तूर, कापूस या पिकामध्ये दोन ओळींनंतर आणि बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये ४ ते ६ ओळींनंतर सरी काढावी. या सरीमुळे पावसाचे पाणी जमिनीतील पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. सध्या ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद पिकाची चांगली वाढ चांगली दिसून येत आहे. पुढील काळात पावसाचा खंड पडल्यास त्यासाठी मूलस्थानी जल संधारण करणे आवश्यक आहे. सध्या वापसा स्थितीमध्ये कोळपणी व नोंदणीची कामे सुरु आहे. थोड्या कालावधीत खूप जास्त पाऊस पडल्यास पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत जाऊन नदी, नाले व ओढ्याद्वारे वाहून जाते. याचबरोबरीने सकस मातीची धूप होते. कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबविणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे पिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीमध्ये उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढावी, आच्छादनाचा वापर करावा. पिकावर रसायनांची फवारणी करावी, रुंद वरंबा-सरी पध्दतीचा वापर करावा. जैविक बांध, उताराला आडवी पेरणी आणि बंदिस्त सरी पाडणे यासारख्या बाबींचा कोरडवाहू शेतीत मूलस्थानी जलसंधारणासाठी अवलंब करावा. उभ्या पिकात ठराविक ओळींनंतर सरी काढणे
आच्छादनाचा वापर फळबागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवना मार्फत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. आच्छादनासाठी सोयाबीन भुसा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, हरभऱ्याचा भुसा इत्यादींचा वापर करता येतो. आच्छादन करताना उभ्या पिकात मशागतीची कामे झाल्यानंतर दोन ओळीत जमिनीवर समप्रमाणात पसरावे. यासाठी भुश्याचे प्रमाण २.५ ते ५ टन प्रति हेक्टरी ठेवावे. आच्छादनामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकावर रसायनाची फवारणी करणे पावसाचा खंड कालावधी ६ ते १२ दिवसाचा झाल्यावर लगेच पोटॅशिअम नायट्रेटची २ टक्के किंवा डिएपी २ टक्के फवारणी किंवा युरियाची २ टक्के फवारणी करावी. पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी केल्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होते. तसेच पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होतात यामुळे उत्पादनात ६ ते ८ टक्के वाढ दिसून आली आहे. रुंद वरंबा-सरी पद्धत
जैविक बांध
उताराला आडवी मशागत जमिनीला नियमीत उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी. अशा जमिनीवर मशागतीची सर्व कामे जसे नांगरणे, वखरणे, कोळपणी करणे तसेच पेरणी यासारखी कामे उताराला आडवी केल्यास, जमिनीच्या भुपृष्टावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो व जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते आणि जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. संपर्क ः डॉ.वा.नि.नारखेडे, ७५८८०८२१८४ (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.