जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढविण्यासाठी, पिकांच्या शरीरांतर्गत क्रियांचा वेग वाढविण्यासाठी, शेतातील वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर फायदेशीर आहे. याचबरोबरीने काही प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होते. जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण :
यामध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे, स्फुरद, सिलिकेट, लोह व जस्त विरघळविणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, प्रकाशसंश्लेषण करणारे काही यीस्ट व अॅक्टिनोमायसेट्स आदी जिवाणू असतात. जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढते. उपयुक्त जिवाणूंची संख्या जोमाने वाढते. स्फुरद, पालाश, लोह,जस्त, गंधक, सिलिकॉन अशा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. पिकाची निरोगी वाढ होऊन उत्पादनात भरीव वाढ होते. असहजीवी जिवाणूंमार्फत नत्र स्थिरीकरणाद्वारे वातावरणातील नत्र पिकास उपलब्ध होतो. नत्र, स्फुरद व पालाश, गंधक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची वापर मात्रा कमी करता येते. ऊस लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर ४५, ६० व ९० दिवसांनी प्रत्येक वेळी हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या साहाय्याने आळवणी करावी. खोडवा ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत व त्यानंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी प्रतिहेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या साहाय्याने आळवणी करावी. किंवा लागवड व खोडवा उसात याचवेळी ठिबक सिंचनातून द्यावे. त्यासाठी वेगळ्या टाकीत २.५ लिटर प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करावे. किंवा जास्त फायद्यासाठी जिवाणू द्रवरूप खत एक लिटर प्र.िहे १०० ते २०० किलो चांगले कुजलेल्या व वाळलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून समप्रमाणात सरीत मिसळावे. सेंद्रिय खतातून देताना जमिनीत ओल असताना उसाच्या बाजूला चळी घेऊन रांगोळी पद्धतीने समप्रमाणात मिसळावे. खोडव्यात आळवणी करावयाची झाल्यास उसाच्या बुडख्याजवळ ओळीलगत करावी. पानांवर फवारणीसाठी जिवाणू मिश्रण :
यामध्ये असिटोबॅक्टर, डायझोट्रॉफिकस, बुरखोलडेरिया, हर्बास्पिरीलम, अॅझॉस्पिरीलम व अॅझॉअरकस आदी जिवाणूंचा एकत्रित समूह असतो. पिकाच्या अंतर्गत भागातील जैविक गुणवत्ता वाढवून पिकाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी मदत करते. हे ऊस पिकाची उपलब्ध नत्राची गरज भागवते, त्यामुळे नत्रयुक्त रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. रासायनिक खतांच्या कमी वापरामुळे उसातील साखर उताऱ्यात वाढ होते. वापर : प्रतिहेक्टरी फवारणी ३ लिटर प्रति ५०० लिटर पाणी वापरण्याची वेळ :
उसात लागवडीनंतर ६० दिवसांपासून मोठ्या बांधणीपर्यंत (१२० दिवस) खोडवा उसात ऊस तुटल्यानंतर ४५ दिवस ते मोठ्या बांधणीपर्यंत फवारणी सकाळी ११च्या आत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. पाचट व इतर सेंद्रिय पदार्थ विघटन करणारे जिवाणू : शेतातील वाया जाणारे पदार्थ उदा. पालापाचोळा, कचरा, उसाचे पाचट बरेच जण जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील जिवाणू नष्ट पावतात. जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचे सेंद्रिय पदार्थ वाया जातात. शेतातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन केल्यास उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. त्याच्या वापराने जमिनीची जैविक सुपीकता व पोत सुधारतो. जमीन भुसभुशीत होते. हवा खेळती राहून पिके चांगली वाढतात. उत्पादनात वाढ होते.
प्रमाण : २.५ लिटर प्रतिहेक्टरी (साधारणत: प्रतिहेक्टरी १० ते १३ टन पाचट निघते.)
द्रवरूप जिवाणू खते वापरावयाच्या पद्धती
बेणेप्रक्रिया : ॲसिटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खत १ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे किंवा बियाणे १० ते ३० मिनिटे बुडवावे. नंतर सावलीत वाळवून लागवड करावी. फवारणी : द्रवरूप जिवाणू खतांची पिकावर फवारणी केल्यास पिकाच्या अंतर्गत भागात ते अधिक परिणामकारक ठरतात. फवारणीसाठी प्रतिहेक्टरी फवारणीसाठी वापरावयाचे जिवाणू मिश्रण ३ लिटर प्रति ७५० लिटर पाणी याप्रमाणात वापरावे. रोपप्रक्रिया : रोपाची मुळे बुडतील इतके पाणी घ्यावे. त्या पाण्यात प्रतिलिटरला १० मि.लि. द्रवरूप जिवाणू खत मिसळावे. या द्रावणात मुळ्या १० ते २० मिनिटे बुडवाव्यात व नंतर पुनर्लागवड करावी. जमिनीत वापर : जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिहेक्टरी २.५ लिटर प्रति ७५० लिटर पाणी किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट खत/ माती यात मिसळावे. ते जमिनीत सर्वत्र सारखे पसरले जाईल असे फवारावे किंवा मिसळावे. झारी, फवारणी पंप किंवा सूक्ष्म सिंचन संच प्रणालीद्वारे द्रवरूप जिवाणू खतांची मात्रा वापरता येते. गांडूळ खत आणि कंपोस्ट खत संवृद्धीकरण : प्रतिटन गांडूळ खतासाठी जमिनीत वापरावयाचे द्रवरूप जिवाणू मिश्रण १ लिटर याप्रमाणात वापरावे. द्रवरूप जिवाणू खतांचे फायदे :
द्रवरूप जिवाणू खतात काही जिवंत व सुप्तावस्थेतील जिवाणू, जिवाणूंचे उत्सर्जित होणारे स्राव यांचा वापर केला जातो. याशिवाय पेशीसंवर्धक आणि पेशी संरक्षकांचाही वापर केला जातो. ही खते प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा पिशवीत निर्जंतुक वातावरणात हवाबंद केली जातात. त्यामुळे ती जास्त काळ टिकविता व वापरता येतात. त्यातील जिवाणूंची संख्या दोन वर्षांपर्यंत कमी होत नाही. द्रवरूप खते संपृक्त स्वरूपात असतात, त्यामुळे त्यांची मात्रा कमी प्रमाणात लागते. पिकांच्या उगवणीमध्ये ८ ते २२ टक्के वाढ होऊन मुळांची वाढ चांगली होते. नत्र, स्फुरद, पालाश, गंधक व इतर मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी रासायनिक खतांची २५ ते ५० टक्के बचत होते. पीकवाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जिब्रॅलिक ॲसिडमुळे उगवण शक्ती वाढते. जमिनीची जैविक सुपीकता वाढते. जमिनीचा पोत सुधारून पाणी वापर कार्यक्षमता वाढते. पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते. पिकांची उगवण क्षमता, फुटवे येण्याची क्षमता, मुळांची संख्या, फूल व फळ धारण करण्याची क्षमता वाढते. उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते, त्याची प्रत सुधारते. द्रवरूप डिकंपोझिंग कल्चर जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, त्यामुळे कर्ब व नत्र यांचे गुणोत्तर सुधारते. काही जीवाणूंनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते. पिकाची रोग व कीड प्रतिकार क्षमता वाढते. द्रवरूप जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी :
द्रवरूप जिवाणू खते सावलीत ठेवावीत (२५ ते ३० अंश सेल्सिअस) द्रवरूप जिवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक बुरशीनाशक तसेच इतर रसायनांमध्ये मिसळू नये. बियाणे प्रक्रियेसाठी प्रथम बुरशीनाशक मग कीटकनाशक व त्यानंतर द्रवरूप जिवाणू खताची प्रक्रिया करावी. द्रवरूप जिवाणू खते वापरासंबंधी जी अंतिम तारीख दिलेली असते, त्यापूर्वीच ती वापरावीत. संपर्क : ऋतुजा राजेंद्र मोरे, ९६५७९८२५८४. (शास्त्रज्ञ व विभागप्रमुख, कृषिसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)