सकारात्मक विचारातून केली उत्तम शेती

सकारात्मक विचारातून केली उत्तम शेती
सकारात्मक विचारातून केली उत्तम शेती

लातूर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्ततेतही नावीन्याचा शोध आणि सकारात्मक विचारातून सतत पुढे जाण्याचा ध्यास असलेले महादेव बिराजदार यांनी शेतीमध्ये चांगले यश मिळवले आहे. विविध पिकांच्या प्रयोगातून मिळालेल्या आत्मविश्वासाने उत्तम शेती, शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. लातूर जिल्ह्यातील माळेवाडी (ता. उदगीर) येथील महादेव किशनराव बिराजदार यांच्याकडे पंचवीस एकर शेती आहे. या मध्यम, भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये भाजीपाल्यासह आले, हळद यांसह विविध भाजीपाला पिके घेतात. लहानपणापासून महादेव आपले वडील आणि चुलत्यांची शेती पाहत मोठे झाले. त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगातून शेतीची आवड हाडीमाशी भिनली. परिणामी शाळेत लक्ष कमी अन्‌ शेतात जास्त राहायचे. विभक्त झाल्यानंतर वडिलांच्या मदतीला म्हणून अठराव्या वर्षीच शेतीत उतरले. भाजीपाला लागवड - उदगीर शेजारीच गाव असल्याने गावात भाजीपाल्याची शेती पूर्वापार केली जाते. प्रत्येकाकडे किमान दहा-वीस गुंठे भाजी असतेच. गेल्या वीस वर्षांपासून महादेव तीन ते पाच एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड करतात. त्यांच्याकडे वांगी, मेथी, कांदे आणि कोबी यांसारखी पिके असतात. घेतलेल्या प्रत्येक पिकातून अधिक उत्पादन काढण्याची इर्ष्या असते. उत्तम दर्जा आणि सातत्य यामुळे चांगला दरही मिळतो. आले आणि हळद लागवड -

  • दरवर्षी महादेव यांच्याकडे आले आणि हळद ही पिके असतात.
  • गेल्या वर्षी ४ एकर क्षेत्र. ४ फूट गादीवाफ्यामध्ये माहिम जातीच्या आल्याची (अद्रक) ६ बाय ५ फूट अंतरावर लागवड.
  • हळद - गेल्या वर्षी दीड एकर क्षेत्र. सेलम जात. ४.५ फुटावर लागवड. या वर्षी त्यातील ४० क्विंटर बेण्याची चार एकरवर साडेचार फूट सरीवर ठिबकच्या मदतीने लावले. कंदप्रक्रिया करून लागवड केल्याने उगवण चांगली होते. कंद व मूळकूज होत नाही.
  • आले व हळद पिकांसाठी शेणखत, जीवामृत यांचा भरपूर वापर केला जातो.
  • सात एकरांमध्ये वनशेती...

  • जून २०१६ मध्ये चंदनाची १० बाय १० फुटांवर सुमारे ४५० झाडे लावली.
  • त्यात १० बाय १० फुटांवर ४५० झाडे मिलिया डुबिया लागवड ठिबकवर केली. मिलिया डुबिया पाच महिन्यांत १५ फूट वाढले आहेत. हे झाड सॉफ्ट वूड म्हणून प्लायवूड, काडीपेटीची काडी, पेपर निर्मितीसाठी उपयुक्त. सात वर्षांत एका झाडापासून २५ फूट उंच व एक फूट घेराचे १० क्विंटल वजनाचे लाकूड मिळते. त्याच्या मुळावर चंदनाची वाढ चांगली होते. चंदन १५ वर्षांत काढणीला येते.
  • त्याचप्रमाणे सुगंधी अगरवूडची ५ बाय ५ फूट अंतरावर सुमारे १००० झाडे लावली.
  • या बागेतच तूर लावल्याने तो बोनस होणार आहे.
  • आजी, वडील यांचा आदर्श ः

  • लहाणपणापासून आजीसोबत शेतीमध्ये कामे केल्याने तिचा आदर्श ठेवला आहे. ‘‘कोणत्याही कामात मागे हटायचे नाही. पुढेच बघायचे, म्हणजे अपयश येत नाही,’’ हा तिचा संदेश कायम ध्यानात ठेवल्याने प्रगती करू शकलो, असे महादेव सांगतात.
  • आज वयाच्या चाळिशीतही महादेव वडिलांचा एक शब्दही खाली पडू देत नाहीत.
  • महादेव यांचे दुसरे बंधू जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. वडील महादेवला शेती कामात मदत करतात. आज त्यांच्याकडे दोन बैल, गाई, म्हशी अशी दहा जनावरे असून, किमान ४० देशी गाईंचा आधुनिक गोठा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. दूध व कालवडी विक्रीचा व्यवसाय शेतीला पूरक ठरेल.
  • ही आहेत महादेव यांची वैशिष्ट्ये

  • कोणत्याही नफ्या तोट्याने वाहवत जात नाहीत.
  • नवी पिके घेण्याचे धाडस दाखवतात. १५ वर्षांपूर्वी परिसरात पहिल्यांदा आले, केळी, द्राक्षे, पपई, डाळिंब यांसारखी पिके त्यांनी घेतली.
  • परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी सतत संपर्कातून मैत्री जोडली आहे. एकमेकांच्या व अन्य भागांतील प्रयोगांना भेटी देतात. कृषी विभाग व कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या कायम संपर्कात राहतात.
  • मागील तीन वर्षे अवर्षणाच्या स्थितीतही शेती उत्तम राखली. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी कृषी विभागाकडून ४४ बाय ४४ बाय ५ मीटर आकाराचे एक कोटी लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे आच्छादनाचे शेततळे घेतले आहे.
  • नुकत्याच जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकारी, केव्हीके, व विद्यापीठातील तज्ज्ञांच्या चमूने त्यांच्या शेताची पाहणी केली. हळदीचे पाच फूट आलेले रोगमुक्त पीक पाहून समाधान व्यक्त केले. हळद व आले लागवडीतील इंगित सांगताना ते म्हणाले, की लागवडीसाठी वजनदार, टपोरे व ताजे कोंब लावल्यास हळद, आले पीक तजेलदार येते. उंच व सशक्त असल्याने रोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. परिणामी उत्पादनात वाढ होते. परिसरामधील शेतकऱ्यांनी आगाऊ पैसे देऊन सुमारे दहा टन हळद बेण्याचे बुकिंगही केले आहे. पुढील टप्प्यात सेंद्रिय हळद पावडर तयार करण्याचा मानस आहे. सध्या असलेली पिके ः हळद - चार एकर, आले- दीड एकर, भाजीपाला पिके - दीड ते दोन एकर कांदा - तीन एकर, चंदन, मिलिया डुबिया, अगरवूड - सात एकर कोरडवाहू ज्वारी - दीड एकर ३ एकर क्षेत्रामध्ये दोन गोदामे, डाळमिल, गोठा आणि घर. गतवर्षीच्या पिकांचे उत्पादन व खर्चाचा ताळेबंद १) आले पीक - क्षेत्र - चार एकर उत्पादन - एकरी १५० क्विंटल, दर - दोन हजार रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च - घरचे बेणे असल्याने केवळ ५० हजारे रुपये प्रतिएकर. २) हळद क्षेत्र - दीड एकर उत्पादन - दीड एकरमधून १२५ क्विंटल ओली हळद मिळाली. त्यावर प्रक्रिया करून वाळवेल्या स्वरूपामध्ये ४२ क्विंटल हळद मिळाली. तिला ७५०० रु. प्रतिक्विंटल दर मिळाला. एकूण ८० क्विंटल बेणे उपलब्ध झाले. त्यातील ४० क्विंटल बेण्याची विक्री केली. उत्पादन खर्च - ६० हजार रुपये. ३) कांदा क्षेत्र - दोन एकर उत्पादन - एकरी १२.५ टन दर - ८०० रुपये प्रति क्विंटल. उत्पादन खर्च - एकरी २० हजार रुपये. डाळनिर्मिती व्यवसाय... पूर्वी घरातच डाळमिल असल्याने त्यात लहानपणापासून काम केलेले होते. त्यामुळे कुटुंब विभक्त झाल्यानंतरही चार वर्षांपूर्वी स्वतःची बॅंकेतून कर्ज घेत डाळमिल उभी केली आहे. त्याची क्षमता प्रतिदिन दहा टन इतकी आहे. पहिली दोन वर्षे त्यातून उत्तम नफा मिळाला असला तरी गेल्या दोन वर्षांमध्ये डाळनिर्मिती व्यवसाय अडचणीत आला आहे. मात्र, त्यांनी हार मानलेली नाही. संपर्क ः महादेव बिराजदार, ९४२२४६८९९३ (लेखक लातूर येथे कृषी विभागात कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com