संत्रा रस, पालेभाज्या रोखतात स्मरणशक्तीचा ऱ्हास

संत्रा रस, पालेभाज्या रोखतात स्मरणशक्तीचा ऱ्हास
संत्रा रस, पालेभाज्या रोखतात स्मरणशक्तीचा ऱ्हास

वार्धक्याच्या समस्यांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे ही मुख्य समस्या असते. या समस्येला दूर ठेवण्यासाठी आहारामध्ये पालेभाज्या, संत्रे, लाल रंगाच्या भाज्या आणि बेरी फळे यांचा समावेश करणे फायद्याचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या वयामध्ये संत्र्याचा रसही हा धोका कमी करतो. हे संशोधन ‘अमेरिकन अॅकेडमी ऑफ न्यूरॉलॉजी’ या संस्थेच्या ‘न्यूरॉलॉजी’ या वैद्यकीय संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. माणसाच्या स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या आहार घटकांचा दीर्घकालीन अभ्यास बोस्टन येथील हार्वर्ड टी. एच. चॅन सार्वजनिक आरोग्य विद्यालयातील संशोधक चॅंगझेंग युआन व सहकाऱ्यांनी केला आहे. सरासरी वय ५१ वर्षे असणाऱ्या २७,८४२ माणसांच्या अशा मोठ्या गटाचा २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अभ्यास आणि पाठपुरावा करण्यात आला. या लोकांकडून प्रति दिन आहारात घेतल्या जाणाऱ्या फळे, भाज्या आणि अन्य खाद्यांविषयी प्रश्नावली भरून घेण्यात आली. दर चार वर्षांनंतर प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात एक फळ किंवा अर्धा कप रस, भाज्यामध्ये एक कप कच्च्या भाज्या किंवा दोन कप पानांचा रस असे मापनाचे निकष ठेवले.

  • दर चार वर्षांने सहभागी लोकांची विचार करण्याची आणि स्मरणशक्तीच्या कौशल्याची तपासणी एका सहा प्रश्नांच्या चाचणीद्वारे केली. या चाचणीमध्ये खरेदीच्या याद्या लक्षात ठेवता येतात का, गटचर्चेमध्ये मुद्दे लक्षात ठेवणे आणि मांडण्यात काही अडचणी येतात का, टीव्हीवरील मालिकेची कथा लक्षात राहते का, अशा साध्या प्रश्नांचा समावेश होता.
  • या चाचण्या सरासरी वय ७३ वर्षे होईपर्यंत करण्यात आल्या. स्मरणशक्तीमध्ये होत गेलेल्या बदलांच्या नोंदी करण्यात आल्या.
  • सहभागींपैकी विचार करण्याची आणि स्मरणशक्तीची कौशल्ये चांगली असणारे ५५ टक्के, मध्यम असणारे ३८ टक्के, तर कमी आणि मर्यादित असलेल्या लोकांचे प्रमाण ७ टक्के राहत असल्याचे दिसून आले.
  • निष्कर्ष ः सहभागी लोकांचे त्यांच्या फळे आणि भाज्या खाण्याच्या सवयीनुसार पाच गट केले होते. त्यातील निष्कर्ष असे होते.

  • प्रतिदिन सहा वेळा भाज्या खाणाऱ्या गटाचे दोन वेळा भाज्या खाणाऱ्या लोकांची तुलना केली. अधिक भाज्या खाणाऱ्या गटातील लोकांची स्मरणशक्ती अधिक राहत असल्याचे दिसून आले. मेंदूच्या क्षमता घटण्याचे प्रमाण अधिक भाज्या खाणाऱ्या लोकांमध्ये ६.६ टक्के, तर खालील गटामध्ये ७.९ टक्के असल्याचे आढळले.
  • प्रतिदिन तीन वेळा फळे खाणाऱ्या लोकांची तुलना एकापेक्षा कमी (अर्धे) फळे खाणाऱ्या गटाशी तुलना केली. प्रतिदिन संत्र्याचा रस पिणाऱ्या सुमारे ४७ टक्के लोकांची विचार करण्याची क्षमता ही महिन्यातून एकापेक्षा कमी रस घेणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये अधिक चांगली राहत असल्याचे दिसून आले. वयस्कर लोकांमध्ये हा संबंध अधिक स्पष्टपणे दिसून आला. प्रतिदिन संत्र्याचा रस घेणाऱ्या लोकांतील ६.९ टक्के लोकांमध्ये, तर महिन्यातून एकपेक्षा कमी वेळा रस घेणाऱ्या ८.४ टक्के लोकांमध्ये विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com