समाजावर होणारे विस्तृत परिणाम लक्षात घेऊन जबाबदार नावीन्यपूर्ण संशोधन आणणे हे स्मार्ट शेतीसाठी कळीचे ठरू शकते, असे मत पूर्व अॅंग्लिया विद्यापीठातील अभ्यासकांनी मांडले आहे. त्यांनी वापरलेली `जबाबदार नावीन्यपूर्णता` ही संकल्पना चौथ्या कृषी उत्क्रांतीकडे इशारा करते. कारण सामाजिकदृष्ट्या विचार झाल्यास त्यातील तंत्रज्ञानामुळे उद्भवण्याची शक्यता असलेले संभाव्य नकारात्मक उप-परिणाम टाळणे शक्य होईल. कृषी क्षेत्रामध्ये तांत्रिक क्रांतीने वेग पकडलेला आहे. याला जागतिक पातळीवरील धोरणकर्त्यांनीही चांगलेच प्रोत्साहन दिले आहे. उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी, पर्यावरणाशी पूरकता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरू शकते. मात्र, या साऱ्या सुधारणामध्ये त्याचा सामाजिक परिणाम बाजूला पडण्याचा धोका असतो. या धोक्याकडे पूर्व अॅंगलिया विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विद्यापीठातील डॉ. डेव्हिड रोज आणि डॉ. जेसन चिल्वेर्स यांनी लक्ष वेधले आहे. या आधी झालेल्या प्रत्येक क्रांतीचे महत्त्व अबाधित आहे. उदा. मानवाचे गोळा करणारे किंवा शिकारी असल्यापासून शेतीमध्ये स्थिर होण्याची प्रक्रिया असो, की १८ शतकामध्ये झालेली ब्रिटिश कृषी क्रांती, दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली औद्योगिक क्रांती, त्यानंतर झालेली हरितक्रांती या प्रत्येक घटकांचे त्या काळाच्या अनुषंगाने प्रचंड महत्त्व आहे.
धोके आणि मर्यादा ः फ्रंटियर्स इन सस्टेनेबल फूट सिस्टिम्स या संशोधनपत्रिकेमध्ये लिहिलेल्या लेखामध्ये डॉ. रोज आणि डॉ. चिल्व्हर्स यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराच्या मर्यादा आणि धोकेही दाखवून दिले आहेत. त्यातून उद्भवणाऱ्या पर्यावरण, नैतिक आणि सामाजिक संभाव्य समस्यांचीही ते जाणीव करून देतात. डॉ. रोज यांच्या मते, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती स्मार्ट होणार असली तरी त्यातून नोकऱ्या व रोजगार कमी होतील. लोकांच्या काम व शेती करण्याच्या पद्धती बदलतील. त्यातून सामाजिक पातळीवर संघर्षाशी स्थिती उद्भवू शकते. त्यासाठी धोरणकर्ते, आर्थिक निधी उभारणारे, तंत्रज्ञान कंपन्या आणि संशोधकांची एकत्रित येऊन भविष्यातील शेती, समुदाय आणि एकूणच समाजाचा विचार केला पाहिजे. या कृषी तंत्रज्ञान क्रांतीसाठी उभारला जाणारा पैसा हा प्रामुख्याने सार्वजनिक स्रोतांतून आला पाहिजे. त्यामुळे संशोधनावर सामाजिक जबाबदारी येण्यास मदत होईल. संभाव्य धोके कमी होण्यास मदत होईल. अधिकृत किंवा अनधिकृतरित्या शेतकरी आणि समाज हा निर्णय कर्त्यांच्या ठिकाणी आला पाहिजे. अर्थात, यासाठी योग्य सल्लागार आणि या उद्योगाशी संबंधित सर्व घटकांचे विचार अंतर्भूत झाले पाहिजेत. संपूर्ण समाजाला योग्य दिशेने नेण्याचा हा प्रवास असणार आहे. केवळ उत्पादकता आणि फायदा यांचा विचार करून सामाजिक, नैतिक किंवा पर्यावरणाच्या समस्येला बाजूला पडणार नाहीत, हे पाहिले पाहिजे. अशा पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन, आरेखन प्रक्रिया राबवली पाहिजे. जबाबदार नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानच्या आराखड्याच्या चाचण्या प्रत्यक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. त्यातून भविष्यातून संघर्ष टाळणे शक्य होईल. उदा. जनुकीय सुधारणा होताना त्यामध्ये शेतकरी आणि समाजाचा पाठिंबा मिळवला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांना सोबत घेणे आवश्यक करावे. या कारणामुळे धोरणांची उद्दीष्ट्ये योग्य समाजासाठी कार्यान्वित होतील.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.