संशोधन : कॅन उघडण्याआधीच ओळखता येईल खराब दूध

कॅन उघडण्याआधीच ओळखता येईल खराब दूध
कॅन उघडण्याआधीच ओळखता येईल खराब दूध

वॉश्गिंटन राज्य विद्यापीठातील जैविक अभियांत्रिकी प्रणाली विभागातील संशोधकांनी दुधाचा गंध किंवा वास घेण्यासाठी खास सेन्सर विकसित केले आहेत. हे सेन्सर दूध चांगले आहे किंवा खराब हे ती पिशवी किंवा कॅन उघडण्याआधीच ओळखू शकतील. दुधासारख्या लवकर खराब होणाऱ्या उत्पादनांसाठी लेबलवरील अंतिम दिनांक ही अनेकवेळा फसवू शकते. दुधाच्या पिशवी किंवा कॅनमधील दूध उघडण्याआधीच खराब झालेले आहे किंवा नाही, याचा अंदाज ते उघडण्याआधीच मिळवणे नव्या सेन्सर्सद्वारे शक्य होऊ शकते. याविषयी वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या सेन्सरमध्ये रासायनिक आवरण असलेले नॅनो कण असतात. ते दुधातील जिवाणूंच्या वाढीमुळे तयार होणाऱ्या विशिष्ट वायूशी प्रक्रिया करतात. ही जिवाणूंची वाढ म्हणजे दूध खराब होण्याचे लक्षण मानले जाते, अशी माहिती श्याम साबलानी यांनी दिली. या सेन्सरचा प्रत्यक्ष दुधाशी कोठेही संपर्क होत नाही. कोणताही पदार्थ खराब होत असताना त्यातून विशिष्ट अशी हवेत विरघळणारी संयुगे तयार होतात. त्यामुळे त्या पदार्थास उग्र किंवा विशिष्ट असा वास येतो. हा प्रामुख्याने त्या पदार्थामध्ये वाढलेल्या जिवाणूंमुळे येत असतो. मात्र, माणसाला तो वास येण्यासाठी दुधाचा कॅन उघडून पाहावा लागतो. त्या तुलनेमध्ये सेन्सर हे हवेत विरघळणाऱ्या अत्यंत सूक्ष्म प्रमाणातील वायूचा आणि बदलणाऱ्या रंगाचा वेध घेतात. दूध किंवा पदार्थ खराब होण्याच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये असतानाच ओळखणे शक्य होणार आहे. या सेन्सरच्या प्रयोगशाळेमध्ये नियंत्रित वातावरणात झालेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हे संशोधन जर्नल फूड कंट्रोलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. दूध खराब होण्यासाठी किती कालावधी शिल्लक आहे, हे स्पष्ट दिसण्यासाठी संशोधकांचा पुढील प्रयत्न चालू आहे. सध्या सेन्सर केवळ दूध चांगले आहे की खराब एवढेच दर्शवतात. भविष्यामध्ये अन्न उद्योगामध्ये सेन्सर्स किती प्रकारे मदत करू शकतील, याविषयी साबलानी भाकित करतात. त्यांच्या मते, भविष्यामध्ये दुधाच्या कॅनच्या झाकणांमध्येच त्यांचे सेन्सर्स बसवलेले असतील. ते आतील उत्पादन किती काळ ताजे राहणार आहे याचा अंदाज ग्राहकांना देऊ शकतील. पदार्थांची अंतिम तारीख ः उत्पादनावरील पदार्थ चांगला असल्याबाबतची अंतिम तारीख ही त्या पदार्थाची साठवण, वाहतूक आणि प्रत्यक्ष दुकानातील वातावरण यांसह हाताळणी या सर्व स्थिती उत्तम असतील या गृहितकांवर आधारित असतात. साबलानी म्हणाले, की अतिशय योग्य प्रकारे साठवलेल्या आणि हाताळलेल्या शीत किंवा गोठवलेल्या उत्पादनांची अंतिम तारीख ही अचूक राहू शकते. उर्वरित सर्व पदार्थांच्या अंतिम तारखा या प्रयोगशाळेतील परिस्थितीनुरूप ठरवलेल्या असतात. मात्र, सुपर मार्केट, दुकाने आणि तिथून घरी आणल्यानंतर प्रत्येक ठिकाणी रेफ्रिजरेटरचे तापमान बदलत राहणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. त्यामुळे अंतिम तारीख ही अचूक असतेच असे नाही. त्या आधीही आतील पदार्थ खराब होऊ शकतात. काही वेळा केवळ अंतिम तारीख उलटली म्हणून चांगल्या असलेल्या अन्नांची पाकिटांची विल्हेवाट लावली जाते, त्यामुळे अन्नाची नासाडी होते. हे सर्व नव्या सेन्सर तंत्राने टाळणे शक्य होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com