सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खतास खूप महत्त्व आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम आणि सूक्ष्मद्रव्ये इत्यादींचे प्रमाण अधिक असते. खतनिर्मितीसाठी गांडूळ जाती आयसेनिया फिटेडा
या गांडुळांचा रंग गर्द लाल आणि ३ ते ४ इंच असते. सरासरी आयुष्यमान ३ ते ४ वर्षे असून, यांचे वर्षभर प्रजनन चालते. हे गांडूळ रेतीच्या स्वरूपात विष्ठा टाकतात. त्यात ओलाव्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असते. रंग तांबूस तपकिरी असून, लांबी ४-५ इंच इतकी असते. सरासरी आयुष्यमान १ ते १.५ वर्षे असते. यांचे प्रजनन वर्षभर चालते. विष्ठा दाणेदार गोळ्यांच्या स्वरूपात टाकते. ओलाव्याचे प्रमाण ३०-३५ टक्के असते. गांडूळ खत तयार करताना गांडुळांच्या आवडीचे खाद्य पुरविणे आवश्यक असते. त्यामुळे गांडुळांचा वाढ आणि प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकाऊ भाग, प्राण्यांची विष्ठा (कोंबड्यांची विष्ठा वगळता) कंपोस्ट खत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडुळाचे आवडीचे आहेत. शेणखतामध्ये गांडुळांची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे झाडांची मुळे ती सहजपणे घेऊ शकतात. मातीची पाण्याचा निचरा होण्याची क्षमता, तसेच जमिनीची जलधारण क्षमता वाढते. जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती
गांडूळ खतनिर्मितीसाठी आपल्या सोयीनुसार वरीलपैकी एका पद्धतीची निवड करावी. गांडूळ खतनिर्मिती करण्यासाठी गोठ्याच्या जवळ उंचावरील पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हापासून गांडुळांचे संरक्षण होण्यासाठी खतनिर्मितीच्या जागी सावली आवश्यक असते. त्यासाठी सिमेंटच्या पत्र्याचे किंवा शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या तुराट्या, ज्वारीचे ताटे, गवत, पाचट किंवा बांबूचा वापर करून छत तयार करावे.
बेड तयार करताना जमिनीवर सर्वांत खाली तळाला १५ सेंमी जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा थर द्यावा. उदा. उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन, तूर, भुसा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इत्यादी. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती ३ः१ प्रमाणात मिसळून त्याचा १५ सेंमी जाडीचा थर द्यावा. (हा थर उष्णता थांबवण्याचे काम करील.) पाण्यामध्ये शेण कालवून त्याचा १० सेंमी जाडीचा तिसरा थर द्यावा. शेणामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि ते गांडुळांस खाद्य म्हणून उपयोगात आणता येईल. शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालून तो ओला करावा. हे आच्छादन १५ सेंमीपेक्षा जास्त जाडीचे नसावे. आवश्यकतेप्रमाणे दररोज किंवा दिवसाआड बिछान्यावर पाणी शिंपडावे. बिछान्यातील उष्णता कमी झाल्यावर एक दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला करून किमान १ हजार प्रौढ गांडुळे सोडावीत. गांडुळांची संख्या कमी असेल, तर खत तयार होण्यास जास्त वेळ लागतो. गांडुळांच्या संख्येनुसार गांडूळ खतनिर्मितीस दीड ते दोन महिने लागतात. खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे. - संजय बडे, ७८८८२९७८५९, (कृषी विद्या, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, जि. औरंगाबाद)