भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा उपाययोजना

भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा उपाययोजना
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा उपाययोजना

सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण निरभ्र राहील. दुपारचे तापमान हे ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त वातावरणातील तापमान व आर्द्रतेमध्ये फारसा फरक पडणार नाही. फक्त येत्या बुधवारी (ता. २३) वातावरणात थंडी एक, दोन दिवसासाठी वाढू शकते. सध्याच्या वातावरणामध्ये द्राक्षबागेतील महत्त्वाच्या रोगांची वाढ वेगाने होण्याची शक्यता दिसत नाही. सर्वसाधारपणे भुरीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर करताना आता सावध राहण्याची आवश्यकता आहे. बागेमध्ये फक्त सल्फरची फवारणी केलेली असेल. मात्र, ज्या ठिकाणी जास्त दाट कॅनोपी असल्यामुळे सल्फर पोचत नाही, अशा ठिकाणी तापमान वाढायला सुरवात होताच भुरी दिसण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत बागेमध्ये भुरी दिसल्यास घाबरून पुन्हा आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केल्यास बागेमध्ये द्राक्षांवर उर्वरित अंश दिसून येण्याची शक्यता असते. ज्या शेतकऱ्यांनी काटेकोरपणे शून्य कीटकनाशक अंश राहण्याच्या दृष्टीने मार्गदर्शिकेप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली असेल, म्हणजेच फळाच्या छाटणीनंतर ५५ ते ६० दिवसानंतर भुरीच्या नियंत्रणासाठी कोणतेही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरलेले नसल्यास आतासुद्धा अशा प्रकारची आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरू नयेत. बागेत भुरी दिसलीच तर सल्फरची चांगली कव्हरेज देणारी फवारणी पुन्हा करावी. जिथे अजूनही थंडी आहे, अशा ठिकाणी अॅम्पिलोमायसीस ८ ते १० मिलि प्रति लिटर प्रमाणात अथवा कमाल तापमानात २५ ते ३० अंशांपेक्षा अधिक वाढ झालेली असल्यास अॅम्पिलोमायसीसऐवजी आता ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रति लिटर फवारल्यास चांगले नियंत्रण मिळू शकेल. काढणीस २५-३० दिवस राहिलेले असल्यास ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस ठिबकद्वारे मुळांना दिल्यास (प्रमाण ः एक लिटर प्रति एकर) झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फवारणी न केलेल्या बागांमध्येही त्याचा चांगला परिणाम दिसेल. शेवटच्या २५ ते ३५ दिवसांपर्यंत असलेल्या बागांमध्ये घडांवर पेपर चढवण्याच्या आधी कायटोसॅन दोन ते तीन मि.लि. प्रति लिटर फवारल्यास भुरीचे चांगले नियंत्रण होऊ शकेल. फक्त स्थानिक बाजारपेठेसाठी राखलेल्या बागांमध्ये फवारणी करता येईल. यामुळे द्राक्षामध्ये साखर लवकर वाढेल. घडांचा काढणीनंतरचा साठवण काळ जास्त राहील. ज्या बागांमध्ये काढणीच्या वेळेपर्यंत शून्य उर्वरित अंश उत्पादनाच्या शिफारशींची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केलेली असल्यास द्राक्षे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रतिनिधीद्वारे नमुने काढून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातून (एनआरसी) तपासून घ्यावीत. शून्य उर्वरित अंश द्राक्षेही स्थानिक बाजारपेठेतही चांगल्या किमतीमध्ये विकण्यासाठी ही विशेष सोय केली आहे. मात्र, निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या बागायतदारांची द्राक्षे शून्य उर्वरित अंश तपासणीसाठी एनआरसीमध्ये स्वीकारली जाणार नाहीत. त्यासाठी निर्यातीसाठीच्या सेवा पुरवणाऱ्या प्रयोगशाळांचाच वापर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com