सोयाबीन- एरंड ठरली फायदेशीर पद्धती

परभणी जिल्ह्यातील अंबरवाडी (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन- एरंडी या पीकपद्धतीचा अंगीकार केला आहे. या पद्धतीचे गावातील क्षेत्र १०० ते १५० एकरांच्या पुढे आहे. यात एरंडीचे बीजोत्पादन घेतले जाते.
 castor crop
castor crop

परभणी जिल्ह्यातील अंबरवाडी (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन- एरंडी या पीकपद्धतीचा अंगीकार केला आहे. या पद्धतीचे गावातील क्षेत्र १०० ते १५० एकरांच्या पुढे आहे. यात एरंडीचे बीजोत्पादन घेतले जाते. व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर व जोखीम कमी करणारी ही पद्धत ठरल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत.  परभणी जिल्ह्यात जिंतूर या तालुका ठिकाणापासून सुमारे १५ किलोमीटरवर अंबरवाडी हे डोंगररांगांमध्ये वसलेले प्रमुख गाव आहे. शिवारातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. पैकी ८० टक्के माळरानाचे आहे. तीव्र उतारामुळे माळरानावरील माती वाहून जाते. ओढ्या- नाल्याकाठची जमीन मध्यम प्रकारची गाळाची आहे. गावाच्या उशाला पूर्णा नदीवरील येलदरी प्रकल्पाचा जलाशय आहे. त्यात मुबलक पाणीसाठा असल्यास शिवारातील ओढ्यानाल्यांमध्ये ‘बॅक वॉटर’ येते. त्याचा उपयोग सिंचनासाठी होतो. कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे.  सोयाबीन- एरंडी पद्धत उत्पन्नाची जोखीम करण्यासाठी येथील शेतकरी तूर- सोयाबीन पद्धतीचा वापर करीत. सलग सोयाबीनचे क्षेत्रही जास्त आहे. रब्बीत हरभरा घेतला जातो. परंतु हलक्या जमिनीत त्याचे चांगले उत्पादन मिळत नाही. तर किडी-रोगांमुळे तुरीचे समाधानकारक उत्पादन हाती लागत नाही. अशावेळी गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन- एरंडी पद्धतीचा हुकमी पर्याय सापडला. सुमारे आठ वर्षांत गावातील अधिक क्षेत्र या पद्धतीखाली आले.   पीक पद्धतीविषयी   अंबरवाडीचे सुरेश घुगे यांचे आजोळ असलेल्या सावरगाव मुंढे (जि. जालना) येथील शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत असत. तेथून पीक व्यवस्थापन व विक्री व्यवस्थेची माहिती घेत घुगे यांनी २०१२ मध्ये दोन एकरांत सोयाबीन- एरंडी पद्धतीने लावण केली. आपले अनुभव सांगताना घुगे म्हणतात, की दरवर्षी तीन ते पाच एकरांत हे क्षेत्र असते. सात जूनच्या आसपास सोयाबीनची लावण प्रत्येकी चार फुटांवर होते. जुलैच्या दरम्यान मधल्या चार फुटी पट्ट्यात प्रत्येकी एक ओळ या पद्धतीने एरंडी लावतो. एका खासगी बियाणे कंपनीसाठी एरंडीचे बीजोत्पादन करतो. सोयाबीन काढणी झाल्यानंतर मग पुढे एरंडीचे झाड उंच वाढत राहते. एरंडीला पाण्याची मात्र शाश्‍वती लागते असे घुगे यांनी सांगितले.  उत्पादन  घुगे सांगतात, की या पद्धतीत सोयाबीनच्या वाढीस मोकळी, हवेशीर जागा मिळते. मशागतीची कामे करणे सोपे होते. त्याचे एकरी १० क्विंटलपर्यंत, तर एरंडीच्या नर व मादी झाडांचे प्रत्येकी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळते. कंपनी विकल्या जाणाऱ्या एरंडीला क्विंटलला ८५०० रुपये तर यंदा नऊ हजार रुपये दर मिळाले. बाजार समितीत एरंडी विकल्यास चार हजार ते पाच हजार रुपये दर मिळतो. या पीक पद्धतीतून एकरी किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय उत्पादन खर्च खूप काही नसतो.   गावातही पीक पद्धतीचा प्रसार 

  • कंपनीकडून खरेदीची हमी असल्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांकडून या पद्धतीचा अंगीकार.
  • सन २०१७ मध्ये गावात १७५ एकरांवर तर २०२० मध्ये १७० एकरांवर एरंड लागवड.  
  • यंदा १२५ एकरांवर शेतकऱ्यांकडून नोंदणी.
  • जालना येथील कंपनीकडून बियाण्याचा पुरवठा. त्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी नोंदणी करावी लागते. 
  • एका पिशवीत दोन किलो मादी, तर ८०० ग्रॅम नर बियाणे असते. 
  • गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव पाहून जिंतूर, शेजारील हिंगोली जिल्ह्यातील काही गावे एरंडी लागवडीकडे वळले आहेत.
  • व्यवस्थापनातील बाबी 

  • जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत सोयाबीनच्या दोन ओळीतील अंतर चार फूट तर भारी जमिनीत पाच फूट.  
  • एरंडीच्या मादी बियाण्याच्या चार ओळीनंतर नर बियाण्याची एक ओळ.  
  • लागवडीसोबत एकरी २५ किलो १०-२६-२६ खताची मात्रा.  
  • सोयाबीन काढणीनंतर १०-२६-२६ , पोटॅश, सुपर फॉस्फेट या खतांच्या प्रत्येकी ५० किलो प्रति एकरी याप्रमाणे दहा दिवसाच्या अंतराने दोन मात्रा.  
  • ठिबक, तुषार सिंचन पद्धतीने पाणी. एरंडीचे पीक मार्च- एप्रिलपर्यंत चालते. जमिनीच्या प्रकारानुसार त्या कालावधीपर्यंत पाच ते सहा पाणीपाळ्या.   
  • ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये फुलोरा अवस्थेपूर्वी दर पंधरा दिवसांनी एरंडीच्या झाडाचे शेंडे खुडावे लागतात. त्यामुळे फळफांद्याची संख्या वाढते. शेंडे खुडतानाच अन्य वाणांची भेसळ आढळलेली झाडे काढून टाकली जातात.
  • वातावरणातील धुक्याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्यावेळची फुले तोडून टाकल्यास नुकसानीची पातळी कमी होते.
  • सलग सोयाबीन पद्धतीपेक्षा ही पध्दत आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असल्याचे शेतकरी सांगतात. या पद्धतीत सोयाबीनच्या दोन ओळीतील अंतर प्रचलित पद्धतीपेक्षा जास्त असते. त्यामुळे बियाण्याचे प्रमाण कमी लागते. झाडे विस्तारतात. अधिक शेंगा लागतात. 
  • काढणी हंगाम  काढणी हंगाम नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत चालतो. टप्प्याटप्प्याने परिपक्व घडांची काढणी होते. घड वाळवून साठवणूक तर एप्रिलमध्ये यंत्राद्वारे मळणी होते. सुरेश घुगे हे गावातील शेतकऱ्यांकडील एरंडीची काढणी ते विक्री तसेच ‘पेमेंट’चे काम करतात. व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती दिली जाते. एरंड साठवणीसाठी कंपनीकडून बारदानांचा पुरवठा होतो.  विक्रीची व्यवस्था... बियाणे कंपनीकडून मादी एरंडीची खरेदी होते. नर एरंडीची खरेदी गावातील व्यापारी करतात. सन २०१२ मध्ये मादी एरंडीस प्रति क्विंटल साडेसहा हजार रुपये तर नर एरंडीस तीन हजार रुपये दर मिळाले होते. २०२०-२१ मध्ये हेच दर अनुक्रमे साडेनऊ हजार व पाच हजार रुपये होते. ‘आरटीईजीएस’द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा होते.  कृषी विभागातर्फे मार्गदर्शन... जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी वेळोवेळी अंबरवाडीला भेटी दिल्या आहेत. कृषी सहायक गजानन राठोड पोकरा अंतर्गत शेतींशाळेद्वारे विविध पीकपधद्धतींची माहिती देतात. त्यामुळे गावात प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेततळे उभारणीतून संरक्षित पाण्याची व्यवस्था झाली आहे. सीताफळ, पेरू आंबा आदी फळपिकांचे क्षेत्र वाढले आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची लावण होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होत आहे. आमची १५ एकर जमीन आहे. दरवर्षी एक ते दीड एकरांत सोयाबीन- एरंडीची लागवड करतो. खर्च व उत्पन्नाची तुलना केली असता जास्त फायदा असल्याचे जाणवले आहे.  - संभाजी घुगे,  अंबरवाडी  - सुरेश घुगे  ९०११०१०३१०  गजानन राठोड  ९४०४५९२१६१  (कृषी सहायक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com