मालेगाव (जि. वाशीम) येथील सय्यद शारीक सय्यद गफूर यांनी सोयाबीन, हरभरा, कांदा व गहू आदी पिकांमध्ये एकरी उत्पादकता वाढवली आहे. विविध प्रयोग करण्याची जिद्द, अभ्यासूवृत्ती, उत्कृष्ट व्यवस्थापन या जोरांवर त्यांनी यशस्वी शेतकरी होण्याचा मान मिळवला आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव (तालुका ठिकाण) येथील सय्यद शारीक सय्यद गफूर यांची भावासह एकूण साडेआठ एकर वडिलोपार्जित शेती आहे. माती काळी आहे. करडा (जि. वाशीम) कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्वतः नवे काही करण्याची धडपड, प्रयोगशीलता आणि नियोजन या जोरावर प्रयोगशील, अभ्यासू तरुण शेतकरी म्हणून सय्यद यांनी ओळख बनवली आहे. क्षेत्र कमी असले तरी विविध पीक पद्धतींचा वापर व एकरी उत्पादनवाढ यातून शेती आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हरभरा पिकाविषयी तीन वर्षांपूर्वीपासूनच हरभरा पिकातील अनुभव पाहता एकरी ८ ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे. काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे.
कांदा नियोजन कांद्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पुणे फुरसुंगी वाण वापरतात. यंत्राद्वारे पेरणी करतात. त्यामुळे पारंपरिक पेरणीसाठी लागणाऱ्या मजुरांचा खर्च काही पटींनी कमी होतो. यंत्राच्या पेटीत रासायनिक खत व एकरी चार किलो बियाणे घेतात. यंत्राच्या खालील भागात बी जास्त ठेवतात. वरील भागात खत जास्त व बियाचे प्रमाण कमी ठेवतात. यामुळे बी सर्वत्र सारख्या प्रमाणात पडते. उगवण चांगली होते. गेल्या हंगामात ३६०० रुपये प्रति किलो दराने चार किलो बियाणे आणले. मात्र उगवण न झाल्याने प्लॉट ‘फेल’ गेला. त्या ठिकाणी बीजोत्पादन घेताना अर्ध्या एकरात आठ क्विंटल कांदा पेरला. त्यापासून दोन क्विंटल १० किलो बी मिळाले. यंदा लागवडीसाठी त्याचा वापर झाला. यांत्रिक कांदा पेरणीचे फायदे दरवर्षी नोव्हेंबरच्या दरम्यान कांदा पेरणी होते. रोपे तयार करून लावायची म्हटले तर सुमारे दीड महिना लागतो. थेट पेरणीमुळे पीक कालावधी कमी होतो. पारंपरिक पद्धतीत पेरणीला एकरी किमान १०० मजूर यानुसार प्रति मजुरी २०० रुपये म्हणजे एकरी २० हजार रुपये खर्च येतो. यंत्राद्वारे हेच काम केवळ आठशे ते एक हजार रुपयांच्या आत होते. पेरणीनंतर दर तिसऱ्या दिवशी दोन तास स्प्रिंकलरने पाणी देतात. थेट पेरणीमुळे उत्पादन खर्च एकरी २५ ते ३० हजारांपर्यंत राहतो. तोच खर्च पारंपरिक पद्धतीत ४० ते ४५ हजारांवर जातो. खर्च कमी होणे ही बचतच असल्याचे सय्यद सांगतात. उत्पादन सन २०१८ मध्ये अर्ध्या एकरात ५७ क्विंटल उत्पादन. काही कांदा प्रति क्विंटल १८०० रु तर काही २००० रुपये दराने विकला. २६ हजार रुपये खर्च वजा करता ८२ हजार रुपये नफा झाला. सोयाबीन उत्पादन या हंगामात टोकण पद्धतीने ५५ गुंठ्यांत फुले संगम वाणाचे सोयाबीन गादीवाफ्यावर (बेड) घेतले. एकरी सुमारे १२ किलो बियाणे वापरले. तणनाशक व चार वेळा कीडनाशक फवारण्या केल्या. कृषी विभागाने पीक कापणी प्रयोग केला. त्यातून ५५ गुंठ्यांत सुमारे २४ क्विंटल उत्पादन मिळाले. एकरी २४ हजार रुपये खर्च आला. लसूण लागवड रब्बीत लसूणही घेतात. अलीकडे १४ किलो बियाण्यापासून दोन क्विंटल ७० किलो उत्पादन आले. ६० ग्रॅमपर्यंत गाठा तयार झाला. एका गाठ्यात १५ पर्यंत पाकळ्या मिळतात. यापूर्वी एक किलो लसणापासून १५ किलोपर्यंत उत्पादन झाले. यंदा २७ गुंठे क्षेत्रात लागवड आहे. गहू एकरी २८ क्विंटल गेल्या रब्बीत (२०२०-२१) खासगी कंपनीच्या गहू वाणाची लागवड केली. त्यातून हेक्टरी ७० क्विंटल ८० किलो म्हणजे एकरी सुमारे २८ क्विंटल उत्पादन मिळाले. या यशाबद्दल कृषी विभागाने अमरावती विभागस्तरीय पीक स्पर्धेत सर्वसाधारण गटातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन सय्यद यांना सन्मानित केले. यापूर्वी एकरी २० ते २२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतल्याचेही त्यांनी सांगितले. संपर्क ः सय्यद शारीक सय्यद गफूर ८१४९३९२१३८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.