तापमानात वाढ होण्यास सुरुवात

किमान व कमाल तापमानात वेगाने होणारी वाढ ही हवेचे दाब कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. हवेचे दाब कमी होणे, तापमानात वाढ होणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे या बाबी आठवडाभर आधीच होत असल्याने प्रखर उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होत आहे.
weekly weather
weekly weather

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी झाला आहे. मध्य व उत्तर भारतातील हवेचे दाब १००८ ते १०१० हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. किमान व कमाल तापमानात वेगाने होणारी वाढ ही हवेचे दाब कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. हवेचे दाब कमी होणे, तापमानात वाढ होणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे या बाबी आठवडाभर आधीच होत असल्याने प्रखर उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होत आहे. या आठवड्यापासूनच नैॡत्येकडून वारे वाहण्यासाठी हवामान घटक अनुकूल बनत आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रखर उन्हाळा जाणवण्याची शक्‍यता आहे. हवामान बदलाचा प्रभाव उन्हाळी हंगामात कमी प्रमाणात जाणवेल. मार्च महिनाअखेरपर्यंत ला निनाचा प्रभाव अल्पशा प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात अवेळी व अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान स्थिती अशीच राहिल्यास या वर्षाचा मॉन्सून वेळेवर येणे शक्‍य आहे. या आठवड्यात वाऱ्याचा वेग सर्वसाधारणच राहील. कोकण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ तर उर्वरित जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत ५३ ते ६५ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८४ टक्के राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते २८ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४१ ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी आणि दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र कमाल तापमान नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के, तर  धुळे, जळगाव जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११  किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस, तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात ३५ टक्के, लातूर जिल्ह्यात २५ टक्के, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ टक्के राहील. उर्वरित बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ती १४ ते १९ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ११ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा काही जिल्ह्यांत आग्नेयेकडून तसेच नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, अकोला, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १४ टक्के तर दुपारची ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.  वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ कमाल तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ टक्के राहील. कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाणात घट होईल. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. पूर्व विदर्भ कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते २९  टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी आणि दिशा आग्नेयेकडून  राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ७१ टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २६ ते ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील. हवामान कोरडे राहील. कृषी सल्ला 

  • तापमानामध्ये वाढ होत असल्याने दुभत्या जनावरांना तसेच इतर जनावरांना दिवसातून ३ ते ४ वेळा पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे. पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे.
  • शेडनेटमध्ये कोथिंबीर, चुका, चाकवत, पालक, चवळी या भाजीपाला पिकांची लागवड करावी.
  • कोंबड्यांना लसीकरण करावे, तसेच स्वच्छ, निर्जंतुक पाणी पिण्यास द्यावे.
  • उन्हाळी बाजरी, तीळ, मूग, नाचणी इत्यादी पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्यात.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com