पावसाळी वातावरणात द्राक्ष घडनिर्मितीवरील परिणाम टाळा

पावसाळी वातावरणात द्राक्ष घडनिर्मितीवरील परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना
पावसाळी वातावरणात द्राक्ष घडनिर्मितीवरील परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना

द्राक्ष विभागामध्ये सध्या एकतर पाऊस झाला आहे किंवा सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांत सांगली, नाशिक व सोलापूर भागांत पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात अचानक घट झाली, आर्द्रतासुद्धा तितक्‍याच प्रमाणावर वाढली. सध्या सूक्ष्म घडनिर्मितीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षबागेत या पावसाचा होणारा परिणाम आणि संभाव्य उपाययोजनांविषयी माहिती घेऊया. सूक्ष्म घडनिर्मितीचा कालावधी नुकताच सुरू झालेल्या बागेमध्ये जोरदार पाऊस झाला असल्यास जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढले असेल. परिणामी बागेतील सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यांपर्यत पोचली असेल. या दोन्ही बाबींमुळे वेलीची वाढ आता पुढील ४-५ दिवसात जास्त जोमाने होताना दिसेल. वेलफुटींची वाढ जोमात होणे म्हणजे पेऱ्यातील अंतर वाढणे होय. या वेळी वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीची शक्यता कमी होते. तयार होत असलेल्या घडाचे रूपांतर हे बाळीमध्ये होते. सध्या झालेल्या पावसामुळे बागेत अशीच परिस्थिती निर्माण होईल. या पावसामुळे फुटीचा जोम वाढण्यासोबतच बगल फूट वाढतात. यामुळे कॅनॉपीची गर्दी वाढून डोळ्यावर सूर्यप्रकाश येण्यामध्ये अडचणी येतील. सूक्ष्म घडनिर्मितीकरिता डोळ्यांवर सूर्यप्रकाश आवश्‍यक असतो. अशा परिस्थितीत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

फुटींची वाढ नियंत्रणात ठेवणे ः पावसाळी वातावरणात वाढीसाठी पोषक वातावरण असते. अशा वातावरणात वेलीमध्ये अचानक जिबरेलिन्सची पातळी वाढते. यामुळे पेशींची संख्या व आकार वाढण्यास मदत होते. परिणामी फुटींची वाढ जोमात होते. द्राक्षबागेत फुटींची वाढ नियंत्रणात ठेवणे कठीण होते. अशावेळी शेतकरी शेंडा खुडतात. वाढत असलेला शेंडा जर २-३ पानांसहित खुडल्यास (हार्ड पिंचिंग) बगलफुटी जास्त जोमात येतील. या वाढलेल्या बगलफुटी फलधारणा होत असलेल्या डोळ्यावर सावली करतील. म्हणजेच ढगाळ वातावरणात जो काही सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, तोसुद्धा या डोळ्यावर पडणे शक्‍य होणार नाही. अशा कालावधीत घडनिर्मितीत अडचणी वाढतात. अशा परिस्थितीमध्ये शेंडावाढ थांबण्याकरिता हार्ड पिंचिंग करण्याऐवजी फक्त टिकली मारावी. टिकली मारल्यानंतर वेलीच्या शेंड्याकडील भागामध्ये जखम होते. परिणामी वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण कमी होते. यामुळे बगलफूट जास्त जोमात वाढणार नाही. काडीवरील डोळ्यावर सावली पडत असल्यास असे पानसुद्धा काढून टाकावे. बगलफूट काढणे, शेंडावाढ नियंत्रणात ठेवणे यामुळे कॅनॉपी मोकळी होईल. त्यामुळे उपलब्ध सूर्यप्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीस चालना मिळेल.

संजीवकांचा व खतांचा वापर महत्त्वाचा ः

  • पावसामुळे वेलीत वाढलेले जिबरेलिन्स हे सूक्ष्म घडनिर्मितीस अडचणीचे होते. तेव्हा, घडनिर्मिती वाढण्यासाठी वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण वाढवणे गरजेचे असेल. या वेळी ६ बीए, युरासील ही दोन संजीवके उपलब्ध आहेत. याची फवारणी घेणे गरजेचे आहे. ६ बीए हे १० पीपीएम प्रमाणात फवारल्यानंतर ४-५ दिवसांनी युरासिलची फवारणी २५ पीपीएमप्रमाणे करावी. बऱ्याच वेळा बागायतदार दोन्ही संजीवके एकदाच मिसळून फवारणी करतात. बऱ्याच वेळा संजीवके ही एकमेकांशी सुसंगत नसल्यामुळे दोन्ही संजीवकाचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. संजीवकांची फवारणी ही शक्यतो स्वतंत्र करावी.
  • वेलीच्या वाढीचा जोम कमी करण्याच्या दृष्टीने खतांचा वापरसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. पाऊस झाल्यानंतर वाढीचा जोम वाढलेल्या अवस्थेमध्ये तो कमी करण्याकरिता एकरी ४-५ किलो पालाशची पूर्तता जमिनीतून करावी.
  • सूक्ष्म घडनिर्मितीकरिता न्यूक्‍लिक ॲसीडचे प्रमाण वाढणे आवश्‍यक असते. त्याकरिता वेलीमध्ये स्फुरदाची उपलब्धता गरजेची असते. वाढीचा जोम कमी करणे व न्यूक्‍लिक ॲसिड वाढवण्याच्या दृष्टीने जास्त स्फुरद व कमी पालाश उपलब्ध असलेली खताची ग्रेड (उदा. ०ः५२ः३४) वापरावी. या खताची फवारणी या वेळी जास्त फायदेशीर होईल.
  • कीड व रोग नियंत्रण ः

  • फुटीची वाढ जोमात होते, याचाच एक अर्थ पानांची लवचिकतासुद्धा तितक्‍याच प्रमाणात वाढते आहे. जेव्हा पाऊस थांबून व उन्हे पडायला सुरवात होते, अशा वेळी बागेत आर्द्रता जास्त वाढते. अशा कोवळ्या फुटींवर फुलकिडे (थ्रिप्स)चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
  • ज्या ठिकाणी सूक्ष्म घडनिर्मिती शेवटच्या टप्प्यात आहे, अशा बागेत कॅनॉपीसुद्धा जुनी होत असल्याचे अनुभवास येईल. या वेळी ढगाळ वातावरणात कमी झालेले तापमान व दमट वातावरण भुरी रोगाच्या प्रादुर्भावाकरिता पोषक असे वातावरण असते. अशा वेळी कॅनॉपी मोकळी राहील याकडे लक्ष द्यावे.
  • बागेत सध्या वाढलेल्या आर्द्रतेमध्ये रोगांचा प्रादुर्भावसुद्धा तितक्‍याच गतीने वाढताना दिसून येईल. अशावेळी, द्राक्षवेल सशक्त असणे गरजेचे आहे. वेलीमध्ये पालाशची कमतरता नसेल याची काळजी घ्यावी. याचसोबत बागेमध्ये जैविक पद्धतीने नियंत्रणाला महत्त्व द्यावे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले ट्रायकोडर्मा, बॅसीलस सबटिलीस, सुडोमोनास, इ. उपलब्ध आहेत. यापैकी आपल्या बागेत आवश्‍यक असलेली जैविक कीडनाशके फवारणीच्या माध्यमातून व ड्रीपमधूनसुद्धा दिल्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे जमिनीतील पूर्ततेमुळे वेलीची रोगप्रतिकार क्षमता वाढेल, तर फवारणीमुळे रोगाचे नियंत्रण होईल. यासाठी बागेत आर्द्रता गरजेची असते. ही परिस्थिती सध्या बागेत उपलब्ध आहे.
  •  संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० ( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com