सर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ म्हणून अंड्याचा रोजच्या आहारात समावेश आवश्यक आहे. अंड्यामध्ये असणाऱ्या उपजत पौष्टिक घटकांबरोबरच मूल्यवर्धन प्रक्रिया करताना अंड्यामध्ये नसणारी, पण शरीरासाठी आवश्यक पोषक द्रव्ये आणि घटकांचा समावेश करता येतो. प्रक्रियेची गरज
उन्हाळी हंगामात वाढीव तापमानामुळे अंडी लवकर खराब होतात. ती जास्त दिवस साठवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित किंमत व बाजारपेठ मिळत नाही. कुक्कुटपालकांना तोट्याला सामोरे जावे लागते. अंड्यामध्ये असणाऱ्या उपजत पौष्टिक घटकांबरोबरच मूल्यवर्धन प्रक्रिया करताना अंड्यामध्ये नसणारी, पण शरीरासाठी आवश्यक पोषक द्रव्ये आणि घटकांचा समावेश करता येतो. भारतामध्ये अंडी साठवणुकीसाठी अपुरी शीतगृह व्यवस्था व शीत वाहतुकीची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे अंड्यांचे मूल्यवर्धन हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. शासनाच्या “आत्मनिर्भर भारत” या उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी विविध पशू उत्पादनाच्या मूल्यवर्धनाशी निगडित व्यवसाय सुरु करण्यामध्ये अनुदान, कौशल्य, प्रशिक्षण या स्वरूपात मदत मिळण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. अंड्यापासून बनवला जाणारा जॅम हा सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फळांच्या जॅमला एक उत्कृष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. हा जॅम बनवताना अंड्यामधील पिवळा आणि पांढरा बलक वापरला जातो. जॅममध्ये साधारणतः ४१ ते ४३ टक्के ओलावा, १४ ते १६ टक्के प्रथिने आणि १२ ते १८ टक्के तंतुमय पदार्थांचे प्रमाण असते. हा पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट आणि जास्तीतजास्त पौष्टिकतत्त्वे असणारा आहे. अंड्यापासून बनवलेला जाम हा मधुमेह असणाऱ्या लोकांना फायदेशीर ठरू शकतो. त्यामध्ये कुठल्याही कृत्रिम रंग व गंधाचा वापर केला जात नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या कृत्रिम शीतपेयांपेक्षा अंड्यापासून बनवलेले शीतपेय हे शरीरासाठी आरोग्यकारक व पौष्टिक पर्याय आहे. हे बनविताना त्यामध्ये एक भाग अंड्यापासून बनवलेली पावडर व चार भाग पाणी मिसळले जाते. हे मिश्रण मिक्सरमध्ये योग्य प्रमाणामध्ये मिसळले जाते. याला चव व स्वाद आणण्यासाठी आंबा, लिंबू, केसर, अननस व संत्री यांचा रस मिसळावा. या शीतपेयांमध्ये चार ते सहा टक्के प्रथिने, दोन ते तीन टक्के स्निग्धांश असतो. बाजारात मिळणाऱ्या पारंपरिक शीतपेयांपेक्षा अंड्यांपासून बनवलेले शीतपेय खूप स्वस्त पर्याय आहे. बाजारामध्ये दुधापासून बनवलेले पनीर हे एक पौष्टिक अन्नपदार्थ म्हणून आहारात वापरले जाते. त्याला तेवढ्याच चांगल्या प्रतीचा दुसरा पर्याय म्हणून अंड्यापासून बनवलेले पनीर पुढे येत आहे. अंड्यापासून पिवळ्या बलकाचा वापर करून, पांढऱ्या बलकापासून तसेच पिवळ्या व पांढऱ्या बलकाच्या एकत्रित मिश्रणापासून पनीर बनवले जाऊ शकते. अंड्यापासून बनवलेल्या पनीरमध्ये २१ ते २४ टक्के प्रथिने असतात. अंड्यापासून बनविलेल्या पनीरचा उपयोग अंडी फिंगर्स, एग कटलेट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिश मध्ये मुख्य पदार्थ म्हणून वापर केला जाऊ शकतो. अंड्यापासून बनवलेली चटणी ही आंबट, गोड, खारट आणि तिखट असते. ही संपूर्ण प्रक्रिया अंड्यामधील पांढरा आणि पिवळा बलक यापासून विकसित केलेली आहे. यामध्ये १५ ते १७ टक्के प्रथिने असतात. अंड्याची चटणी बनवल्यानंतर ती शीत तापमानाला (४ अंश सेल्सिअस) सहा महिन्यापर्यंत टिकून राहू शकते. अंड्याची चटणी बनवताना त्यामध्ये कुठलेही कृत्रिम रंग वापरत नाहीत. त्यामुळे या पदार्थाला बाजारामध्ये चांगली मागणी आणि किंमत मिळू शकते. इतर पदार्थ अंडी सलामिस, अंडी चिप्स, अंडी कोफ्ता, अंडी कटलेट्स, अंडी पराठा, अंडी रोल अशी इतर अनेक उत्पादने अंडी प्रक्रिया करून बनविली जाऊ शकतात. त्यांना बाजारपेठेत मागणी वाढत आहे. गुणवत्तेनुसार उच्चतम मूल्य मिळू शकते. - डॉ. राजेश वाघ, ७२७६१४७१३७ (सहायक प्राध्यापक, पशुजन्य पदार्थ प्रक्रिया विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, लुधियाना, पंजाब)