गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी करून आणि पुरवठा साखळी सुधारून भारतीय उत्पादनांना अधिक स्पर्धात्मक बनविण्यात मदत करणार आहे. यातून आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. लोकसंख्या आणि नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता पाहता भारतामध्ये कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये चांगली वाढ होणे शक्य आहे. विकसित अर्थव्यवस्थेच्या मॉडेलची भारतात पुनरावृत्ती होऊ शकत नाही. भारतामध्ये कृषी, फलोत्पादन, अन्न प्रक्रिया आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल अशा मॉडेलची गरज आहे. यातून २०२५ पर्यंत भारताची अन्न प्रक्रिया बाजारपेठेतील उलाढाल ४७० अब्ज डॉलर्सवर पोहोचू शकते. एकात्मिक काढणीपश्चात व्यवस्थापन सुविधांची गरज
स्थानिक अन्न व्यवस्थेमध्ये अन्नाचे उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वितरण, किरकोळ विक्री, खाद्यपदार्थांचा वापर आणि कचरा व्यवस्थापन यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची गरज. शाश्वत अन्न प्रणाली विकसित करण्याची गरज. सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रातील मजबूत आणि सहाय्यक पायाभूत सुविधांवर भर द्यावा लागणार आहे. गोदाम सुविधा, प्रक्रिया यंत्रणा, रस्ते, रेल्वे वाहतूक आणि शिपिंग सुविधा हे पायाभूत सुविधांचे अविभाज्य भाग आहेत. सरकारने आतापर्यंत ४१ मेगा फूड पार्कला मान्यता दिली आहे. ३५३ कोल्ड चेन प्रकल्प, ६३ कृषी प्रक्रिया क्लस्टर, २९२ अन्न प्रक्रिया युनिट, ६३ बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज प्रकल्पांची निर्मिती झाली आहे. याशिवाय देशभरातील सहा ऑपरेशन ग्रीन प्रकल्पांना प्रधानमंत्री किसान संपर्क योजना (PMKSY) च्या संबंधित घटक योजनांच्या अंतर्गत मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे एनएचबी, अपेडा,राज्य कृषी विपणन बोर्ड आणि खासगी क्षेत्राच्या माध्यमातून देशात एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधांची उभारणी झालेली आहे. पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅनमध्ये विविध क्षेत्रांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सर्व पायाभूत सुविधा एकत्र करणे आवश्यक आहे. १०० लाख कोटी रुपयांचा राष्ट्रीय पायाभूत सुविधा मास्टर प्लॅन संपूर्ण पायाभूत सुविधांचा पाया बनणार आहे.यातून आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. ही योजना स्थानिक उत्पादकांना संधी देणारी आहे. देशभरातील प्रमुख कृषी अन्न उत्पादक समूहांना जोडणारी ही योजना रोजगारवाढीला चालना देणारी आहे. पायाभूत सुविधांवर खर्च केलेला एक रुपया अर्थव्यवस्थेत २.५ च्या पटीत भर टाकतो. गतिशक्ती मास्टर प्लॅन अन्नप्रक्रिया व काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी फायदेशीर
देश आणि जगभरात उत्तम, कार्यक्षम मूल्यसाखळी तयार करणे, बळकट करण्यावर भर दिलेला आहे. अन्न मूल्य साखळी हे एक व्यावसायिक मॉडेल आहे. यामध्ये उत्पादक आणि कृषी उत्पादनांचे खरेदीदार इतर पुरवठा साखळीसोबत जोडले जातात. यातून उत्पादनांसाठी जास्तीत जास्त मूल्य तयार केले जाते. अन्नधान्य व्यवस्था मजबूत होईल. अन्नधान्य उत्पादन, सुधारित प्रक्रिया, वितरण आणि एकत्रीकरणात गुंतवणूक वाढेल. बाजार संधी तयार होतील. मास्टर प्लॅन भविष्यातील अन्न व्यवस्था योग्य, स्पर्धात्मक, वितरित आणि लवचिक असल्याची खात्री करण्यास मदत करेल. गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी करून आणि पुरवठा साखळी सुधारून भारतीय उत्पादनांना अधिक स्पर्धात्मक बनविण्यात मदत करणार आहे. स्थानिक अन्न पुरवठा साखळीला आधार देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्थानिक फूड हब तयार केल्यास उत्पादक समुदायाला त्यांची उत्पादन क्षमता वाढवता येईल. ताज्या अन्नधान्याची उत्पादनाची उपलब्धता वाढवता येईल. यामुळे व्यवसाय, संस्था आणि व्यक्तींसाठी स्थानिक अन्नधान्य खरेदी करणे सोपे होईल. विविध योजनांतर्गत तयार केलेल्या उपलब्ध पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण करताना आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करताना समग्र दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. एक मजबूत तपासणी यंत्रणेची निर्मिती, पारदर्शकता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. ही यंत्रणा शेतीमालाची निर्यात, प्रक्रिया, केलेले उत्पादन आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल.अन्न सुरक्षा हाताळणी योग्य पद्धतीने होईल. - विजयकुमार चोले, ९४२०४९६२६० (लेखक मिटकॉनचे माजी उपाध्यक्ष आहेत.)