बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन, ज्वारी, बाजरी, मका ठरतील पर्यायी पिके

बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन, ज्वारी, बाजरी, मका ठरतील पर्यायी पिके
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन, ज्वारी, बाजरी, मका ठरतील पर्यायी पिके

भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वातावरणामध्ये ज्वारी, बाजरी आणि मका यांसारख्या अन्नधान्य पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी स्थिर राहील. दरवर्षी त्यांच्या उत्पादनामध्ये अत्यल्प बदल होऊ शकतात. त्यातही दुष्काळाच्या वर्षामध्ये घट होऊ शकते. मात्र, भारताच्या मुख्य भात पिकाच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता कोलंबिया येथील विदाशास्त्र संस्थेतील संशोधकांनी व्यक्त केली आहे. कायले फ्रॅंकेल डेव्हिस हे पर्यावरण विदाशास्त्रज्ञ (एन्व्हायर्न्मेंटल डेटा सायंटिस्ट) असून, विकसनशील देशांमधील अन्नधान्य पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधन करत आहेत. त्यासाठी त्यांनी पर्यावरणशास्त्र आणि विदाशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून जागतिक अन्न व्यवस्थेच्या पॅटर्नचा अभ्यास केला आहे. त्यातून अन्नपुरवठा साखळी अधिक पोषक आणि शाश्वत बनविण्यासाठी धोरण विकसित करण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये विदाशास्त्र संस्थेमध्ये आल्यापासून त्यांचे सहलेखक म्हणून चार संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये विकसित होणाऱ्या राष्ट्रांमधील पिकांचे उत्पादन शाश्वतरीत्या सुधारण्यासंदर्भात विचार मांडले आहेत. नुकत्याच ‘एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सेन्सिटिव्हिटी ऑफ ग्रेन यील्ड टू हिस्टोरिकल क्लायमेट सेन्सिटिव्हिटी ऑफ इंडिया’ या संशोधनामध्ये त्यांनी भारत देशावर लक्ष केंद्रित केले आहे. १.३ अब्ज लोकसंख्येच्या देशामध्ये वातावरण बदलांमुळे नाचणी, मका, बाजरी, ज्वारी आणि भात या पाच मुख्य पिकांच्या उत्पादनावर होणारे परिणाम अभ्यासले आहेत.

  • जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळामध्ये या पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यात भात हे पीक तीन चतुर्थांश असते. पाच पिकांच्या साह्याने भारताची पोषकतेची गरज भागवली जाते.
  • भविष्यातील तीव्र वातावरणाशी बाजरी, ज्वारी आणि मका ही पिके बऱ्यापैकी जुळवून घेतील. त्यांच्या उत्पादनामध्ये दरवर्षी कमी अधिक तफावत राहील. दुष्काळी वातावरणामध्ये उत्पादनातील फरक अधिक राहील. मात्र, भारताचे मुख्य पीक असलेल्या भातांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.
  • डेव्हिस यांच्या मते, बदलत्या वातावरणामध्ये भातासारख्या एकाच पिकावर अवलंबून राहणे हे अन्नपुरवठ्याच्या दृष्टीने संवेदनशील होऊ शकते. भात पिकाऐवजी अन्य चार पर्यायी पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ केल्यास अन्नधान्य उत्पादनातील बदल कमी राहू शकतील. यातून सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येला दुष्काळ आणि तीव्र वातावरणामध्ये तग धरणे शक्य होईल.
  • भारतामध्ये तापमान आणि पावसाचे प्रमाण दरवर्षी बदलत असून, त्याचा पिकांवर परिणाम होतात. तीव्र वातावरण आणि दुष्काळी स्थितींची वारंवारिता वाढत असून, अशा धक्क्यापासून भारताचे पीक उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपाय शोधावे लागतील.
  • संशोधन

  • या अभ्यासासाठी संशोधकांनी १९६६ ते २०११ या ४६ वर्षांतील पिकांचे उत्पादन, तापमान आणि पाऊस यांची माहिती घेतली. भारतातील ७०७ जिल्ह्यांपैकी ५९३ जिल्ह्यांचा समावेश होता.
  • - तापमानाच्या प्रारूप माहितीसाठ्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट अॅंगलिया येथील वातावरण संशोधन केंद्र आणि पावसासाठी भारतीय हवामान विभागाच्या माहितीचा आधार घेतला.
  • हवामानातील बदलणाऱ्या घटकांशी उत्पादनांशी सांगड घातली. यातून दरवर्षी बदलणाऱ्या वातावरणाचा आणि पीक उत्पादनाचा नेमका संबंध काय असेल, याची मांडणी केली.
  • या बदलत्या वातावरणामध्ये एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा पर्यायी पिकांची लागवड वाढवणे हा चांगली उपाययोजना ठरू शकते. यातून वाढत्या लोकसंख्येची पोषकतेची गरज भागवताच पाणी व ऊर्जेची बचतही साधता येईल. कृषी क्षेत्रातून होणारे हरितगृह वायू उत्सर्जनही कमी होऊ शकेल.
  • या संशोधनामध्ये डेव्हिस यांच्यासह अश्विनी छत्रे, नरसिम्हा डी. राव, दीप्ती सिंग, रुथ डिफ्राईज यांचाही समावेश होता.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com