गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून तापमानात वाढ होत आहे. अशा वेळी गहू पिकाला मध्यम किंवा पाण्याचा निचरा होणारी जमीन असल्यास पाण्याची अतिरिक्त पाळी देणे फायद्याचे ठरते. उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये सध्या ओंब्या बाहेर पडल्या आहेत. अशा वेळी वारा नसताना पाण्याची पाळी देणे लाभदायक ठरेल, अन्यथा गहू लोळण्याची शक्यता असते. ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. त्यामुळे गव्हाच्या दाण्याची चकाकी कमी होते. एकूणच गहू दर्जात घट होते. अशा अवस्थेत १९:१९:१९ (विद्राव्य खत) किंवा डी.ए.पी. २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सिंचनाच्या जोडीला अन्नद्रव्यांची मात्रा मिळाल्याने दाण्याचा आकार वाढून चकाकीही वाढण्यास मदत होते. कापणी व मळणी नियोजन
वेळेवर पेरणी झालेल्या गव्हामध्ये साधारणतः ११०-१२० दिवसांमध्ये गहू पक्व होतो. काही गहू जातींचे दाणे पीक पक्व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. गहू पीक कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाच वेळी कंबाइन हार्वेस्टरच्या साह्याने करता येते. गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी यांच्यापासून मुक्त अशा स्वच्छ व सुरक्षित जागेची निवड करावी. गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्रा किंवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा. पोत्यात धान्य भरणार असल्यास पोती स्वच्छ, साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या चादरीवर ठेवावीत. साठवणुकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यातील ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे. त्यासाठी मळणीनंतर गव्हास ३ ते ४ दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड झाल्यानंतरच त्याची साठवण करावी. साठवणीतील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा. पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरताना गहू बियाण्यास प्रति किलो १० ग्रॅम वेखंड भुकटीची बीजप्रक्रिया करावी. खपली गव्हाची कापणी शक्यतो सकाळी करावी. सकाळी वातावरणात ओलावा असल्याने ओंब्या गळून पडत नाहीत. दुपारी तापमान वाढलेले असल्याने ओंब्या गळण्याची शक्यता जास्त असते. काढणी केल्यानंतर पेंढ्या एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवाव्यात. त्यानंतर मळणी यंत्राने मळणी करावी. अलीकडे कंबाइन हार्वेस्टरमध्ये योग्य ते बदल करूनही खपली गव्हाची काढणी करता येते. तयार केलेली खपली उन्हात चांगली वाळवून पोत्यात अगर कोठीत ठेवावी. घरी खाण्यासाठी लागेल तशी भरडून आणावी. भरडताना जास्त तुकडे होऊ देऊ नयेत. संपर्क - डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर, ८३७४१७४७९७ (अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आनुवंशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.)