जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योग आघाडीवर
रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी उच्च दर्जाची कोषनिर्मिती करून चांगला दर मिळवू लागले आहेत. मराठवाड्याने यात विशेष आघाडी घेतली आहे. नर्सरीपासून ते तुतीलागवड, चॉकी व रिलींग युनीट या टप्प्यापर्यंतचे तंत्रज्ञान वापरात आले आहे.
रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी उच्च दर्जाची कोषनिर्मिती करून चांगला दर मिळवू लागले आहेत. मराठवाड्याने यात विशेष आघाडी घेतली आहे. नर्सरीपासून ते तुतीलागवड, चॉकी व रिलींग युनीट या टप्प्यापर्यंतचे तंत्रज्ञान वापरात आले आहे. रेशीम विभागाचे मार्गदर्शन त्यांना लाभते आहे.
मागील पाच वर्षापांसून रेशीम शेती तंत्रज्ञानाबाबतीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर मागणी असलेल्या बायव्होल्टाईन या सुधारित रेशीम कीटक वाणाचा वापर राज्यात ९० ते १०० टक्के प्रमाणात होतो. कोष उत्पादनात देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. पारंपरिक व सर्वाधिक रेशीम कोषाचे उत्पादक असणाऱ्या कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकले आहे. यात मराठवाड्याने रेशीम शेतीने चांगली आघाडी घेतली आहे. औरंगाबाद येथील विभागीय रेशीम कार्यालयाचे त्यांना तंत्रज्ञान मार्गदर्शन मिळत आहे. महा रेशीम अभियान २०१७ पासून राबविण्यात येत असून असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.
असे आहे तंत्रज्ञान
सुधारित जातीचा वापर
पूर्वी एम-५, एस-३६, एस ५४ आदी तुतीच्या जाती उपयोगात आणल्या जायच्या. त्याचीं उत्पादकता २० ते ३० टन प्रति हेक्टर होती. आता व्ही-१ जातीचा वापर सुरू केल्याने उत्पादकता हेक्टरी ६० टन ते त्याहून जास्त मिळत आहे.
जातीचे फायदे
- पाल्याची प्रत अळयांच्या वाढीसाठी योग्य.
- चॉकीसाठीही योग्य जात
- पाला लवकर सुकत नाही.
- मुळे फुटण्याचे प्रमाण जास्त.
नर्सरी
पूर्वी कर्नाटक राज्यातून बेणे आणून जून-जुलैमध्ये लागवड व्हायची. त्यामध्ये वाहतुक खर्च एकरी १५ हजार रुपये लागायचा. उगवन क्षमता कमी असायची. आता शेतकऱ्यांनाच नर्सरीचे तंत्रज्ञान सांगण्यात आले आहे. त्यातून जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नर्सरीत लागवड होते. जूनच्या दरम्यान मुख्य शेतात पुनर्लागवड होते.
फायदे
- मुख्य शेतात लागवडीनंतर अडीच महिन्यांत पाला मिळायला सुरुवात. त्यामुळे सप्टेंबरच्या दरम्यान बॅच सुरू करून लवकर उत्पन्न सुरू होते.
- तुतीचा शेतातील पूर्णवाढीचा काळ कमी होऊन नर्सरीत विभागला जातो.
कीटक संगोपन गृह
- तीन लाख रुपये गुंतवणूकीत शास्त्रीय पध्दतीचे कीटक संगोपनगृह उभारता येते. त्यात तापमान, ‘स्पेसिंग’, वायुविजन, आर्द्रता, या बाबी नियंत्रित करता येतात.
- ६० बाय २२ किंवा ५० बाय २२ आकाराचे शेड, खाली कोबा, तीन फुटाची भिंत घेऊन हिरवी जाळी लावता येते. हंगामानुसार शेडमध्ये याप्रमाणे वातावरण ठेवता येते.
त्याचे फायदे
- शेडसाठीचा खर्च कमी होतो.
- रॅकवरील फांदी पद्धतीमुळे मजुरी खर्चात बचत
- एका वेळी जास्त अंडीपुंज घेणे शक्य.
- निर्जंतुकीकरण करणे सोपे
- तुती लागवड क्षेत्र वाढविणे शक्य
चॉकी
म्हैसूर येथे तीन महिन्याचे प्रशिक्षण देऊन चॉकीधारक तयार केले जात आहेत. त्यामुळे तापमान, आर्द्रता, वायुविजन, प्रकाश, ‘इनक्युबेशन’, ‘ब्लॅक बॉक्सिंग’, वाहतूक आदी बाबी काटेकोरपणे पालणे शक्य होत आहे.
फायदे
- कोष उत्पादकता वाढण्याच्या अनेक कारणांपैकी चॉकी व्यवस्थापन कारणीभूत.
- कोष निर्मितीचा कालावधी १० दिवसांनी कमी झाला.
- रेशीम उत्पादकांना कमी वेळेत योग्य तंत्राच्या आधारे चॉकी अळ्या घरपोच देणे शक्य झाले.
कोष उत्पादन व धागा
पूर्वी संकरित (क्रॉस ब्रीडर) वाणापासून प्रति १०० अंडीपुंज उत्पादन ४० ते ५० किलो मिळायचे. बायव्होल्टाइन वाणामुळे हेच उत्पादन ६० ते ८० किलो मिळते. तंत्रज्ञानामुळे जागतीक बाजारपेठेत जास्त दर असलेल्या एकहजार मीटरपेक्षा जास्त लांबीच्या धाग्याची निर्मिती शक्य होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा जास्त परतावा मिळतो. पारंपरिक वाणांपासूनच्या धाग्यांची लांबी ४५० मीटरपर्यंत मिळते.
कोष खरेदी व प्रक्रिया
- सध्या जालना, सोलापूर येथे कोष खरेदी विक्री केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेत
- बारामती, पूर्णा, पाचोड,जालना, जयसिंगपूर येथे कोष खरेदी केंद्रे
- त्यामुळे विक्रीसाठी अन्य राज्यात जाण्याची आवश्यकता नाही.
- उच्च प्रतीच्या रेशीम धागा निर्मितीसाठी जालना,भंडारा व सांगली येथे स्वयंचलित ‘रिलिंग मशिनरी’ चे युनिट. पैठणीसाठी आवश्यक चांगल्या प्रतीचे सूत महाराष्ट्रातच तयार होत आहे.
- कोषाला प्रति किलो ३०० रूपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास राज्य शासनाकडून प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्याची सुविधा
अर्थकारण
एक एकर तुती बागेवर आधारित २०० अंडीपुंजांचे संगोपन करता येते. व्यवस्थापन व कीटक संगोपनात सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यातून १५० ते १६० किलो कोषांचे उत्पादन होते. त्यास किलोला २५० रूपयांपासून ते कमाल ४५० रुपये दर मिळू शकतो. वर्षभरात सुमारे चार बॅचेस होतात. प्रति बॅच २१ ते ३० दिवसांत पूर्ण होते. रेशीम कोष उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे.
तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने मराठवाडा रेशीम क्रांतीच्या दिशेन वाटचाल करते आहे. या उद्योगाने शाश्वत उत्पन्नाचा मार्ग दाखवला आहे.
- दिलीप हाके ९९६०३९१२७२
(उपसंचालक रेशीम (मराठवाडा विभाग)
प्रादेशिक रेशीम कार्यालय, औरंगाबाद)
तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन चॉकी सेंटर सुरू केले. शेतकऱ्यांनाही दर्जेदार चॉकी देत आहे. या व्यवसायातून अर्थकारण सुधारले आहे.
- सुधाकर पवार
रूई, ता. गेवराई जि. बीड.
उन्हाळ्यात कीटक संगोपनगृहात ‘फॉगर्स’, ‘शॉवर्स’ यांचा वापर माझ्यासह गावातील अन्य रेशीम उत्पादक करतात. हिवाळ्यातही तापमान नियंत्रित करून उत्पादन घेणे शक्य होते.
- सुनील शिंदे ९४२१४२२५१६
(श्रीपत धामनगाव, ता. घनसावंगी जि. जालना)
फोटो गॅलरी
- 1 of 691
- ››