पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची उत्पादकता

पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची उत्पादकता
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची उत्पादकता

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील अमृतराव देशमुख यांनी कापसाचे एकरी उत्पादन ३० ते ३५ क्विंटलपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खत आणि पाण्याची भूमिका मुख्य राहिली आहे. अधिक कापूस उत्पादकतेचा त्यांचा अमृत पॅटर्न सर्वत्र नावारूपास आला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातील शेतकरीही ‘अमृत पॅटर्न’शी जुळले आहेत. अंबोडा (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील अमृतराव देशमुख यांची वडिलोपार्जीत ३० एकर शेती. याच शेतीच्या बळावर कुटूंबाचा चरितार्थ सुरू होता. कापूस हे मुख्य पीक होते. पण एकरी अवघी तीन ते चार क्‍विंटल इतकीच उत्पादकता मिळत होती. शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची सोयदेखील होत नसल्याने कोणालाच उच्च शिक्षण घेता आले नाही. दरम्यान २००८-०९ मध्ये कुटूंब विभक्‍त झाले. त्या वेळी अमृतरावांच्या नावावर अवघी पाच एकर शेती आली. कोरडवाहू असली तरी उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने अमृतरावांनी या शेतीलाच प्रयोगशाळा करून टाकले. टप्प्याटप्प्याने सुधारणांवर भर दिला. कापसाच्या उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित केले. सात बोअरवेल्सवर खर्च पाण्याशिवाय शेती नाही हे उमगलेल्या अमृतरावांनी सर्वात आधी पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. शेतात खोलपर्यंत काळी माती आहे. त्यानंतर खडक लागत असल्याने विहीर शक्‍य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. एकेक करून तब्बल सहा बोअरवेल्स घेतले. पण पाणीच लागले नाही. हताश न होता आपले प्रयत्न सुरूच ठेवले. सातव्या बोअरवेलला मात्र यश आले. त्या वेळी म्हणजे वडिलांच्या काळात ‘नॉनबीटी’ किंवा सरळ वाणांची लागवड व्हायची. आता अमृतरावबीटी कापसाचे वाण घेतात. शेती झाली प्रयोगशाळा

  • अमृतरावांनी कापसासोबत विविध आंतरपीक लागवडीचेही प्रयोग केले.
  • कापसातील लागवड अंतरेही बदलली. त्यात ३ बाय ३, ४ बाय २, ३ बाय ४ फूट अशा विविध अंतरांचा समावेश आहे. एका एकरांत आठ पाकिटे बियाणे लावण्याचा प्रयोगही एके वर्षी केला.
  • काही प्रयोग जरूर फसले देखील. पण हिंम्मत न हारता प्रयत्न सुरूच ठेवले. आज विविध प्रयोगांतूनच त्यांनी कापसाची उत्पादकता एकरी ३० क्विंटलपुढे नेण्यापर्यंत मजल गाठली आहे.
  • पाणी व्यवस्थापन अमृतराव यांच्या मते ठिबक, पाट आणि स्प्रिंकलर अशा तीनही पद्धतींचा वापर कापसासाठी केला पाहिजे. तरच चांगली उत्पादकता मिळविता येते. खत आणि पाणी याच दोन घटकांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास पिकाची उत्पादकता दीड ते दोनपटीने अधिक मिळविता येते असा दावा ते करतात. जानेवारीनंतर फरदड कापसासाठी स्प्रिंकलरचा पर्याय अवलंबिला पाहिजे. यामुळे किडींची विष्ठा, काळी बुरशी, चिकटा आदी स्वच्छ धुऊन निघते. पहिला कापूस वेचण्या वेळी झाडाच्या कासल्या (नख्या) २० टक्‍के झाडाची ताकद घेतात. दोन ते तीन पाणी स्प्रिंकलरद्वारे दिल्यास या नख्या गळून पडतात. पाणी देण्यात हवी सुसूत्रता : मेच्या अखेरीस ते जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसाची लागवड होते. सर्वसाधारणपणे लागवडी ड्रिपरमधून ज्या ठिकाणी पाणी पडते त्याच ठिकाणी बियाणे रोवले जाते. परंतु, ही पद्धत चुकीची आहे. कारण लागवड करण्याच्या वेळेस उन्हाच्या झळा असतात. ठिबकच्या नळ्या तापल्यामुळे पाणीही उष्ण झालेले असते. परिणामी झाडाची साल ‘डॅमेज’ करते. पुढे पाने पिवळी व नंतरच्या काळात लालसर होतात. झाडाती वाढही खुंटते असेही अमृतरानांचे काही वर्षांतील निरीक्षण आहे. म्हणून ड्रीपरपासून तीन ते चार इंच अंतरावर टोबणी केली पाहिजे. ठिबकच्या नळ्या वरच्या बाजूस लावलेल्या असाव्यात. या कारणामुळे पाणी उताराला झिरपेल असे ते म्हणतात. अमृतराव सांगतात पाण्याचे नियोजन

  • पाणी सतत दिल्याने उन्हाळ्यात काही वेळा जमिनी भेगाडतात. यामुळे अन्नद्रव्ये घेणारी तंतूमुळे तुटतात. अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाल्याने लाल्या विकृतीचा प्रादुर्भाव पुढे होतो. त्यामुळे झाडाच्या उंचीनुसार ठिबक नळ्यांचे अंतर झाडापासून तितके फूट असले पाहिजे.
  •   लागवडी वेळी दोन तासांत असलेल्या ओळींमध्ये पाटपाणी देण्याचे नियोजन ऑगस्ट ते जानेवारी या कालावधीत केले पाहिजे. एक तास (ओळ) सोडून हे पाणी दिले पाहिजे. प्रत्येक तासात पाणी दिल्यास त्याचवेळी पावसाचे पाणीदेखील झाडांना मिळाल्यास मुळांना अन्नद्रव्ये शोषण करणे कठीण होते.
  •  कापूस हे पीक वाफसा अवस्थेत वाढते. त्यामुळे एक ओळ सोडून दिलेल्या पाण्यामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच झाडाला गरजेएवढेच पाणी मिळते.
  •   पाणीमापकाचा वापर - पाणीमापक शेतात एका लाकडाला बांधावे. कोणतेही पीक असेल त्या झाडाच्या उंचीपेक्षा एक फूट अधिक उंचीवर बांधलेले असावे. पिकाला पहिले पाणी दिले त्या वेळी तो पर्जन्यमापक भरून ठेवावा. उन्हाळ्यात यातील पाण्याची बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खालावेल. त्या ठिकाणी आपल्याला ओळखू येण्यासाठी एक खुण त्यावर  करावी. प्रत्येक वेळी बाष्पीभवनाचा हाच वेग लक्षात घेऊन पाणी देण्याचे नियोजन केले पाहिजे.  सूर्यफूल किंवा मका (सहपिके) यांची एकरात १०० ते १५० झाडे लावली पाहिजेत. त्यामाध्यमातून पिकाची पाण्याची गरज ओळखणे शक्‍य होते. ही पिके पक्षीथांब्याचे देखील काम करतात. त्यांचा उपयोग कीड नियंत्रणासाठीही होतो. या सहपिकांची पाने काळपट पडून वाळण्यास सुरवात झाली तर, मुख्य पिकाला पाण्याची गरज आहे हे ओळखता येते. अनेक वर्षांपासून हा पॅटर्न राबविला आहे. सूर्यफुलाची लागवड प्रत्येक दोन महिन्याच्या टप्प्याने केली पाहिजे. प्रत्येकवेळी झाडांची संख्या तेवढीच हवी.    ठिबकच्या माध्यमातून विद्राव्य खत देताना चुकीच्या पद्धतीमुळे जर झाडाची साल भाजली तर अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. झाडाच्या वाढीच्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषणाऱ्या मुळ्याही  तितक्‍याच लांब वाढत असतात. याची दखल घेत ठिबकच्या नळ्या झाडापासून तितक्‍याच अंतरावर ठेवल्या पाहिजेत. तरच झाडाची योग्य वाढ होऊन उत्पादकता वाढेल.  हरभऱ्याचे पाणी व्यवस्थापन

  •  हरभऱ्याची एकरी उत्पादकता १२ ते १३ क्‍विंटलची आहे. काबुली हरभऱ्याचे उत्पादन अमृतराव घेतात. पहिल्या पिकाच्या काढणीनंतर ट्रॅक्‍टरच्या सहायाने खोल नांगरटी करून पाट पाणी दिले जाते. नंतर बळीराम नांगराचा वापर प्रभावी ठरतो. पेरणीनंतर वखरपाळी दिल्यास तणाचा प्रादुर्भाव नियंत्रित राहात असल्याने तण नियंत्रणासाठी अतिरिक्‍त श्रम करावे लागत नाही. या पद्धतीत सहा इंच खोल बियाणे जात असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत होते. यामुळे उत्पादकतेत सरासरी ३० ते ४० टक्‍के वाढ होऊन उत्पादकता खर्च कमी होतो.
  •  पिकाला दुसरे पाणी झाड सहा इंचाचे झाल्यानंतर दयावे. त्याकरिता स्प्रिंकलरचा पर्याय अवलंबिला पाहिजे. तिसरे पाणी १५ ते २० फुले असण्याच्या कालावधीत द्यावे. अतिरिक्‍त पाणी शेतात वाहू लागल्यास ते देण्याचे थांबवावे. स्प्रिंकलरचे लिकेज रोखावे. त्याच्या दुरुस्तीवर भर द्यावा. अन्यथा एकाच ठिकाणी पाणी पडून त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती राहते.
  •  ज्यांच्याकडे स्प्रिंकलरचे १४ नोझल्स त्यांनी १२ ते १३ नोझल्सचा  वापर करावा. तुषार अधिक प्रमाणात होण्यासाठी हा पर्याय फायद्याचा ठरून पावसाच्या पाण्याप्रमाणे पिकाला पाणी मिळते. त्याचा प्रभावही जास्त राहतो. शेतकऱ्यांनी धुऱ्याच्या कडेला एकाच जागी दोन नोझल्स लावावेत. पिकाला
  •  पहिले पाणी पूर्व- पश्‍चिम दिल्यास दुसरे पाणी उत्तर दक्षीण द्यावे. समप्रमाणात पाणी मिळून पिकाची वाढ नियोजनबद्ध होते.
  • उत्पादन लागवड अंतरांत बदल, काटेकोर पाणी व्यवस्थापन याद्वारे अमृतराव यांना लागवडीच्या कापसाचे २८ क्‍विंटल तर फरदडपासून सहा क्‍विंटल असे एकरी ३४ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. दरवर्षी याच प्रमाणात किंवा त्याहून अधिक  उत्पादन घेण्याच त्यांचा प्रयत्न असतो. अमृतराव देशमुख - ९५२७८२०८७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com