देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने हातकणंगले तालुक्यातील गावांमध्ये उत्पादित देशी केळीच्या थेट विक्रीतून शेतकरी अर्थकारण सुधारत आहेत. शाहूवाडी तालुक्यातून रताळ्याला मागणी व आवकही वाढते आहे. विविध बाजारपेठांना पाठवून सणासुदीचा लाभ घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.
कोल्हापूरातील बाजारापेठेमध्ये देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीमुळे मागणी वाढली आहे.
कोल्हापूरातील बाजारापेठेमध्ये देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीमुळे मागणी वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने हातकणंगले तालुक्यातील गावांमध्ये उत्पादित देशी केळीच्या थेट विक्रीतून शेतकरी अर्थकारण सुधारत आहेत. शाहूवाडी तालुक्यातून रताळ्याला मागणी व आवकही वाढते आहे. विविध बाजारपेठांना पाठवून सणासुदीचा लाभ घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्हयात दोन-तीन महिन्यांमध्ये पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानीची छाया जिल्ह्यावर कायम आहे. तरीही दसरा व आगामी दिवाळी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी शेतीत व्यस्त आहेत. उसासारख्या पारंपारिक पिकाबरोबरच दररोजच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी तसेच नवरात्रीसाठी देशी केळीचे पीक त्यांच्यासाठी आधार म्हणून पुढे आले आहे. बाबूराव पाटील यांचा उत्साहवर्धक अनुभव नवे पारगाव (ता.. हातकणंगले) येथील बाबूराव आनंदा पाटील यांच्याकडे जवळपास सव्वादोनशे रोपे देशी केळीची आहेत. गेल्या महिन्यापासून ते विक्रीत व्यस्त आहेत. स्वभावाने अत्यंत बोलके असलेले पाटील अनुभव सांगताना म्हणतात की यापूर्वी सोयाबीन व भुईमूग ही पिके होती. पण बदलत्या हवामानात ती नुकसानकारक ठरू लागली. मग देशी केळीची बाग गेल्यावर्षी लावली. रासायनिक खतांचा जराही वापर करीत नाही. दशपर्णी अर्क व अन्य सेंद्रिय घटकांचा वापर करून केळी पिकवतो. विक्री करण्यापूर्वी भोवतालचे बाजार व घाऊक व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे खूपच दर कमी असल्याचे समजले. मग स्वतः विक्री करण्याचे ठरवले. संपर्कातील ग्रामस्थांना थोड्या थोड्या प्रमाणात केळी देण्यास सुरवात केली. केळीचा दर्जा चांगला असल्याने सणासुदीच्या काळात मागणी वाढू लागली आहे. थेट विक्रीचा फायदा सध्या एक दिवस आड ५० डझनांपर्यंत काढणी करतो. गावाहून जवळच ज्योतिबा देवस्थान आहे. येथील बहुतांशी पुजारी माझ्याकडून केळी घेतात. सध्या मोठी, मध्यम व लहान अशी अनुक्रमे ६०, ५० व ४० रुपये प्रति डझन अशी विक्री होत आहे. गेल्या महिन्यात २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. केळी न पिकल्यास किंवा खराब लागल्यास परत आणून द्या, बदलून देतो असे ग्राहकांना सांगत असतो. पण कुठलाच ग्राहक तक्रार घेऊन आलेला नाही असे पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले. संपर्क- बाबूराव पाटील- ९९२१४४९३५८

दानोळी (ता.. शिरोळ) हे ऊस व भाजीपाला पट्ट्यातील गाव. येथील जयपाल अप्पासाहेब सुतार हे ऊस उत्पादक शेतकरी. दोन वर्षांपासून त्यांनी देशी केळीला प्राधान्य दिले आहे. त्यांची ९६ गुंठे शेती असून देशी केळीची ९०० झाडे आहेत. दोन वर्षांपासून ही शेती त्यांच्यासाठी मोठा आधार ठरली आहे. विक्रीचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. श्रावण व नवरात्र हे केळीसाठी सर्वात महत्त्वाचे असतात. सुतार यांनी या काळात उत्पादन येण्याच्या दृष्टीने लागवडीचे नियोजन उत्तम प्रकारे केले. विक्री किरकोळ पद्धतीने करायची हेच सूत्र ठेवले. गावातील वर्दळीच्या ठिकाणी जाऊन ते विक्री करतात. घरातूनही अनेक ग्राहक केळी घेऊन जातात. जास्त प्रमाणात केळी निघत असल्याने ती योग्य प्रमाणात पिकणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी शेजारील गावातील रायपनिंग चेंबरमध्ये (उबवण कक्ष) ठेवली जातात. गरजेनुसार त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे तयार होणे व विक्री होणे यातील समन्वय कायम राहतो. गेल्यावर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा थेट विक्रीमुळे झाला. यंदा केळीचा खोडवा आहे. सध्या भाजीपाला व अन्य पिकांच्या दरांत सातत्य नसल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत देशी केळी फायदेशीर ठरत असल्याचे सुतार सांगतात. संपर्क- जयपाल सुतार-९८२३५२७२९३

‘रायपनिंग चेंबर’ चा फायदा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात रायपनिंग चेंबरमध्ये देशी केळी पिकवण्यासाठीची लगबग वाढली आहे. इतर वेळच्या तुलनेत केळी उत्पादकांनी महिनाभरात तिप्पट प्रमाणात केळी पिकविण्यासाठी आणल्याचे संबंधित व्यावसायिकांनी सांगितले. तमदलगे (ता. शिरोळ) येथील संजीवनी ॲग्रो फार्म चे चेतन पाटील म्हणाले की शिरोळ व हातकणंगले तालुक्यांमध्ये देशी केळीची लागवड थोड्या-थोड्या प्रमाणात वाढत आहे. हक्काचा दर मिळत असल्याने रायपनिंग चेंबरमध्ये केळी ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. - चेतन पाटील- ९८५०८४४९९९

रताळी ठरताहेत फायदेशीर नवरात्रीच्या उपवासांमध्ये रताळ्याचे महत्त्वाचे स्थान आहे. जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्‍यात नवरात्र सुरू होण्यापूर्वीच रताळे काढणीची झुंबड सुरू होते. गावातील पाणवठे रताळे स्वच्छ करण्याच्या कामांनी भरून जातात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे लागवड जास्त प्रमाणात आहे. तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील सुमारे २० ते २५ गावांमध्ये रताळ्याचे उत्पादन घेण्यात येते. खरिपात रताळी, रब्बीत चाऱ्यासाठी मका व पुन्हा जूनमध्ये रताळे अशी येथील पद्धत आहे. बाजारपेठ कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक, पुणे, वाशी, मुंबई, सुरत, बडोदा, गुजरात, आदी बाजारपेठेत येथील रताळी सध्या जात आहेत. यंदा गणेशोत्सव झाल्यानंतर सुरवातीला विविध बाजारपेठांमध्ये रताळ्यास क्विंटलला २५०० रुपये दर होता. परंतु आवक वाढू लागली तसा दर १२०० रुपयांपर्यंत खाली आला. नवरात्रीच्या सुरवातीच्या टप्प्यात एक-दोन दिवस जरी दर वाढले तरी नुकसान कमी होण्याची अपेक्षा आहे. आता शेतकरी स्वतः:च्या वाहनातून बाजारात विक्रीस नेण्याचे धाडस करतात. त्यातून जादा पैसे मिळतात. काही युवक सामाईक वाहन ठरवून भागातील शेतकऱ्यांची रताळी संकलित करून बाजारपेठेत पोचवण्याची व्यवस्था करतात. ओकोली येथील दादा यादव, प्रकाश पाटील, भगवान पांडुरंग पाटील म्हणतात की दसऱ्यापर्यंत दर वाढावेत अशी अपेक्षा आहे. नवरात्रोत्सव हाच दर मिळवण्यासाठी सर्वात चांगला हंगाम आहे. आमच्या भागातून काही प्रमाणात दिवाळीपर्यंतही उत्पादन सुरू राहते. संपर्क- दादा यादव-९१६८१९१६०५ कोल्हापुरातील आवक कोल्हापूर बाजार समितीत सप्टेंबरच्या शेवटच्या सप्ताहात दररोज १५० ते २०० पोती आवक होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून वाढ होत नवरात्रीच्या प्रारंभापर्यंत ती तीन ते चार हजार पोती इतकी झाली. घटस्थापनेदिवशी ७०० पोत्यांची आवक झाली. दरात मात्र विशेष वाढ झाली नाही. सरासरी ५० ते १५० रुपये प्रति दहा किलो दर कोल्हापूर बाजार समितीत मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com