फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरी

पुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर असलेले सोनोरी गाव अंजीर, सीताफळ व अन्य फळबाग पिकांसाठी प्रसिद्धीस आले आहे. गणेशोत्सव तसेच अन्य सणांसाठी येथील फळांना मागणी असते. त्या माध्यमातून गावात सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
The sonori village is famous for figs, custard apple and other orchards.
The sonori village is famous for figs, custard apple and other orchards.

पुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर असलेले सोनोरी गाव अंजीर, सीताफळ व अन्य फळबाग पिकांसाठी प्रसिद्धीस आले आहे. गणेशोत्सव तसेच अन्य सणांसाठी येथील फळांना मागणी असते. त्या माध्यमातून गावात सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.  पुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून पाच किलोमीटरवर सोनोरी हे अंजीर, सीताफळाचे गाव म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनातून गावात बारमाही फळबागा डोलू  लागल्या आहेत. अलीकडेच गावाने चिकू, बोर, पेरू आदी पिकांतही आघाडी घेतली आहे. गावची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन हजारांच्या आसपास असून, भौगोलिक क्षेत्र सुमारे १२०० हेक्टर तर ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. गावात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यंदा तर अत्यल्प पाऊस पडला. तरीही न खचता इच्छाशक्ती पणास लावून उपलब्ध पाण्यात चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांत चढाओढ सुरू आहे. उमदे तरुण शेतीकडे वळले आहेत. सरपंच रामदास साहेबराव काळे, उपसरपंच सुरेखा माळवदकर, ग्रामपंचायतीचे सदस्य व प्रगतिशील शेतकऱ्यांचे बळ गावाला मिळत आहे. गावातील तुकाराम निवृत्ती सोनवणे यांनी १९७२ मध्ये व्यापारी तत्त्वावर सीताफळाच्या एक हजार रोपांची लागवड केली. त्यांनी मुंबई- वाशी व तेथून परदेशातही विक्री केली. त्यानंतर गावात लागवड वाढू लागली. सध्या गावात १५० ते २०० हेक्टरवर या पिकाची लागवड आहे. हवामान व बाजारपेठेनुसार शेतकरी वर्षातील बहार घेतात.  पाण्याचे नियोजन   पाणीटंचाईवर मात करायची तर एकी महत्त्वाचे असल्याचे तरुणांना कळून आल्याने त्यांनी पुढाकार घेतला. ज्येष्ठ मंडळीनीही पाठिंबा दिला. बघता बघता दुष्काळावर मात करण्यासाठी गाव एकत्र झाले.  ओढ्याचे खोली- रुंदीकरण झाले. विहिरींना, बोअरवेल्सना चांगला फायदा झाला.   पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पाण्याची उपलब्धता व्हायची. पण उन्हाळ्यात चांगलाच प्रश्न भेडसावत होता. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केला. सुमारे ६० ते ७० टक्के फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. पाणी टंचाईची भीषण परिस्थिती पाहता ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘वैयक्तिक शेततळे’ या योजनांचा लाभ शेतकरी घेत आहे.आत्तापर्यंत १०० च्या आसपास शेततळी झाली आहेत. माती नाला बांध ८ ते १०, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २४ सिमेंट बंधारे झाले. त्यामुळे कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा तयार होऊन पाणी जमिनीत मुरले.  फळपीक लागवडीत बदल सोनोरी सीताफळाचे आगार म्हणून ओळखले जात असले तरी पाच ते सहा वर्षांपासून शेतकऱ्यांनी फळपीक लागवडीत बदल केल्याचे दिसून येते. पुणे शहर, सासवड व मुंबई या बाजारपेठा जवळ असल्याने ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शेतकरी पेरू, बोर, वाटाणा, कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, कांदा आदी पिकांकडे वळल्याचे दिसून येते. गावात सीताफळाच्या आधीपासून अंजिराचे उत्पादन घेतले जात होते. वाहतूक व मार्केटच्या सुविधा उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हे पीकही टिकवून धरले आहे. गावात २०० ते २५० हेक्टरवर अंजीर बागा आहेत. पुणे शहर जवळ असल्याने मागणीही चांगली आहे.    फळबागांमधून उलाढाल  सध्या गावात सुमारे ५०० हेक्टरपर्यंत विविध फळपिकांची लागवड आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्ली, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. एखाद्या पिकात कमी दर मिळाले तरी दुसरे पीक चांगले पैसे देऊन जाते. गणपती उत्सव तसेच अन्य उत्सवांमध्येही फळांना चांगली मागणी  आहे. फळबागेच्या माध्यमातून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल गावात होते. त्यामुळे शेती व  कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.  विविध विकासकामे   गावात पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध झाडांची लागवड झाली आहे. सध्या झाडे सुस्थितीत आहेत. येत्या काळात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हीच झाडे महत्त्वाची ठरणार आहेत. नागरिकांसाठी चांगले रस्ते बनविले आहेत. सांडपाणी पाणी वाहून जाण्यासाठी गटारे काढली आहेत. त्यामुळे गावात फारसे सांडपाणी रस्त्यांवर दिसत नाही.  विजेचा वापर कमी करण्यासाठी गावात दोन पवनचक्क्या बसविल्या आहेत. त्याचा वापर मंदिराचे लाईटस, चौकांमध्ये वीज यासाठी होतो.   गावात राबविले जाणारे उपक्रम 

  •     वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
  •     ग्रामस्वच्छता
  •     आरोग्यविषयक जनजागृती
  •     शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षणे  
  • प्रतिक्रिया माझी एकूण ३५ एकर शेती आहे. पाण्यासाठी दोन शेततळ्यांसह तीन विहिरी व तीन बोअरवेल्स आहेत. त्यामुळे पाण्याची बऱ्यापैकी सोय आहे. सीताफळ, बोर, अंजीर, पेरू अशी मिळून सुमारे आठ ते नऊ एकरांत फळबाग आहे. त्यातून शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. - अण्णा काळे  ९८२२४१३९९२

    शेती व गावाचा विकास करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर असतो. गावात सर्वाधिक सीताफळ व अंजिराची लागवड असून त्यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते.   - राहुल विलास काळे  ९०२१८२८३६६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com