माहिती आणि चराऊ प्राण्यांच्या माहितीशी घालण्यात आली. सध्याच्या एकूण कृषी उत्पादनाचा विचार करता हे उत्पादन वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पुरेसे ठरेल का, याचाही विचार करण्यात आला. या अभ्यासामध्ये पीक उत्पादनातील वाढ गृहित न धरताना सध्याचे कृषी उत्पादन सन २०५० च्या ९.७ अब्ज या जागतिक लोकसंख्येला आरोग्यदायी अन्न पुरवू शकेल. मात्र, माणसांच्या आहारपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माणसांच्या आहारातील मांस आणि डेअरी उत्पादनांऐवजी वनस्पतीजन्य पर्यायांचा वापर वाढवण्याची गरज आहे. सध्या केवळ पशुआहारासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी मक्यासारखी पिकेही मानवी आहारामध्ये आणण्याची प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. त्याविषयी माहिती देताना लॅंकेस्टर पर्यावरण केंद्रातील प्रो. नीक हेविट यांनी सांगितले, की मानवी आहारातही उत्तम पोषण देणारी धान्ये प्राण्यांना देण्यामध्ये कोणताही फायदा दिसून येत नाही. उलट त्यामुळे मानवांसाठी उपलब्ध कॅलरी आणि प्रथिनांचा पुरवठा यावर परिणाम होऊ शकतो. जर, समाजाने नवे बदल स्वीकारले नाहीत आणि सध्याचे व्यवहार तसेच सुरू ठेवले, तर मात्र कृषी उत्पादनामध्ये २०५० पर्यंत ११९ टक्क्यांनी वाढ करण्याची वेळ येणार आहे.   मांस आणि डेअरी उद्योगांचीही वाढ गवते, कुरणे आणि तृणधान्याचे अवशेष यावर करण्याची गरज आहे. या उत्पादनांची गरज विविध प्रकारचा पोषक व पूरक आहार उपलब्ध होत नसलेल्या लोकांसाठी आहे. सध्या बहुतांश औद्योगिक मांस आणि डेअरी उद्योग हा सुमारे ३४ टक्के मानवी आहारासाठी उपयुक्त अशा धान्य पीक कॅलरीवर आधारित आहेत. थोडक्यात, मानवी आहारासाठी घटक प्राण्यांना खाऊ घालून, त्यांचे मांस खाणे हा दीर्घ आणि अधिक ऊर्जाखाऊ प्रकार ठरतो. वाया जाणाऱ्या अन्नघटक आणि अतिरिक्त वापर हे मुद्दे महत्त्वाचे असले, तरी संख्यात्मक पातळीवर विचार करता फारसे लक्षणीय ठरत नसल्याचे संशोधनामध्ये पुढे आले. माणसांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीमध्ये बदलांची गरज आहे. त्यातून प्रत्येकाला आरोग्यदायी आणि संतुलित आहार उपलब्ध होण्यास मदत होईल. मानवी आहारासाठी खाद्य आणि अखाद्य अन्नघटकांतील प्रथिने, जीवनसत्त्व अ, लोह, झिंक यांचाही मागोवा घेतला गेला. त्यातून या घटकांची कमतरता ही छुप्या भुकेचे खरे कारण असल्याचे लक्षात आले, असे प्रो. हेविट यांनी स्पष्ट केले.

लँकेस्टर पर्यावरण केंद्रातील इन्स्टिट्यूट फॉर सोशल फ्युचर्समधील प्रो. माईक बेर्नर्स -ली यांच्या मते, या विश्‍लेषणातून जैवइंधनाच्या निर्मितीसाठी फारच कमी संधी आहेत. सध्या एकूण खाद्य पिकांच्या सुमारे १६ टक्के भाग जैवइंधनाकडे वळवला जातो. बाजारपेठेमध्ये जैवइंधनाच्या निर्मितीसाठी मागणी वाढल्यास त्याचा ताण जागतिक अन्न प्रणालीवर नक्कीच होणार आहे. तंत्रज्ञानातील सुधारणा, अतिरिक्त जमीन वापर, कृषी पद्धती, हवामान बदल अशा विविध बदलांमुळे कृषी उत्पादनामध्ये होणारी वाढ किंवा घट या संशोधनामध्ये धरण्यात आलेली नाही. २०१३ या वर्षातील उत्पादनाची पातळी संशोधनासाठी ग्राह्य धरण्यात आली. सध्या जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कृषी उत्पादनामध्ये वाढ, वाया जाणारे अन्नघटक वाचवणे या मुद्द्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. मात्र, हे अधिक वाढलेले उत्पादन जर जैवइंधन किंवा पशुखाद्यासाठी वापरले गेले, तर त्याचा फारसा फायदा मानवांना होणार नाही. मानवतेच्या समोरील अन्नसुरक्षेच्या आव्हानामध्ये पर्यावरणावरील विपरीत परिणाम कमी करण्याचेही आव्हान समोर असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com