कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नाव

बहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण पुरस्कारप्राप्त विष्णू जरे यांनी कांदा व लसूण शेतीत मास्टर शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. सुधारित वाण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व व्यवस्थापनातून एकरी चांगले उत्पादन व गुणवत्ता त्यांनी कायम जोपासली आहे.
Vishnu Jare showing the garlic and onion.
Vishnu Jare showing the garlic and onion.

बहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण पुरस्कारप्राप्त विष्णू जरे यांनी कांदा व लसूण शेतीत मास्टर शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. सुधारित वाण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व व्यवस्थापनातून एकरी चांगले उत्पादन व गुणवत्ता त्यांनी कायम जोपासली आहे. परराज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या लसूण बियाण्याची ख्याती झाली आहे. बहिरवाडी (ता. जि. नगर) येथील विष्णू रामचंद्र जरे यांची नऊ एकर शेती आहे. या भागात पाणी तसे फारसे उपलब्ध नाही. दरवर्षी सात ते साडेसात एकर कांदा व एक एकरभर लसूण अशी त्यांची मुख्य पीक पद्धती असते. लसणाचे बियाणे म्हणून विक्री करतात. सन २००६ पासून त्यांनी सुधारित वाणांची लागवड सुरू केली. वेगवेगळ्या प्रयोगांमधून उत्पादनात दीडपट ते दुपटीने वाढ केली. एक किलो लागवडीपासून सुरुवात जरेवाडीत पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून लसणाचे उत्पादन घेतले जाते. त्या वेळी गावरान वाणाची लागवड केली जायची. जरे यांना २००९ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने पीक प्रात्यक्षिक म्हणून राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा-लसूण संशोधन प्रकल्पाकडून भीमा पर्पल हे लसणाचे सुधारित वाण मिळाले. एक किलो लसणापासून २२ किलो उत्पादन निघाले. त्यानंतर लसणाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढीस चालना मिळाली. व्यवस्थापनातील बाबी

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राजगुरुनगर येथील संस्था यांच्याकडील लसूण वाणांची लागवड होते. यात भीमा पर्पल, गोदावरी, बसवंत, फुले नीलिमा आदींचा समावेश आहे. कांद्याचे पुणा फुरसुंगी हे वाण ते वापरतात.
  • पेरणी यंत्राचाही वापर वाढवला. त्यामुळे बियाणे व लागवड खर्चात बचत केली.
  • खरिपाऐवजी लेट खरिपात म्हणजे १५ ते ३० सप्टेंबरच्या काळात कांदा लागवड करतात. कारण हा डोंगराळ भाग असल्याने पुढे पाण्याची शाश्‍वती नसते. कांद्याआधी शेतात मूग घेतात. या पिकामुळे नत्र स्थिरीकरण होण्यास मदत होते.
  • कांद्याला शंभर फूट लांबीचे वाफे तयार केले जातात. त्यामुळे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते. त्यामुळे कांदा चांगला पोसत असल्याचे जरे सांगतात.
  • लसूण हा बीजोत्पादनासाठीच घेतला जातो. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात लागवड होते. हा काळ उगवणीला चांगला असतो. वाढीला थंडी तर काढणीच्या काळात उष्णता असते. या पिकात गादीवाफ्याचा वापर होतो.
  • तीन विहिरी आहेत. त्या एकमेकांना जोडल्या आहेत. सुमारे पाच ठिकाणी शेती आहे. प्रत्येक विहीर दुसरीला जोडून साडेआठ हजार फूट लांबीच्या पाइपलाइनद्वारे सर्व ठिकाणी पाणी खेळवले आहे. गरजेनुसार ठिबक व तुषार सिंचनाचा वापर होतो. खतांचाही वापर संतुलित ठेवला आहे. उत्पादन खर्च एकरी ७५ हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत होतो.
  • उत्पादन पूर्वी गावरान लसणाचे एकरी साधारण बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळे. आता सुधारित वाण व व्यवस्थापनातून जरे तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन घेतात. कांद्याचे एकरी १२ टनांपासून १६ टनांपर्यंत उत्पादन मिळते. घोडेगाव येथे विक्री होते. १८ वर्षांपासून अर्ध्या एकरात कांदा बीजोत्पादन असते. स्वतःसाठी वापरून दरवर्षी सुमारे ३० किलो बियाण्याची विक्री होते. प्रति तीन किलोला १० हजार रुपये दर आहे. देशभर लसूण बियाणाची विक्री जरे यांच्याकडील बियाण्याला देशभरातून मागणी असते. किलोला १५० रुपयांपासून २००, २५० ते कमाल ३०० रुपयांपर्यंतही त्यांच्या बियाण्याला दर मिळाला आहे. विद्यापीठ व कांदा-लसूण संस्थेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत जेरे यांचे नाव पोहोचले आहे. कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश भागातून बियाण्याला अधिक मागणी असते. जरे सांगतात की जोखीम कमी करण्यासाठी परराज्यांतील शेतकऱ्यांना सुमारे १० किलो बियाणे अधिकचे मोफत म्हणून पाठवण्याची मला सवय आहे. महाराष्‍ट्र, दक्षिणेकडील राज्यांसह ओडिशा, पश्‍चिम बंगालमधील कांदा व लसूण उत्पादकांनाही जरे मार्गदर्शन करतात. सध्या बहिरवाडी परिसरात सुमारे ५० ते ६० शेतकरी ५० ते ६० हेक्टरवर तर आसपासच्या गावांतील शेतकरीही सुमारे ८० हेक्टर क्षेत्रावर लसणाचे दरवर्षी उत्पादन घेतात. बहुतेकांना जरे यांचे मार्गदर्शन मिळते. कांदा- लसणाची गावे म्हणून या परिसराची ओळख झाली आहे. नवीन वाणावर संशोधन लसणाचे अभ्यासक म्हणून जरे नगर जिल्ह्यात परिचित आहेत. निवड पद्धतीने त्यांनी लसणाचे नवे वाण संशोधित केले आहे. जाड पाकळी, वरून व आतही लाल रंग आणि खास करून उग्र गंध तसेच उत्पादनात वाढ ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत. राजगुरुनगर येथील कांदा-लसूण संशोधन संचालनालयाकडे चाचण्यांसाठी हा वाण पाठवला आहे. वाणावरील काम पूर्ण झाल्यानंतर त्यास स्वतःची ओळख सांगणारे नाव देण्याचा संकल्प केला आहे. प्रयोगांचे सादरीकरण व पुरस्कार कृषी विद्यापीठातील विविध कार्यक्रम, जॉइंट ॲग्रेस्कोसह कृषी विभागाच्या कार्यशाळेत जरे यांच्या प्रयोगांचे सादरीकरण झाले आहे. विद्यापीठात एका कार्यक्रमात कृषिमंत्री दादा भुसेही उपस्थित होते. सन २०१३ मध्ये कृषी भूषण, वसंतराव नाईक प्रतिष्ठान, राजगुरुनगर येथील केंद्राचा उत्कृष्ट शेतकरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते अशा विविध माध्यमांतून जरे यांचा पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. विद्यापीठ, कृषी विभागाच्या विविध समित्यांवर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कृषी अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह देशभरातील असंख्य शेतकरी व अभ्यासकांनी त्यांच्या शेताला भेटी दिल्या आहेत. - विष्णू जरे, ९७६४०३८२५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com