माया संस्कृती लोप पावण्याच्या कारणांमध्ये या लोकांच्या मका आधारित आहाराला असलेले प्राधान्य याचाही समावेश संशोधक करत आहेत. यामुळे येथील बहुसंख्य लोकसंख्या दुष्काळासाठी संवेदनशील होऊन एकूण समाज कोसळून पडल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन ‘करंट अॅथ्रोपोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. सध्या वातावरण बदलामुळे आधुनिक समाजाला अनेक तीव्र समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी प्राचीन संस्कृती आणि समाज नेमका कशामुळे कोसळेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न पेनसिल्व्हानिया राज्य विद्यापीठातील पुरातत्त्व संशोधक क्लारे एबेर्ट, जुली हॉगर्थ, जैमी ओवे, ब्रेन्डन कुल्लेटन आणि डग्ल केनेट यांनी केला आहे. माया संस्कृतीतील लोक हे मका आधारीत आहाराला अधिक प्राधान्य देत होते आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर दुष्काळी स्थितीमध्ये त्यांची संवेदनशीलता वाढत गेल्याने एकूणच समाजच कोसळून पडल्याचा अंदाज त्यांनी काढला आहे.
क्लारे एबेर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी क्षेत्रामध्ये पिकांचे एकांगीकरण आणि पर्यावरणातील वाढती तीव्रता यांचा फटका त्यांच्या वाढत्या लोकसंख्येला बसला असावा. प्राचीन काळातील पिकांच्या आणि माणसांच्या या जुळवून घेण्याच्या क्षमतेचा अभ्यासातून मिळणारी माहिती ही आधुनिक समाजासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा उपयोग अचानक होणाऱ्या किंवा लक्षणीय बदलांना सामोरे जाताना होऊ शकतो. बेलिझ येथील काहाल पेच येथील माया संस्कृतीतील ५० मानवी थडग्यांचा अभ्यास करण्यात आला. तेथील घटकांच्या एएएस रेडिओकार्बन डेटिंग पद्धतीने वय आणि कालावधी मिळवण्यात आला. एबेर्ट यांनी या थडग्यातील हाडांच्या स्थिर कार्बन आणि नायट्रोजन आयसोटोपवरून त्यांच्या आहाराचे गुणधर्म मिळवले. काळानुसार त्यात झालेले बदल मोजण्यात आले. त्यातून त्यांच्या आहारामध्ये प्राधान्याने सी ४ पिकांचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसते. यात माया संस्कृतीमध्ये मुख्य पीक हे मका होते. या काळातील अभिजन आणि सामान्य यांच्या आहारामध्ये भिन्नता होती. सामान्य माणसांच्या आहारामध्ये मक्यासोबत जंगली पिके आणि शिकारीतून मिळवलेल्या प्राणीज मांसाचा समावेश होता. आहारातील या विविधतेमुळे माया संस्कृतीतील लोकांना अनेक शतके (ख्रिस्तपूर्व ३०० ते १००) धक्के पचवण्याची क्षमता दिली होती. मात्र, हीच स्थिती पुढे इ.स. ७५० ते ९०० या काळामध्ये बदललेली दिसते. येथील समाजातील उच्चवर्गाबरोबरच मोठी लोकसंख्या कृषी उत्पादनाकडे वळली आणि मक्यावर अवलंबून राहू लागली. दुष्काळाच्या दृष्टीने हे संवेदनशील पीक होते. त्याचा मोठा फटका या काळातील लोकांना बसला. आजही आधुनिक माणूस काही ठराविक पिकांवर अवलंबून राहत आहे. ही पिके वातावणासाठी अत्यंत संवेदनशील मानली जातात. या सर्व पिकांची संवेदनशीलता समजून घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करणे हे कृषी उत्पादक समाजाप्रमाणे आधुनिक औद्योगिक समाजासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती एबेर्ट यांनी दिली.