शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादन

सवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद देशमुख यांनी हरभरा, सोयाबीन व तूर या पिकांमध्ये प्रयोगशील शेती केली आहे. कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या सहवासात राहून सुधारित वाणांचा वापर व बीजोत्पादन ही दोन मुख्य वैशिष्ट्ये जपत त्यांनी शेतीत प्रगती साधलीआहे.
blossomed gram crop in Vinod Deshmukh's farm
blossomed gram crop in Vinod Deshmukh's farm

सवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या युवा शेतकऱ्याने हरभरा, सोयाबीन व तूर या पिकांमध्ये प्रयोगशील शेती केली आहे. कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या सहवासात राहून सुधारित वाणांचा वापर व बीजोत्पादन ही दोन मुख्य वैशिष्ट्ये जपत त्यांनी शेतीत प्रगती साधली आहे.  बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील विनोद देशमुख हे युवा शेतकरी व्यक्तिमत्त्व आहे. अभ्यास, प्रयोगशील वृत्ती व कृषी विद्यापीठांमधील बियाणे पैदासकार यांच्या कायम सहवासात राहून त्यांनी आपली शेती प्रगतिशील केली आहे. त्यांची शेती नवीन वाणांच्या बीजोत्पादनाचे जणू क्षेत्रच तयार झाले आहे. सोयाबीन, हरभरा व तूर ही त्यांची मुख्य पिके आहेत.  कृषी विद्यापीठांत जे नवे वाण तयार होतात त्याची लागवड करण्यासाठी विनोद यांचा कायम पुढाकार असतो. विद्यापीठाकडून पायाभूत बियाणे मिळवून त्याचे विस्तार करण्यामध्ये विनोद यांनी मोठा वाटा उचलला आहे. शेतकऱ्यांबरोबर शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी त्यांच्या शेताला भेट देण्यासाठी कायम येत असतात.  उच्चशिक्षित तरुण शेतकरी शेतीत उतरलेले तरुण नव्या विचाराने शेती करीत आहेत. विनोद यांनी मराठी व इकॉनॉमिक्स विषयातून ‘एमए’ ची पदवी घेतली आहे. त्यांनी पुण येथे स्पर्धा परीक्षांचीही तयारी केली. दोन वेळा ‘पीएसआय’ पदाच्या मुलाखती दिल्या. परंतु तेथून परत यावे लागले. अर्थात कुठलीही निराशा त्यांनी मनी बाळगली नाही. गावी येऊन शेतीत काहीतरी भरीव करायचे असे त्यांनी ठरवले. त्यांचा लहान भाऊ देखील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्यामुळे शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन विनोदच सांभाळू लागले.   अनुभवातून शिक्षण  विनोद यांनी २०१२ पासून शेतीला प्रत्यक्ष सुरवात केली. वडिलांकडून आधुनिकतेचा वारसा मिळाला होताच. सन २०१३ च्या पहिल्याच हंगामात त्यांनी पीक व्यवस्थापन केले. मात्र या वर्षांत हरभरा एकरी अवघा चार क्विंटल मिळाला. नियोजनात काही चुका झाल्याचे लक्षात आले. त्यांचा पुन्हा अभ्यास केला. पुढील हंगामात खत व्यवस्थापन, किडी-रोग नियंत्रण यांचा अभ्यास केला. सन २०१७ मध्ये वडील मदनराव यांचे निधन झाले. त्याचा मोठा आघात सहन करावा लागला.  कांदा बीजोत्पादनापासून  बदलली पीक पद्धती  सन २०१६ मध्ये विनोद यांनी पूर्ण क्षमतेने शेती करताना कांदा बीजोत्पादनात पाऊल ठेवले. पहिल्या  वर्षी एकरी पाच क्विंटल ७० किलो बियाणे तयार केले.  पुढील टप्प्‍यात संपूर्ण शेती बीजोत्पादनात परावर्तित करण्यास सुरवात केली. त्यासाठी कृषी विद्यापीठांमधून नवनवीन बियाणे आणण्यास सुरवात केली. आज विनोद विविध वाणांचे दर्जेदार उत्पादन घेतात. शेतकऱ्यांना त्याची विक्री करतात. त्यामुळे.बाजारपेठेपेक्षा अधिकचा दर मिळवणे त्यांना शक्य झाले आहे. आश्‍वासक उत्पादन 

  • सन २०१९ मध्ये बीडीएन ७१६ या तूर वाणाची निवड केली. एकरी ९ क्विंटल ६० किलो उत्पादन घेतले. यंदाही तुरीचे पीक उत्कृष्टपणे जुळून आले. 
  • सन २०१६ मध्ये बीएसएमआर ७३६ या तुरीच्या वाणाचे एकरी १० क्विंटल ३० किलो उत्पादन 
  • २०१६ मध्ये हरभऱ्याच्या ११०९ पीकेव्ही कांचन वाणाची सात एकरांत लागवड केली. एकरी ९ क्विंटल २५ किलो उत्पादन. 
  • सन २०१७ मध्ये ५० क्विंटल हरभरा बियाणे विक्री. त्यास किलोला ६० रुपये दर.  
  • २०१७ मध्ये फुले संगम सोयाबीन- दोन एकरांत बीजोत्पादन- एकरी १३ क्विंटल २५ किलो उत्पादन.
  • ६५ रुपये प्रति किलो दराने विक्री. 
  • सन २०१८ मध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एमएयूएस ६१२ वाणाचे एकरी १० क्विंटल ८५ किलो उत्पादन. किलोला ६० रुपये दराने विक्री. 
  • सन २०१९ च्या हंगामात फुले विक्रम या हरभरा वाणाची लागवड केली. एकरी ११ क्विंटल उत्पादन झाले. यावर्षात ८० क्विंटल सोयाबीनची (एमएयूएस ६१२) ६५०० रुपये दराने थेट बियाण्यासाठी विक्री केली.  
  • सन २०२० मध्ये आरव्हीएसएल ८ या सोयाबीन वाणाचे एकरी १३ क्विंटल ६० किलो उत्पादन.
  • यंदा हरभऱ्याच्या फुले विक्रम, फुले विक्रांत व पीकेव्ही कनक या वाणांची लागवड. पीक उत्कृष्ट अवस्थेत. 
  • शेतीचे शास्त्र अभ्यासले  कोणत्या पिकाला कुठल्या खताची, कधी, किती गरज असते, लागवडीचा कालावधी, एकरी बियाणे गरज आदींचा बारकाईने अभ्यास केला. त्यातून प्रत्येक पिकाचे शास्त्र अवगत केले. आपल्या मातीचा पोत काय आहे हे जाणून घेत खत व्यवस्थापन केले जाते. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय घटकांनाही विनोद तेवढेच महत्त्व देतात. प्रत्येक बियाण्यास जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करतात. एकूण चोख व्यवस्थापनामुळे पाऊस जास्त किंवा कमी झाल्यास पीक तग धरून राहते. अकोला, राहुरी तसेच परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सातत्याने संपर्कात राहून विनोद यांनी शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. - विनोद देशमुख   ९४२१३९६३४१,९८५०३७३६९०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com