दुष्काळाच्या स्थितीमध्ये पाण्याचे महत्त्व सर्वांना जाणवते. मात्र, पाण्याची कमतरता असलेल्या २००५ ते २०१६ काळामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सेंट्रल अॅग्री फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी स्थानिक समुदायासोबत जल व मृद संधारणाची कामे मोठ्या प्रमाणात पार पाडली. सुरवातीला मध्य प्रदेशातील तिकमगढमध्ये केलेल्या कामांचे फायदे लक्षात घेता हे प्रारूप झांशी प्रांतातही राबवण्यात आले. त्याचा फायदा भूजल पातळीमध्ये वाढ होण्यासाठी झाला. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कमतरता दूर झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे शाश्वत उत्पादन शक्य झाले. कृषी वानिकी आधारीत नैसर्गिक स्रोत व्यवस्थापनाद्वारे पाणलोटाची कामे मध्य प्रदेशातील तिकमगढ जिल्ह्यातील गरहकुंदर- दाबर शिवारामध्ये करण्यात आली. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सेंट्रल अॅग्री फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांच्या आरेखनानुसार २००५ ते २०१६ या कालावधीतील तीव्र दुष्काळाच्या काळात केलेल्या कामांचे फायदे दिसून येत आहेत. पुढे अशाच प्रकारची कामे झांशी प्रांतातील बबिना येथील परासाई-सिंध पाणलोट विकासाची कामे २०११ ते २०१६ या कालावधीत केली. त्यासाठी स्थानिक समुदायासोबत इक्रिसॅट, हैदराबाद यांचेही सहकार्य मिळाले.
पावसाचे पाणी अडवणारी व जिरवणाऱ्या चेकडॅम, नालाबंध, बांधबंदिस्ती अशा विविध संरचना बांधण्यात आल्या. प्रति वर्ष १.२५ लाख घनमी बांधकामे करण्यात आली. शास्त्रीय पद्धतीने कामे झाल्यामुळे खर्चामध्ये १५ ते २० टक्के बचत झाली. त्याच प्रमाणे परिसरातील जमिनीमध्ये फळे आणि अन्य झाडांच्या उत्पादनामध्ये विविधता आणण्यात यश आले. सुमारे ११५ हेक्टर जमिनीमध्ये झाडे वाढली. जलसंवर्धनाच्या या कार्यक्रमामुळे भूजलाची पातळी २ ते ५ मीटरपर्यंत वाढली असून, अंतर्गत जलप्रवाहामध्ये २ ते ३ पटीने वाढ झाली. सलग काही वर्षे २५ ते ३० टक्के पर्जन्य कमी होऊनही दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही. अनेक ठिकाणी विहिरीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्याने १७६ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी हंगामात चारा पिकांची लागवड करता आली. विविध पिकांच्या उत्पादनाची पातळी २० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढली. चारा पिकाखालील क्षेत्र केवळ ४ हेक्टर होते, ते पाणलोटाच्या कामांनंतर वाढून ६० हेक्टरवर पोचले. त्याचा फायदा पशुपालन आणि उत्पादकतेला झाला. प्रत्येक कुटूंबाच्या उत्पन्नामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. परासाई - सिंध पाणलोट विकासाच्या कामाचा वापर २०१५ मध्ये जलस्रोत मंत्रालयाद्वारे जलक्रांती अभियान राबवण्यासाठी करण्यात आला. या ठिकाणी शासकीय कर्मचारी, अधिकारी यांबरोबरच शेतकरी, स्वयंसेवी संस्था यांची प्रशिक्षणे घेण्यात आली. पुढील टप्प्यामध्ये आसियान आणि सार्क देशातील शासकीय अधिकाऱ्यांसह केनिया, स्वीडन, अमेरिका आणि जर्मनी येथील अधिकारी व प्रशिक्षणार्थ्यांनी भेटी दिल्या. जल प्रारूपाचे फायदे सर्वांनाच...
पाणलोटाची कामे होण्यापूर्वी रब्बी हंगामामध्ये भूजल पातळी कमी असल्यामुळे कशीबशी एक दोन तास सिंचन करणे शक्य होई. १ हेक्टर गहू पिकाला सिंचन करण्यासाठी ४० ते ५० तास म्हणजेच कधी कधी १० ते १५ दिवस लागत. त्याचा उत्पादनावर परिणाम होईल. आता बहुतांश विहिरीतून १५ ते २० तासापर्यंत सिंचन करणे शक्य होते. सिंचनासाठी अडकून पडणारे मनुष्यबळ वाचले आहे. गहू पिकाचा उत्पादन हेक्टरी ६ ते ८ हजार रुपयांनी कमी झाला. पूर्वी दुष्काळी स्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दूरपर्यंत जावे लागत असे. आता गावातच विहिरी आणि कूपनलिकांना पाणी उपलब्ध होत असल्याने वेळ आणि कष्टामध्ये बचत झाली. कुटूंबाकडे व मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे शक्य होत आहे. हे पाणलोटाचे प्रारूप संपूर्ण बुंदेलखंड प्रांतामध्ये पाण्याची दुर्भिक्ष्यता कमी करण्यासाठी वापरता येऊ शकते. निती आयोगाने या प्रारुपाला उत्तम जल व्यवस्थापन असे संबोधले आहे.