उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा पिकात मिळवली ओळख

नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील नंदकुमार उशीर यांनी कांदा पिकात ‘मास्टर’ शेतकरी अशी ओळख तयार केली आहे. तीन हंगामांत उत्पादन घेताना खरिपावर सर्वाधिक भर दिला आहे. गुणवत्तापूर्ण बीजोत्पादन, रोपवाटिका व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, ठिबक सिंचन, गादीवाफे अशा एकूण नियोजनातून एकरी ११ ते १५ टन कांदा उत्पादन व दर्जा त्यांनी मिळवला आहे.
कांद्याचे दर्जेदार उत्पादन.
कांद्याचे दर्जेदार उत्पादन.

नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील नंदकुमार उशीर यांनी कांदा पिकात ‘मास्टर’ शेतकरी अशी ओळख तयार केली आहे. तीन हंगामांत उत्पादन घेताना खरिपावर सर्वाधिक भर दिला आहे. गुणवत्तापूर्ण बीजोत्पादन, रोपवाटिका व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, ठिबक सिंचन, गादीवाफे अशा एकूण नियोजनातून एकरी ११ ते १५ टन कांदा उत्पादन व दर्जा त्यांनी मिळवला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका खरीप, रब्बी कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. तालुक्यातील धोडांबे गावातील नंदकुमार उशीर हे महाविद्यालयीन जीवनापासून शेती पाहतात. सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग ही पिके ते घेतात. मात्र कांदा हे त्यांचे मुख्य पीक आहे. कांदा शेतीचे नियोजन

  • एकूण शेती- साडेसहा एकर. सिंचनाला विहिरीचा स्रोत. नदीही जवळ.
  • १० वर्षांपासून खरीप (लाल पोळ), लेट खरीप (रांगडा) व रब्बी (उन्हाळी) अशा तीन हंगामांत लागवड.
  • पाण्याची उपलब्धता व जमिनीचा उतार या बाबी लक्षात घेऊन खरिपात तीन एकर, तर अन्य हंगामांत सुमारे एकेक एकर.
  • बीजोत्पादनात स्वयंपूर्ण : बियाणे तुटवडा व दरवाढ या समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी २० गुंठे क्षेत्रावर बीजोत्पादन घेतात. डिसेंबर व जानेवारी काळात सपाट गादीवाफ्यावर डेंगळे लागवड होते. निवड पद्धतीने कांदा वापरला जातो. बियाणे चांगले व दर्जेदार निपजावे यासाठी परागीभवनासाठी मधमाश्‍यांचा अधिवास वाढविला जातो. त्यासाठी मातीचा मटका, गूळपाणी यांचा वापर करून बारदान ओले करून सावलीत वाळवण्याची क्रिया होते. शिल्लक बियाण्याची तीन हजार रुपये प्रति किलो दराप्रमाणे विक्री होते. व्यवस्थापनातील ठळक बाबी

  • नंदकुमार सांगतात की पाणी उपलब्ध असल्याने खरिपात कांदा लागवडी अधिक असतात. तुलनेत अन्य हंगामातील लागवडीचे प्रमाण कमी असते. अतिवृष्टीमुळे गेल्या दोन वर्षांत काहीअंशी खरीप कांदा उत्पादनात घट झाली. मात्र शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्याने परिसरात इतरांच्या तुलनेत उल्लेखनीय उत्पादन घेतले.
  • स्थानिक वाण वापरले जातात. खरीप कांदा लालसर तर उन्हाळी कांदा फिकट लालसर असतो.
  • दर्जेदार उत्पादनासाठी निरोगी रोपे असणे गरजेचे असते. त्यादृष्टीने काळ्या, हलक्या उताराच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर २० फूट लांब व तीन फूट रुंद आकाराच्या सपाट वाफ्यावर रोपे तयार केली जातात. शिल्लक रोपांची विक्रीही होते.
  • दरवर्षी एकूण कांदा लागवड क्षेत्रात हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा पेरणी.त्यामुळे नत्र स्थिर राहण्यासह जमीन भुसभुशीत व सच्छिद्र राहते. परिणामी, रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी राहते. गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.
  • रोपवाटिकेत बियाणे टाकण्यापूर्वी प्रति १० गुंठ्यांत ट्रायकोडर्मा १ किलो, निंबोळी पेंड ४० किलो मिश्रण वापर
  • ट्रायकोडर्माचे द्रावण बियाण्याला चोळून नंतर बियाणे सुकवून वाफ्यांमध्ये वापर.
  • पावसाळ्यात बियाणे अंकुरल्यानंतर वाफसा पद्धतीने रोपवाटिकेला गरजेनुसार साधारण ४ ते ५ पाळ्या पाणी
  • रोपांचा पिवळेपणा, शेंडेमर, हानिकारक बुरशी व कीटक नियंत्रणासाठी शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशकांचा वापर
  • कीड नियंत्रित होण्यासाठी चहूबाजूने मका, चवळी ही सापळा पिके.
  • पांढरी मुळी वाढण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची आळवणी
  • कांद्याची प्रत व टिकवणक्षमता वाढीसाठी लागवडीपूर्वी दाणेदार गंधकाचा वापर एकरी २० ते २५ किलो.
  • एनपीके बेसल डोस व लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी त्यांचा गरजेनुसार मात्रेत वापर
  • सपाट गादी वाफ्यावर लागवड केल्याने पाणी बचत. पावसाळ्यात सड होत नाही.
  • पाण्याचा ताण पडल्यास गादीवाफ्यामुळे पीक ऊन धरत नाही.
  • काढणीनंतर कापणी करून रंग येण्यासाठी पातीखाली पोळ मारून सुकवणी.
  • एकरी उत्पादन

  • खरीप व लेट खरीप- ११ ते १२ टनांपर्यंत.
  • उन्हाळी- १५ ते १७ टनांपर्यंत.
  • एकरी उत्पादन खर्च- किमान ७० हजार रु.
  • बाजारपेठा जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, वणी व चांदवड या जवळच्या बाजारपेठा आहेत. खुल्या पद्धतीने लिलाव होतात. मोठा, मध्यम (गोल्टी) व लहान(चिंगळी) अशा तीन प्रकारांत प्रतवारी होते. खरीप व लेट खरीप कांद्याला टिकवणक्षमता कमी असल्याने बाजारभावाचा अंदाज घेऊन काढणीपश्‍चात विक्री होते. उन्हाळी कांदा हाताळणी व प्रतवारी करून साठवला जातो. २५ टन क्षमतेची चाळ आहे. दरांचा अंदाज घेऊन त्याची टप्प्याटप्प्याने विक्री होते. अशा नियोजनातूनच आजवर चांगले दर मिळवणे शक्य झाले. अलीकडील वर्षांत क्विंटलला १५०० ते कमाल ३००० रुपयांपर्यंत दर मिळाले. आवक वाढल्यास किंवा प्रतवारी योग्य नसल्यास तर कधी निर्यातबंदी धोरणामुळे दर पडतात, त्यामुळे उत्पादनासोबत बाजारपेठ अभ्यासही महत्त्वाचा असल्याचे नंदकुमार सांगतात. प्रयोगशील कुटुंब नंदकुमार यांचा गावातील सहकार चळवळीत सक्रिय सहभाग आहे. विकास कार्यकारी सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. कृषी, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. कांद्याचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मार्गदर्शन, चर्चासत्रात सहभाग ते नोंदवितात. ‘महाराष्ट्र ओनियन फार्मर्स’ या प्रयोगशील कांदा उत्पादक समुहाचे ते सक्रिय सदस्य आहेत. शेतीत त्यांना वडिलांचे मार्गदर्शन व भावंडांची साथ मिळते. पत्नी नीता रोपवाटिका निर्मितीत कुशल आहेत. प्याज की राणी सन १९९३ मध्ये १५ क्विंटल कांद्याला त्या वेळचा उच्चांकी म्हणजे किलोला सुमारे २८ किलो दर मिळाला. त्या रकमेचा विनियोग करीत त्याचदिवशी मोटरसायकल घेतली. त्यावर ‘प्याज की राणी’ असे लिहिले होते. त्याची परिसरात चर्चा झाली. आजही त्यांच्या मालवाहू वाहनावर हेच नाव लिहिले आहे. कांदा पिकानेच जीवनाची घडी सुधारली याचा नंदकुमार यांना अभिमान आहे. संपर्क : नंदकुमार उशीर, ९८५०८५५७५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com