कोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड, लागवडीसाठी प्रमुख जातींची निवड आणि अभिवृद्धी याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच योग्य लागवड पद्धतींचा अवलंब आणि खत व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. लागवड पद्धती
रोप किंवा कलमांची लागवड करण्यासाठी १ × १ × १ मी. आकाराचे खड्डे करावेत. खड्डे भरताना तळाशी १० ते १५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकूननंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत (१५ किलो), नत्र: स्फुरद: पालाश याचे मिश्रण (१०० ग्रॅम), २०० ग्रॅम निंबोळी खत व आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत १०० ग्रॅम कीडनाशक पावडर मिसळावी. कलमी आणि कमी घेर असणाऱ्या झाडांची लागवड ६ × ६ मी, किंवा ८ × ६ मी, ८ × ८ मी या अंतरावर जून ते ऑगस्ट या महिन्यात करावी. बांधावरती लागवड ही ३० फुटांपेक्षा जास्त अंतरावर करावी. एक-दोन चांगले पाऊस पडल्यानंतर रोप किंवा कलमांची मुख्य शेतात लागवड करावी. त्यामुळे पावसाळी दमट हवामानाचा झाडांच्या वाढीसाठी भरपूर फायदा होतो. झाडांची मर कमी होते आणि वाढ जोमाने होते. उन्हाळ्यामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आळ्यामध्ये वाळलेले गवत, लाकडाचा भुसा व पाचट आच्छादन फायदेशीर ठरते. मूळकूज किंवा वाळवी पासून संरक्षण होण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशक व कीटकनाशकांची आळवणी प्रत्येक रोपाच्या आळ्यात करावी. झाडाला सुरुवातीला वळण देण्यासाठी रोप एक मीटर उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा, जेणेकरून चारी दिशांना फांद्यांची वाढ होऊन आकार डेरेदार होईल. मोठ्या झाडांची नियमित छाटणी करण्याची आवश्यकता नाही. दरवर्षी चिंचेची फळे काढून झाल्यावर झाडाच्या वाळलेल्या फांद्या दिसल्यास त्या कापून काढाव्यात. फळ काढणी पूर्ण झाल्यावरती (मार्च ते एप्रिल) बागेस पाण्याचा चांगला ताण दिल्याने फूलधारणा मोठ्या प्रमाणात होते. फुलांचे रूपांतर फळांमध्ये झाल्यानंतर पाणी द्यावे. तज्ज्ञांच्या मतानुसार फळ काढताना किंवा काढल्यानंतर बांबूच्या काठीने चिंचेची झोडपणी केल्याने पुढील काळात फुले, फळे मोठ्या प्रमाणात येतात. लागवडीनंतर सुरुवातीची ८ ते १० वर्षे झाडांच्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत तूर, सोयाबीन, मूग, हरभरा, भुईमूग लागवड शक्य आहे. माळरान किंवा डोंगर उतारावर अंजन, पवना, स्टायलो चारा पिके, सुगंधी व औषधी वनस्पती जसे की गवती चहा लागवड करावी. सुरुवातीच्या काळात जोमदार वाढीसाठी शिफारशी प्रमाणे खते व पाणी द्यावे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये झाडाच्या भोवती रिंग पद्धतीने शेणखत व मिश्र खते द्यावीत. नत्राची मात्रा दोन किंवा तीन वेळा द्यावी. सुरुवातीची दोन वर्षे पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्यास १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळ्यात गरजेनुसार १५ ते ३० दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खतमात्रा नियोजन (प्रति झाड)
झाडाचे वय (वर्ष) | शेणखत/कंपोस्ट (किलो) | नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) |
१ | ५ | ५० | २५ | २५ |
२ ते ३ | १० | १०० | ५० | ५० |
४ ते ५ | १० ते १५ | १५० | ७५ | ७५ |
६ ते ७ | १५ ते २० | २०० | १०० | १०० |
८ ते १४ | २० ते २५ | ३०० | १५० | १५० |
१५ ते त्यापुढे | ३० ते ५० | ५०० | २५० | २५० |
(स्रोत : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) - विजयसिंह काकडे (उद्यान विद्या) ७३८७३५९४२६ - संग्राम चव्हाण (वनशेती), ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती)