फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या पिकांसाठी रासायनिक खतांच्या बरोबरीने जिवाणू खतांचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक हे पावडर व विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. पिकांच्या योग्य पोषणासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी स्फुरद हा आवश्यक घटक आहे. पिकांमध्ये प्रथिने, जनुके आणि ऊर्जानिर्मितीसाठी स्फुरद हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, जमिनीत स्फुरद हे विरघळण्यासाठी अतिशय कठीण असते. कारण ते विविध कॅल्शियम, सोडियम बरोबरीने जोडले जाते. त्यामुळे त्याचे अनुपलब्ध स्वरूपात रूपांतरण होते. त्यामुळे शिफारशीनुसार, दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर फायदेशीर ठरतो.
हे जिवाणू स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळविण्यासाठी जिवाणू विविध प्रकारचे आम्ल तयार करतात. यामध्ये प्रामुख्याने असेटिक ॲसिड, प्रोपायनीक ॲसिड, ब्युटॅरिक ॲसिड, इन्डॉल ॲसेटिक ॲसिड, जिब्रेलिक ॲसिड यांचा समावेश असतो. हे घटक स्फुरद विरघळविण्याबरोबरच संप्रेरकांचेही काम करतात. संप्रेरके पिकांची वाढ, फुलधरणा व फळधारणा वाढवण्याचे काम करतात. फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या पिकांसाठी रासायनिक खतांच्या बरोबरीने जिवाणू खतांचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक हे पावडर व विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. पावडर ः बीजप्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवावे. सुकल्यानंतर पेरणी करावी. विद्राव्य ः ३ ते ५ मि.लि. प्रतिकिलो बियाणे. याचा वापर बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया आणि ठिबक सिंचनामध्ये करता येतो. रोपप्रक्रियेसाठी ३ ते ५ मि.लि. जिवाणू संवर्धक प्रतिलिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात कांदा, मिरची, टोमॅटो रोपे १५ मिनिटे बुडवून ठेवावीत. त्या नंतर लागवड करावी. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपे लवकर जमिनीत रूजतात. त्यांची चांगली वाढ होते. ठिबकसाठी एक लिटर विद्राव्य स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रती २०० लिटर पाण्यात मिसळावे. ठिबक सिंचनाद्वारे पिकांना द्यावे. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक वापरल्यामुळे प्रतिहेक्टर ३० ते ५० किलो स्फुरद पिकांना उपलब्ध होते. फळभाज्या, पालेभाज्यांची वाढ होते. फळधरणा वाढते. उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के वाढ होते. स्फुरदाबरोबर विविध संप्रेरके उपलब्ध झाल्यामुळे मिरची, कांदा, टोमॅटो, वांगी फळांची गुणवत्ता वाढते. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक वापरल्याने शिफारशीप्रमाणे अगोदरच्या पिकाला वापरलेले स्फुरद नंतरच्या पिकाला उपलब्ध होते. जमिनीचे प्रदूषण कमी होते. जमिनीची सुपीकता टिकून रहाते. संपर्क ः अर्चना ढोले, ७७७८०१३७४१ (आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात)