उष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासक

उष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासक
उष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासक

गत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात व राजस्थान राज्यशासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील वातावरण खजुराच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. महाराष्ट्रातही योग्य धोरण आखल्यास या फळझाडाच्या वाढीला वाव आहे. नवीन पिकाविषयी शेतकऱ्यांना माहिती व्हावी हाच या लेखाचा उद्देश आहे. खजुराचे झाड नारळ किंवा शिंदी झाडाप्रमाणे दिसते. झाडाची उंची ६० ते ७० फूट असून, खोड उंच व सरळ वाढते. या झाडाच्या फक्त टोकाशीच फांद्यांचा झुपका असतो. तसेच खोडावर गळून पडलेल्या पानामुळे तयार झालेल्या खाचा असतात. खोड पोकळ असते. पाने टणक व टोकाला अणकुचीदार असतात. तसेच ३ ते ४ फूट लांब असतात.

  • खजुरामध्ये मादी झाडे व पुरुष झाडे वेगळी असतात. पुरुष झाडे परागकणनिर्मिती करतात, तर मादी झाडे फळांचे उत्पादन करतात. दोन पुल्लिंगी झाडांचे परागकण हे साधारणपणे पन्नास स्त्रीलिंगी झाडांच्या परागीकरणासाठी पुरेसे ठरतात.
  • एका मादी झाडावर साधारणपणे १०-१५ फुलोरे येतात. मात्र, त्यातील लहान तुरे तोडून टाकले जातात. त्यामुळे उर्वरित तुऱ्यांवर चांगली फळे येतात.
  • या झाडांचे परागसिंचन वाऱ्यामुळे होते. कृत्रिमरीत्या पुरुष झाडांचा फुलोरा स्त्री-पुष्पांवर बांधून परागसिंचन घडवले जाते. हे परागकण
  • गोळा करून कागदाच्या पुडीत काळजीपूर्वक ठेवल्यास त्याचा उपयोग निदान एक वर्षभर करता येतो. हंगामाव्यतिरिक्त फुलणाऱ्या झाडांच्या परागसिंचनासाठी त्यांचा उपयोग होतो. सिंध प्रांतात साधारणत: २० फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत कृत्रिम परागसिंचन केले जाते.
  • जाती : खजुराच्या सुमारे ३००० जाती असून, त्यातील ४०० इराणमध्ये, २५० ट्युनिशियात, ३७० इराकमध्ये आहेत. यापैकी फक्त १५९ जाती व्यावसायिक शेतीसाठी उपयुक्त आहेत. खजुराच्या जातींची तीन प्रकारात विभागणी केली जाते. १) नरम खजूर : यात भरपूर ओलावा आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असलेला. प्रमुख जाती - खलास कासीम, खलास खर्ज इ. २) अर्ध-सुकलेले खजूर : थोडासा कडक गर, ज्यात किंचित ओलावा आणि साखरेचे प्रमाण भरपूर असलेला. प्रमुख जाती – अजवा, अनबरा, बार्नी इ. ३) पूर्ण सुकलेले खजूर : कडक असा गर. ज्यात साखरेचे प्रमाण भरपूर. प्रमुख जाती – रुथाना, सुक्करी इ. ४) भारतात प्रामुख्याने बारही, दायरी, डेग्लेट नूर, हिलावी, खुदाची, जाहिदी, सैदी, मक्तूम, मेजदूल, थुरी, खस्तावी, सायेर इ. जातींचे खजूर आढळतात. जमीन : या फळझाडासाठी कोणतीही जमीन चालत असली तरी ते रेताड, वाळवंटी जमिनीत चांगले येते. फळ लवकर पिकते. मातीच्या वरील थरातील क्षाराचे प्रमाण ३-४ टक्केपर्यंत असले तरी झाड वाढू शकते. मात्र, त्याला फळे येत नाहीत. फळ येण्यासाठी झाडाच्या मुळ्या क्षारांचे प्रमाण अर्धा टक्क्यापर्यंत असलेल्या जमिनीपर्यंत खोल जाव्या लागतात. हवामान : खजुराला अतिउष्ण व कोरडी हवा लागते; पाऊस कमी लागतो. आर्द्रतेमुळे फळांना हवा तसा गोडवा मिळत नाही. जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात खजूर चांगला येतो. फूल येण्याच्या सुमारास (मार्च ते मे महिन्यांत) व फळ पिकण्याच्या (ऑगस्ट ते नोव्हेंबर) काळात पाऊस असल्यास फळ धरत नाही किंवा ते कुजू लागते. पाने कोवळी नसताना तापमान २० अंशांपर्यंत खाली उतरले अडचण नसते. अधिक उष्णतेबाबत खजुराला फारशी समस्या आढळलेली नाही. लागवड :

  • बियांपासून रोपे बनवून लागवड शक्य असली तरी अशा झाडांना फळे मिळण्यास सुमारे ८ ते १० वर्षे लागतात. बियापासून तयार केलेल्या रोपांमध्ये ५० टक्के नर रोपे असतात. अधिक उत्पादनासाठी नर झाडे कमी व मादी झाडे जास्त असणे गरजेचे आहे.
  • मादी झाडापासूनच्या फुटव्यांचा व्यावसायिक लागवडीसाठी वापर करावा. त्यासाठी ३ ते ५ वर्षे वयाचे व १८-३४ किलो वजनाचे मुनवे वापरावेत. झाडे लावल्यावर ६-८ वर्षांनी फुलोरे येतात. चांगली वाढ होण्यासाठी सुरवातीचे फुलोरे काढून टाकतात.
  • इंग्लंड, इस्राईलहून आयात उतीसंवर्धित रोपे राजस्थान, गुजरात येथील प्रयोगशाळेत आणून भारतीय वातावरणाला अनुकूलन केल्यानंतर ती देशभर पाठविली जातात. खजुराच्या एका झाडाची किंमत ३८०० ते ४५०० पर्यंत पडते. एक झाड १०० ते १५० वर्षे जगते.
  • खजुराचे झाड शिंदी आणि नारळाच्या झाडासारखे दिसते. ते मध्यम ते उंच वाढते. लागवडीचे अंतर दोन ओळींत ७-१० मीटर आणि दोन झाडांत ४-७ मीटर असे अंतर ठेवावे.
  • तीन फूट लांबी, रुंदी, उंचीच्या खड्ड्यात अर्धा भाग माती व २ ते ३ किलो शेणखताने भरावा.
  • झाड लावतेवेळी शेंड्यावर खत, माती वगैरे कांही पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वाळलेली पाने वर्षातून एकदा काढून काढावीत.
  • खालची पिल्ले दोन वर्षांनी एकदा काढावीत.
  • पाणी व्यवस्थापन : झाडे लावल्यावर महिनाभर दररोज, दुसऱ्या महिन्यांत चार दिवसांनी एकदा व नंतर महिन्यांतून एकदा असे पाणी द्यावे. फुले येण्याच्या वेळी (फेब्रुवारी व मार्च महिन्यात) झाडांना पाणी देत नाहीत. फळे लागल्यापासून ती पिकेपर्यंत नियमित पाणी द्यावे. खत व्यवस्थापन : दोन- तीन वर्षांने एकदा हिवाळ्याच्या सुरुवातीला एकरी ५-७ टन शेणखत टाकावे. मार्च-एप्रिलमध्ये ६०० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद आणि ७० ग्रॅम पालाश प्रति झाड याप्रमाणे खत मात्रा द्यावी. काढणी :

  • फेब्रुवारी महिन्याचा सुरवातीस फळ तयार होण्यापूर्वी त्याभोवतीचे काटे काढून टाकावेत. पक्वतेनंतर फळे काढणे सोपे होते. मे महिन्याच्या आसपास खजूर पिकण्यास सुरवात होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक आठवड्याला खजूराची काढणी करावी. जून महिन्यातील खजूर हा थोडा कडक असून, हाताने काढता येतो. जुलैमध्ये फळ पूर्णपणे चॉकलेटी रंगाचे आणि नरम होते.
  • ऑगस्टमध्ये फळ पूर्णपणे पिकते. झाड नुसते हलवले तरी खजूर खाली पडतात. खजुराचे फळ पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी सुरवातीला अत्यंत कडक आणि सलग अशा उन्हाळ्याची आणि पक्वतेच्या काळात दमट हवामानाची गरज असते.
  • - फळ पक्वतेची प्रक्रिया चार भागात विभागली जाते. त्याला किमरी (कच्चे फळ), खलाल (पूर्ण आकारातील आणि थोडे कडक
  • असे फळ), रताब (पिकलेले आणि नरम असे फळ), ताम्रर (पिकलेले आणि उन्हात सुकवलेले फळ) अशा पारंपरिक अरेबिक नावानेच जगभरात ओळखले जाते.
  • उत्पादन ः

  • खजूर झाडे ८-१० वर्षांची झाल्यानंतर चांगले उत्पादन सुरू होते. पुढे हवामानानुसार ५० ते १०० वर्षांपर्यंत उत्पादन सुरू राहते. प्रतिझाड प्रतिवर्ष ८-१० चांगल्या घडापासून २०-२५ किलो खजूर मिळतो. पुढे वाढत शंभर किलोपर्यंत जाते.
  • घडातील सर्व फळे एकदम न पिकत नाही. जशी पिकतील तशी तोड व वर्गवारी केली जाते. साधारण प्रतीच्या खजुरामध्ये घड एकदम उतरवला जातो. त्यात काही पक्व व काही अर्धवट पिकलेली फळे असतात. अशा घडातील खराब फळे काढून टाकून तो सावलीत टांगून ठेवतात.
  • खजुराला प्रतिकिलो ४० रुपये असा सरासरी दर मिळतो.
  • आंतरपीक : खजुराची झाडे मोठी होईपर्यंत मूग, उडीद, वाटणा, तीळ, डाळिंब, सीताफळ, शेवगा, पपई, इ. पिके आंतरपिके म्हणून घेतात. खजुराचे उपयोग :

  • खजुराच्या झाडापासून खजूर व खारीक यांशिवाय इतर उपयुक्त पदार्थही मिळतात.
  • १०० ग्रॅम ताज्या खजुरापासून १४४ ऊष्मांक, तर सुक्या खजुरापासून (खारकेपासून) ३१७ ऊष्मांक मिळतात.
  • या झाडांचा गोंद अतिसारावर व मूत्ररोगासाठी औषधी मानला जातो. झाडाचा ताजा रस थंड व सारक असतो. गोंद वर घेतात. फळे शामक, कफोत्सारक, पौष्टिक, सारक व कामोत्तेजक असून दमा, धातुविकार, श्वसनविकार, ज्वर, बद्धकोष्ठता, स्मरणदोष इत्यादींवर गुणकारी असतात.
  • खजुराचे कोंब व पानांची भाजी केली जाते.
  • खजुराच्या बिया वाळवून पीठ करून किंवा भिजवून नरम केल्यास पशुखाद्य म्हणून वापरले जाते. उंट, बकऱ्या, मेंढ्या, घोडे यासह कोंबड्यांच्या खाद्यातही वापरतात.
  • पानांपासून छप्पर, फळासाठी साठवण बोऱ्या (चटया) बनविण्यास करतात.
  • झाडांपासून मिळणाऱ्या काथ्यापासून दोऱ्या तयार करतात. फळे काढल्यानंतर उर्वरीत भागापासून केरसुणी, ब्रश बनवता येतात.
  • कोवळ्या महाच्छदापासून ‘तारा’ नावाचे सुगंधी द्रव्य मिळते. ते पाण्यात मिसळून सरबताप्रमाणे दिले जाते.
  • डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२० (सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com