सद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा पेरणी केलेला गहू आहे. वेळेवर पेरणी केलेला गहू फुलोरा अवस्थेत असून, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाची मुकुटमुळे फुटण्याची किंवा कांडी धरण्याची अवस्था आहे. वाढीच्या टप्प्यानुसार पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. वेळेवर पेरणी केलेला गहू (नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा) :
गहू पिकाला एकूण पाच पाण्याच्या पाळ्यांची गरज असते. मात्र वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकात सध्या फुलोरा व चिकाची अवस्था आहे. यावेळी एक पाण्याची पाळी देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दाणे भरण्यास मदत मिळते. गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून तापमानात वाढ होत आहे. अशावेळी मध्यम किंवा पाण्याचा लवकर निचरा होणारी जमीन असल्यास पाण्याची अतिरिक्त पाळी देणे फायद्याचे ठरते. सद्यःस्थितीत ओंब्या बाहेर पडल्या आहेत. अशावेळी वारा नसताना पाण्याची पाळी द्यावी. कारण त्यामुळे गहू लोळण्याची शक्यता असते. ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. कारण त्यामुळे गव्हाच्या दाण्यांची चकाकी कमी राहून दर्जात घट होते. अशा अवस्थेत १९:१९:१९ (विद्राव्य खत) किंवा डीएपी २० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी केल्यास वेळेवर सिंचनाच्या जोडीला अन्नद्रव्यांची मात्रा मिळाल्याने दाण्याचा आकार वाढून चकाकीही वाढते. उशिरा पेरणी केलेला गहू (१५ डिसेंबरदरम्यान पेरणी) :
उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला जास्त काळ उष्ण तापमानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या पिकाला दर पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. म्हणजे एकूण काळात पाण्याच्या ५ पाळ्या (नियमित ४ अधिक अतिरिक्त १) द्याव्या लागतील. पाण्याच्या दोन पाळ्यांदरम्यान जास्त अंतर राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण जमीन कोरडी पडल्यास उंदरांचा त्रास होण्याची शक्यता असते. वाढीच्या विविध अवस्थांमध्ये फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खतांची फवारणी करावी. पेरणीनंतर ५५ व्या व ७० व्या दिवशी १९:१९:१९ हे विद्राव्य खत २० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संपर्क : डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)