मत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा वेगळे असतात. माशांना नैसर्गिक निवासस्थानाचा अनुभव आणि उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून मत्स्यसंवर्धन तळ्याचे बांधकाम करावे. मत्स्य संवर्धन तळ्याचा आराखडा करण्यासाठी प्रथम मातीची गुणवत्ता, जागेचा भौगोलिक अभ्यास, पाणीपुरवठा स्रोत, मत्स्य पालनासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज व हेतुपूर्ण पद्धती याबाबतचे सर्वेक्षण अहवाल, मत्स्य संवर्धन तलाव खोदकामाचे नकाशे व रेखा चित्रांचा अभ्यास करावा. जमीन स्वच्छता जागेवर मोठे दगड, झाडेझुडपे आणि मुळे इत्यादी काढून टाकावे. जमिनीवर उतार असेल तर जमीन समतोल करावी. जमीन आराखडा जमिनीची स्वच्छता झाल्यावर नकाशे व आराखड्यानुसार मत्स्य संवर्धन तळ्याच्या बांधकामाची जमीन चुन्याच्या पावडरने चिन्हांकित करावी. खोदकाम तळ्याचा आकार मत्स्य संवर्धनाकरिता आयताकृती, चौकोनी, गोलाकार तळे खोदले जाते. आपल्याकडे आयताकृती तळी प्राधान्याने बांधली जातात. इतर तळ्यांच्या आकाराच्या तुलनेत आयताकृती तळ्यात मासे पकडण्याकरिता जाळे वापरणे सोईस्कर असते.
गोलाकार तळी बांधल्याने बाजूच्या उर्वरित जागेचा अपव्यय होतो. आयताकृती तळ्यामध्ये माशांना पोहण्यासाठी जास्तीची लांबी मिळते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाची भावना येते. आयताकृती तळ्यामध्ये मासे सहज पकडू शकतात. म्हणून तळ्याचा आकार हा आयताकृती असावा. चांगल्या व्यवस्थापनासाठी मत्स्य संवर्धन तळ्याचा आकार ०.४ ते १.० हेक्टर एवढा असावा. मत्स्यसंवर्धन तळ्याची खोली जैविक उत्पादन क्षमतेसाठी महत्त्वाची असते. तळ्यामध्ये प्रकाशसंश्लेषणाद्वारे प्लवंग निर्मिती होते. ते माशांचे खाद्य असतात. तळ्याची खोली जर कमी असेल तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचे तापमान वाढते. त्यामुळे पाण्यातील मासे तापमान वाढ, प्राणवायूच्या कमतरतेमुळे व तसेच पाण्यात जास्तीचे शेवाळ वाढून मरण्याची शक्यता असते. तळ्याची खोली जास्त असेल तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. खूप कमी प्रमाणात प्लवंग निर्मिती होते. प्रकाश संश्लेषण आणि चांगले मत्स्य उत्पादन मिळण्यासाठी पाणी आणि तलावाची खोली शास्त्रीयदृष्ट्या योग्य असावी. मत्स्य संवर्धन तळ्याची खोली २ ते २.५ मीटरपर्यंत ठेवतात. मत्स्य संवर्धन तळ्याचे खोदकाम करण्यापूर्वी त्या जागेच्या वरचा १ ते १.५ फूट मातीचा थर वेगळा काढून घ्यावा. कारण ती माती सुपीक, पोषक व मत्स्योत्पादनासाठी अनुकूल असते. तलावाचे खोदकाम झाल्यानंतर ती माती तळ्याच्या तळाला पसरवून त्याची दबई करून घ्यावी. पाण्याच्या मार्गावर बंधारा घालून तयार केलेल्या मत्स्य संवर्धन तळ्याचे काळजीपूर्वक संरक्षण करावे. जलाशयाला पाण्याचा गळती मार्ग बांधल्यामुळे पाणी तळ्याच्या तटबंदीच्या वरून ओसंडून वाहत नाही. पाण्याचा गळती मार्गामधून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे तळ्याच्या मातीची धूप होऊ नये याची काळजी घ्यावी. मत्स्य संवर्धन तळ्याची तटबंदी
तटबंदी स्थिर व पाण्याने घट्ट झालेली असावी. तटबंदीच्या वरची रुंदी २ मीटर असावी. तटबंदीवरुन वाहनांसाठी रस्ता बांधावयाचा असल्यास त्याची रुंदी कमीत कमी ४.५ मीटर ठेवावी. लहान तळ्यासाठी पाणी भरल्यानंतर किमान ०.३ मीटर रिकामा फलक (Freeboard) ठेवावा. मोठ्या तळ्यांसाठी तो ०.५ मीटर ठेवावा. तटबंदीचा उतार हा तटबंदीमध्ये भरलेल्या मातीच्या स्थिरतेवर अवलंबून असतो. भरलेल्या मातीची अधिक स्थिरता म्हणजे उभारलेल्या बाजूचा उतार. समाधानकारक पायामध्ये जाड अभेद्य व एकत्रित चिकण मातीचा थर असतो. जमिनीच्या पृष्ठभागावर जर मातीचा योग्य थर असेल तर ती माती काढून तटबंदीसाठी वापरावी. बांधकाम करताना मुळे, फांद्या व इतर सेंद्रिय घटक काढावेत. कारण सेंद्रिय घटक सडून पोकळी तयार होते. त्यामुळे पाणी झिरपते. क्षारपड जमीन टाळावी.वाळू व कुजून तयार झालेल्या मातीचा तटबंदी बांधण्यासाठी वापर करू नये. साधारणपणे तळे खोदताना मिळणाऱ्या मातीपासून तटबंदी बांधतात. स्थानिक पातळीवर चांगली माती उपलब्ध नसल्यास चिकण मातीचा (गाभा) किंवा चिखलाचा (गाभा) चा वापर करून तटबंदी जलरोधक करावी. पाणी घेण्याकरिता जलवाहिनीची व्यवस्था
मत्स्य संवर्धन तलावामध्ये पाणी घेण्याचा व्यवस्थेमुळे आवश्यक व नियंत्रित पाणीपुरवठा होतो. तसेच अनुपयोगी माशांच्या प्रवेशास प्रतिबंध करता येतो. तळ्यामध्ये खात्रीशीर व नियंत्रणात पाणीपुरवठा होण्यासाठी एखादा सिमेंटचा नाला बांधावा किंवा जलवाहिनीकरून घ्यावी. तळ्यात पाणी जाण्याआधी गाळण्यासाठी जाळी बसवावी. जेणेकरून कीटक, बेडूक, मत्स्यबीज भक्षक मासे व इतर कचरा तळ्यात येणार नाही. तळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्था
आपल्या इच्छेनुसार तळ्यातील पाणी बदलण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी व्यवस्था असावी. अशी व्यवस्था असल्यास मत्स्यसंवर्धनाची पूर्वतयारी करताना तळे कोरडे करण्यासाठी तसेच तळ्यातील घाण पाणी काढून टाकण्यासाठी सोपे होते. तटबंदीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी पाणी निचरा करणारी जलवाहिनीचे काम करावे. जलवाहिनीचे स्थान आणि लांबी आराखड्यानुसार तयार करावी. तळ्यामध्ये पाण्याचा निचरा करण्याच्या जलवाहिनीकडे थोडासा उतार असावा, जेणेकरून पाणी पूर्णपणे निघून जाते. पाण्याचा निचरा करण्यासाठी पाइप तळ्याच्या बुडाला असावा. तळ्यामध्ये माशांची भरघोस वाढ होण्यासाठी खाद्य व रसायनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे पाण्यामध्ये जास्तीची घाण व माशांची विष्ठा तयार होऊन पाण्याची गुणवत्ता खालावते. पाण्याच्या या गुणवत्तेमुळे माशांना रोग होऊ शकतो. मासे मरू शकतात. अशा वेळेस पाणी बदलणे बंधनकारक ठरते. जर पाणी निचरा करण्यासाठी पाइपलाइनची व्यवस्था असेल तर आपले काम सोईस्कर होते. विक्रीसाठी पूर्णतः मासे पकडण्यासाठी पाणी निचरा करण्याच्या जलवाहिनीमुळे पाणी कमी करून मासे सहज पकडता येतात. - अभिनव वायचळकर ९९२३३३९३१७, (सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, धारणी, जि. अमरावती) - सय्यद हामजा सय्यद सैदोद्दीन, ८०८७८४६६०४, (सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, नंदुरबार)