पीक उत्पादनाचा ३० ते ४० टक्के खर्च शेती मशागत, आंतरमशागत, कापणी आणि मळणी यावर होतो. सुधारीत अवजारे व यंत्राचा वापर केल्यास शेतीच्या या कामावरील खर्च १५ ते २० टक्क्यांवर आणू शकतो, तसेच उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी वाढवू शकतो. कोणतेही पीक घ्यायचे असले तर पूर्वमशागतीसाठी आधुनिक अवजारे, आधुनिक पेरणी यंत्र, पीक संरक्षण व आंतरमशागतीसाठी अवजारे, पीक कापणी आणि मळणी साठी आधुनिक यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो. रोटाव्हेटर
रोटाव्हेटर हा ट्रॅक्टर चलित असून यामध्ये J किंवा L आकाराचे २४ ते २६ लोखंडी पाते बसविलेले असतात. याची लांबी १२० ते १५० सें.मी. असते. रोटाव्हेटरच्या वापरामुळे जमिनीची नांगरणी व कोळपणी एकदम केली जाते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. या सोबतच जमिनीवर पडलेले पाचटही लहान तुकडे करून जमिनीमध्ये मिसळले जाते. त्यामुळे जमिनीमध्ये कंपोस्ट खत तयार होते. एका तासात या अवजाराने ०.३ हे क्षेत्राची मशागत होते. नांगरणी नंतर तयार होणारी मोठी ढेकळे फोडून जमीन पेरणी योग्य करण्यासाठी तव्यांच्या कुळावाचा उपयोग होतो. ताव्यांचा व्यास ४० ते ६० सें.मी. असून ते १५ ते २० सें.मी. अंतरावर लावलेले असतात. ट्रॅक्टरचलित हवा दबाव आधारीत टोकण यंत्र
यंत्रामुळे पेरणीदरम्यान दोन ओळीतील अंतर, खोली व रोपातील अंतर अचूकपणे साधणे शक्य होते. हे यंत्र भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले आहे. ३५ ते ४५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला हे यंत्र जोडता येते. याची कार्यक्षमता ०.५ ते १.० हे प्रती तास आहे. या यंत्राने ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, भेंडी इत्यादी पिकाची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. बियाण्याचे असमान वाटप, कुशल मजुरांची अनुपलब्धता व कमी कार्यक्षमता याचा विचार करून रुंद वरंबा व सरी यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र सोयाबीन, तूर, मका, हरभरा, भुईमूग, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, वाटणा, गहू इत्यादी पिकाच्या टोकन पद्धतीने पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या तबकड्या असून त्या सहज बदलता येतात. प्रत्येक ओळीसाठी फण असल्यामुळे बियाणे व खतांची योग्य प्रकारे पेरणी करता येते. दोन फणातील अंतर आवश्यकतेनुसार ९ ते १८ इंचापर्यंत ठेवता येते. यंत्राच्या दोन्ही बाजूंना सरी यंत्र असल्यामुळे पेरणी करताना सरी पाडल्या जातात. या सरींमुळे कमी पाऊस पडल्यास जल संवर्धन होते तर जास्त पाऊस पडल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. उत्पादन वाढण्यास मदत होते. हे यंत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विकसित करण्यात आले आहे. या कोळप्याला V आकाराचे पाते असून एका वेळी ३ ते ५ ओळीतील गवत काढले जाते. एका दिवसात ६ ते ७ हेक्टर क्षेत्र पूर्ण करता येते. ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या क्षेत्रासाठीच हे कोळपे उपयुक्त आहे. पिकाच्या ओळी सरळ असल्यामुळे आंतर मशागत पूर्ण होऊन पिकाची हानी कमी होते. या कोळप्यामुळे शेताची कोळपणी लवकर पूर्ण होते. तणाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते, मातीचे रोपांना आच्छादन होऊन आधार सुद्धा मिळतो. कोळपणीचा वेळ व खर्च कमी होतो. हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने हे कोळपे विकसित केले आहे. ट्रॅक्टरवर पी.टी.ओ.च्या साह्याने चालणारे यंत्र आहे. यात ४०० लिटर द्रावण क्षमतेची टाकी बसवलेली असते. यंत्राच्या साहाय्याने पाहिजे तेवढे द्रावण प्रतिहेक्टरी फवारणी करू शकतो. यासाठी बूम स्प्रेअरवर कंट्रोल बसविलेले असते. याच्या साह्याने पाहिजे त्या दाबाने व पाहिजे तेवढ्या द्रावणाची फवारणी करता येते. एचटीपी पंपाच्या साह्याने योग्य त्या दाबाने ५० ते १०० मायक्रोमीटर आकाराचे थेंब तयार होतात. फवारणी यंत्राच्या साह्याने एक दिवसात १० ते १५ हेक्टर क्षेत्रावर फवारणी करता येते. संपर्क : डॉ. एस. एस. वाणे, ९४२३४७३६२९, (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)