भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक पातळीवरील मागणी आणि भूराजकीय संबंध अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा निष्कर्ष ड्रिप कॅपिटल या अमेरिकी व्यापार गुंतवणूकदार कंपनीने काढला आहे. या कंपनीने जाहीर केलेल्या भात पिकांच्या निर्यातीविषयीचा संशोधन अहवाल नुकताच प्रसारित करण्यात आला. या अहवालामध्ये भारतातील महत्त्वाच्या १०० भात निर्यातदारांच्या माहितीचे विश्लेषण केले आहे. या १०० निर्यातदारांचा व्यवसाय या वर्षाअखेर ३.३ अब्ज डॉलर इतका असून, एकूण भारतीय भात निर्यातीच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष ः
भारतातील एकूण निर्यातीप्रमाणे २०१८-१९ मध्ये वाढले असून, सप्टेंबरअखेर एकूण ६२,११२ शिपमेंट झाल्या. त्याची किंमत ६.८७५ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात झालेल्या घटीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. पहिल्या तीन तिमाहींमध्ये बांगलादेशला झालेल्या एकूण शिपमेंटमध्ये वाढ होऊन, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१.७ दशलक्ष डॉलर इतकी वाढ मिळाली. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कुवैत हे देश २०१८ मध्ये भारतातील भातासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ ठरली. भाताच्या निर्यातीवर जीएसटीचा अत्यंत कमी परिणाम जाणवला. (जीएसटी तून भात वगळला जाण्याची चिन्हेही आहेत.) असे असले तरी निर्यातदारांना क्रेडीटची समस्येचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका संभाव्य वाढीला बसू शकतो. सुरवातीच्या वार्षिक हंगामी वाढीनंतर भात निर्यातीचे प्रमाण कमी होत आहे. हा दरवर्षीचा वार्षिक कल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाताचे एकूण प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये तिसऱ्या तिमाहीपर्यंत ५८,७३६ शिपमेंट (मूल्य ५.८ अब्ज डॉलर) झाल्या होत्या. संपूर्ण २०१७ या वर्षी ७८,३०० शिपमेंट (मूल्य ७.३९ अब्ज) झाल्या होत्या. त्यातुलनेत सप्टेंबर २०१८ (तिसरी तिमाही) पर्यंत ६२,११२ शिपमेंट झाल्या असून, त्याचे मूल्य ६.८७५ डॉलर इतके होते. याचाच अर्थ मागणी आणि निर्यातीचे प्रमाण वाढते असून, २०१९ मध्येही तसेच राहण्याची शक्यता आहे. पंजाब हा भारतातील सर्वांत मोठा भात निर्यातदार असून, एकूण देशाच्या ३० टक्के हिस्सा त्यांचा आहे. अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तणातणीच्या पार्श्वभूमीवर २७ टक्के भात निर्यात ही इराण देशामध्ये झाली. भारत हा जागतिक पातळीवरील सर्वात मोठा भात निर्यातदार आहे. २०१७ मध्ये एकट्या भारताने जागतिक पातळीवरील भात निर्यातीच्या सुमारे २६.३ टक्के हिस्सा व्यापला होता. त्याची किंमत ५.५ अब्ज डॉलर इतकी होती. भात निर्यातीसाठी नव्या बाजारपेठांमध्ये चीनमध्ये अधिक संधी असून, दीर्घकालीन विचार करता या बाजारपेठेतून चांगला फायदा होण्याचे अंदाज ड्रिप कॅपिटलच्या अभ्यासात दिसत आहेत. सातत्याने वाढत असलेल्या मागणीनुसार भारतीय निर्यातदारांसाठी कतार, येमेन, इस्राईल, फिलिपिन्स, केनया आणि येक्रेन अशा अन्य सहा बाजारपेठांमध्ये संधी आहे. मुंबई येथील भातनिर्यातदार अंकिल सी. म्हणाले, की भारतीय शेतकरी विविध बाजारपेठेची मागणीचे पॅटर्न आणि चव लक्षात घेऊन उत्पादन करू लागला आहे. चिनी लोक चिकट भाताला प्राधान्य देतात, त्यांच्या संभाव्य मागणी पुरवण्यासाठी योग्य जातींची लागवड सुरू केली आहे. भविष्यात चीनची बाजारपेठ निर्यातदारांना खुणावत असून, त्यातून दीर्घकालीन निर्यात व्यवसाय होऊ शकतो.
ड्रिप कॅपिटलचे सहसंस्थापक आणि सहकार्यकारी अधिकारी पुष्कर मुकेवार म्हणाले, की मध्यपूर्वेतील देशांकडून वार्षिक हंगामी मागणी वाढत असून, बासमतीशिवाय भात अधिक प्रमाणात चीनकडे पाठवण्यात येत आहे. यातून संधी वाढल्याने निर्यातदारांना फायदा होऊ शकतो. मात्र, ही संधी घेण्यासाठी क्रेडिटची समस्या जाणवत आहे.