भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहास

भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहास
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहास

जागतिक मधमाश्‍या दिन विशेष

भारतीय उपखंड हे मधमाश्‍यांचे उगमस्थान असून, आजही चार प्रकारच्या मधमाशा नैसर्गिकरित्या आढळतात. साखरेआधी माहीत असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. मध व मधमाश्‍यांचं प्राचीनत्त्व संस्कृत ग्रंथ, पुरातत्त्व शास्त्र, आयुर्वेद यांमुळे निश्‍चित करता येते. मात्र, आधुनिक मधमाश्‍यापालनाचे तंत्र भारतात उशिरा आले. जंगली मोहोळांतून अशास्त्रीय पद्धतीने मध गोळा केला जाई. १९०५ मधील सी. सी. घोष यांच्या वार्तांकनानुसार कलकत्त्यात सुमारे ३५००० किलो तर मुंबईत ८२००० किलो मध आणि चार हजार किलो मेणाची विक्री झाल्याचा उल्लेख आढळतो. मध मिळविण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतींचा वापर करण्याच्या प्रयत्नात श्री. डग्लस आणि रेव्हरंड जे. कास्टेटस्‌ यांचा उल्लेख येतो. जंगली मोहोळे लाकडाच्या विशिष्ट रचनेच्या पेटीतच वसविण्याचा प्रारंभिक प्रयत्न श्री. डेन यांनी १९०८ मध्ये केला. पुढे त्रिचनापल्ली भागात रेव्हरंड न्यूटन यांचे १९११ ते १९१७ या काळातील व फादर बरट्रॅम यांचे प्रयत्न पायाभूत ठरतात. भारतीय मधमाश्‍यांचा आकार आणि मोहोळातील कामकरी मधमाश्‍यांची संख्या पाश्‍चात्य जातींच्या मानाने कमी असते. त्यांच्या आकारमानाला सोयीची रचना असलेल्या लाकडी पेट्या बनविण्याचा प्रयत्न फा. न्यूटन यांनी केला. त्यातूनच 'न्यूटन हाईव' प्रकारची ८ चौकटींची अस्तित्वात आली. ती आजही दक्षिणेत वापरात आहे. त्यामध्ये सुधारणा करून दक्षिण भारतातील 'ए' टाईप या भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेल्या पेटीचा वापर अधिकृत झाला. उत्तरेकडे थोड्या मोठ्या आकाराच्या दहा चौकटींच्या 'बी टाईप'चा वापर होतो. पाश्‍चात्य आयात मोहोळांसाठी व काश्‍मिरी मोठ्या आकाराच्या मोहोळांसाठी सी टाईप या लॅंगस्ट्रीथ पेटी वापरात आली. तत्कालीन प्रांतिक (राज्य) सरकारांचे उल्लेखनीय प्रयत्न ः

  • त्रावणकोर संस्थानात १९१७ मध्ये सुमारे १००० मोहोळ पाळल्याचा उल्लेख, १९ मार्च १९३५ रोजी प्रसिद्ध झालेल्या, Brief Memorandum on Beekeeping in Travancore' या शोध निबंधात आढळतो.
  • बंगलोरच्या कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या १९३८ च्या माहितीपुस्तिका क्र. १० मध्येही या व्यवसायाची माहिती मिळते. त्यावरून ग्रामीण भागात १९२७ पासून मधमाश्‍या पालनाची सुरवात होऊन ६ मधुबनं (मोहोळ ठेवण्याच्या जागा) स्थापन झाली व सुमारे ३०० मोहोळांचं संगोपन तेथे सुरू झाले.
  • तत्कालीन मध्य प्रदेशात वर्धा, ओरिसात बारी कटक येथे बिहारमध्ये मुझफ्फरपूर बंगालमध्ये कलकत्त्याजवळच्या खादी प्रतिष्ठानच्या सोदेपूर येथील मधुबनांमध्ये हा व्यवसाय सुरू होता. सोदेपूरवला १९३९ मध्ये महात्मा गांधींनी भेट देऊन तेथील या ग्रामोद्योगाची प्रशंसा केली.
  • कालांतराने भारतातील कृषी विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ मधमाश्‍यापालन प्रयोगांकडे आकृष्ट झाले. पुसा, दिल्ली, कोईमतूर, त्रावणकोर, म्हैसूर, ल्यातपूर (आता पाकिस्तानात), पुणे, हिस्सार, कलकत्ता, त्रिचनापल्ली, वगैरे ठिकाणी प्रयत्न सुरू झाले.
  • १९३७ च्या सुमारास आर. एन. मट्टू यांनी उत्तर प्रदेशातील कुमाऊ बागात हा व्यवसाय सुरू केला. अधिक प्रचार प्रसारासाठी त्यांनी अखिल भारतीय मधमाश्‍यापालक संघ स्थापन केला. प्रचारासाठी त्यांनी इंग्रजी भाषेतील एक त्रैमासिक Indian Bee Journal हे सुरू केले. ते सुमारे साठ वर्षे अव्याहतपणे चालू होते. या संस्थेतर्फे मधमाळांना सर्व प्रकारची तांत्रिक माहिती उपकरणे, पुस्तके, माहितीपत्रके व प्रशिक्षण या सुविधा उपलब्ध झाल्या.
  • उत्तर भारतात काश्‍मीरमध्ये हा व्यवसाय डॉ. टी. सी. राजदान यांच्या प्रयत्नातून प्रस्थापित झाला. कूर्ग प्रांतात रामकृष्ण मिशनचे स्वामी शंभवानंद याचे योगदान मोलाचे ठरले.
  • दक्षिणेतच मार्तंडमचे रेव्हरंड स्पेन्सर हॅच यांनी यंग मेन्स ख्रिश्‍चन असोसिएशन (YMCA) मध्ये या व्यवसायाला मूर्त स्वरूप दिले.
  • कर्नाटकात श्री. एच विश्‍वनाथन व श्री. एस. के. कल्लापूर यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले.
  • मात्र हे सर्व प्रयत्न तुरळक ठिकाणी व विखुरलेल्या स्वरूपात होते. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन म. गांधींच्या दूरदृष्टीमुळे मिळाले. अखिल भारतीय व्यापकता मिळाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासकीय पाठबळामुळे १९५६ मध्ये अखिल भारतीय खादी ग्रामोगद्योग आयोगाची स्थापना होऊन ग्रामोद्योग विकासासाठी मधमाश्‍यापालन व्यवसायाचा समावेश झाला. ग्रामीण युवक, महिला यांनी मधमाश्‍यापालन व्यवसाय करावा म्हणून महात्मा गांधींनी प्रोत्साहन दिले. अनेक निरीक्षणांमधून त्यांनी आपले मत बनविले होते. उदाहरणार्थ, श्री. कृष्णस्वामी नायडू यांच्या प्रायोगिक कोथिंबिरीच्या शेतातील मोहोळं पाहिली. कोथिंबिरीच्या धन्याचं उत्पादन वाढण्यासोबतच २५ किलो मधाचे उत्पादनही मिळाले. गांधीच्या रोजच्या आहारात किमान ५० ग्रॅम मधाचा समावेश असे.
  • संस्थात्मक प्रयत्न ः

  • प्रथम खादी ग्रामोद्योग मंडळ व नंतर अखिल भारतीय खादी ग्रामोद्योगाची स्थापना जाली. आयोगाचे पहिले अध्यक्ष वैकुंठभाई मेहता हे होते. प्रारंभी एस. के. कल्लापूर व नंतर स्वातंत्र्यसैनिक सी. गं. शेंडे यांनी या व्यवसायाची सुरवात केली. व्यवसायाला अखिल भारतीय असे संघटित रूप प्राप्त करून दिले.
  • केंद्रीय मधमाश्‍या संसोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना पुण्यामध्ये १ नोव्हेंबर १९६४ साली रोजी केली. येथे डॉ. गो. बा. देवडीकर या ख्यातनाम कृषिशास्त्रज्ञाचे अमोल मार्गदर्शन मिळाले. सर्वसमावेशक असे सखोल, मूलभूत स्वरूपाचे संशोधन सुरू झाले. संस्थेला आशिया खंडातील एकमेव अशी प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र व ग्रंथालय अशी आंतरराष्ट्रीय बी रिसर्च असोसिएशनची मान्यता मिळाली.
  • १९८० मध्ये पुणे व दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय मधमाश्‍या परिषद आयोजित केली गेली.
  • याबरोबरच राष्ट्रीय मधमाश्‍या संशोधन व विकास मंडळ (National Bee board) या शासनमान्य मंडळाचीही स्थापना झाली. महाबळेश्‍वर येथे उगम पावलेल्या या गंगोत्रीला महानदीचं स्वरूप मिळाले असून, कृषी व ग्रामोद्योग व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे.
  • हरित आणि श्‍वेतक्रांती बरोबरच ही मधुक्रांती (Sweet Revolution) कार्यान्वित झाली आहे. ती अधिक गतिमान करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
  • डॉ. क. कृ. क्षीरसागर, ९४२२०८०८६५ ( निवृत्त वरिष्ठ संशोधक, केंद्रीय मधमाश्‍या संशोधन संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com