ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी, पिंक बेरीपासून संरक्षण आवश्यक

ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी, पिंक बेरीपासून संरक्षण आवश्यक
ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी, पिंक बेरीपासून संरक्षण आवश्यक

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये बहुतांश द्राक्ष विभागामध्ये वातावरण पुन्हा ढगाळ होण्याची शक्यता आहे. सांगलीच्या कवठे महांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज या भागामध्ये शुक्रवारी (ता. २७) हलका पाऊस एक दोन ठिकाणी होण्याची शक्यता दिसते. बाकी अन्य विभागांमध्ये पावसाची फारशी शक्यता दिसत नाही. नाशिक भागामध्ये शनिवार रविवारनंतर वातावरण जास्त ढगाळ होण्याची शक्यता आहे. या काळात रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. या वाढलेल्या थंडीमुळे रात्री व दिवसाच्या तापमानातील फरक वाढतो, त्यामुळे थॉम्सन सीडलेस व त्याचे क्लोन असलेल्या जातींमध्ये मण्यांत पाणी भरण्यास सुरवात झाल्याच्या अवस्थेमध्ये पिंक बेरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक घडावर पेपर लावल्यास पिंक बेरीची समस्या राहत नाही. या वर्षी सुरवातीपासून आलेल्या जास्त थंडीमुळे मण्यात पाणी भरण्याची स्थिती येण्यास उशीर झाला असेल, तरीही येत्या शुक्रवार-शनिवारच्या आधी घडावर पेपर लावण्याचे काम प्राधान्याने करून घ्यावे. ढगाळ वातावरणामध्ये भुरीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असते. बागेत भुरीचे थोडेही लक्षण दिसत असल्यास भुरीच्या नियंत्रणासाठी योग्य फवारणी करणे आवश्यक आहे. - यासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे चांगल्या प्रकारे कव्हरेज होईल, असे फवारून घ्यावे. त्यापाठोपाठ जैविक नियंत्रणासाठी अॅम्पिलोमायसीस ८ ते १० मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात जरूर फवारावे. सल्फर हे बाह्यस्पर्शी असल्यामुळे त्याच्या कव्हरेजकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

  • ज्या ठिकाणी फवारणीचे सल्फर पोचत नाही, तिथे भुरीचा प्रादुर्भाव होणे शक्य असते. म्हणूनच सल्फरच्या फवारणीपाठोपाठ जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त अशा बुरशी किंवा जिवाणूंची फवारणी केल्यास जिथे सल्फर पोचत नाही, तिथे जैविक नियंत्रणाचे घटक पोचू शकतात. परिणामी भुरीचे नियंत्रण चांगले मिळते. ज्या ज्या ठिकाणी सल्फरचाच वापर सुरवातीपासून झालेला आहे, त्या ठिकाणी जैविक नियंत्रण घटकांचा उपयोग करणे आवश्यक आहे.
  • सोलापूर, सांगली विभागातील बऱ्याचशा ठिकाणी तापमानामध्ये वाढ होत आहे. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे. परिणामी सापेक्ष आर्द्रता कमी होत आहे. अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा किंवा बॅसीलस सबटिलीस या जिवाणूजन्य घटकांच्या फवारण्या भुरीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतील.
  • नाशिक सारख्या भागामध्ये जेथे पुन्हा थंडी वाढत आहे, अशा ठिकाणी अॅम्पीलोमायसीस चांगले काम करू शकते.
  • मण्यांवर कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. थंडीमुळे होणारे मण्यांचे क्रॅकिंग कमी होईल. त्याच बरोबरच जैविक नियंत्रणासाठी वापरलेले घटक चांगल्या प्रकारे काम करू शकतील.
  • वर सुचवलेल्या सर्व फवारण्या घडांवर पेपर चढवण्याआधी करणे आवश्यक आहेत.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com