१९६०-७० च्या हरितक्रांतीनंतर २०-२५ वर्षे आपण धान्योत्पादनाचे उच्चांक केले. १९९० नंतर त्याला उतरती कळा लागली व हरितक्रांती बदनाम झाली. कृषिशास्त्रावर आज जैवतंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून, शेतीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्याला प्रतिकारक जात शोधणे असा कल होत आहे. मात्र त्याला निश्चित मर्यादा आहेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने भू-सूक्ष्मजीवशास्त्र फायद्याचेच ठरणार आहे. कृषी अभ्यासक्रमासह शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणात याचा सखोल समावेश झाल्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. त्याच उद्देशाने ही लेखमाला दर बुधवारी सुरू करत आहोत. १९७० मध्ये कृषी पदवीधर झाल्यानंतर शेती सुरवात केली. शिक्षण व कृषि खात्याच्या घडीपत्रिका, शेतकरी मेळाव्यातील मार्गदर्शन, वर्तमानपत्रे, मासिकातील लेख यांचा उपयोग करत असल्याने प्रारंभीची १५-२० वर्षे उत्तम उत्पादनही मिळाले. मात्र त्यानंतर अनेक उपाययोजना करूनही उत्पादन घटत गेले. पुढे तमिळनाडू येथून मागविलेल्या सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख करून दिली. अभ्यासक्रमात वनस्पतीवर अनेक रोग सूक्ष्मजीवांमुळे येतात इतकी माहिती होती. मात्र ते अनेक सूक्ष्मजीवांच्या जाती-प्रजाती वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करत असल्याचे समजले. या उपयुक्त जिवाणूंच्या मदतीने जमिनीची उत्पादकता वाढवता येईल, या उद्देशाने भू-सूक्ष्मजीव शास्त्राविषयी आसपासच्या ग्रंथालयात उपलब्ध ग्रंथाचे वाचन सुरू केले. कृषी पदवीधर असलेल्या मलाही यात अनेक नवीन गोष्टी आढळत गेल्याने अभ्यासातील गोडी वाढली. गेली २८ वर्षे मी या विषयाचा विद्यार्थी आहे. या विषयाने माझी शेती करण्याची पद्धत आमूलाग्र बदलून टाकली. नवीन तंत्राच्या वापरातून उत्पादकतेचा आलेख परत वर जाऊ लागला. रसायनशास्त्रज्ञांद्वारे पीकपोषणाचा अभ्यास ः सर्व विज्ञानशाखांमध्ये वेगाने प्रगती होत असताना भारतात सूक्ष्मजीवशास्त्र शाखा तुलनेने अंधारात राहिली असल्याचे माझे मत आहे. विद्यापीठीय कृषी अभ्यासक्रमात मिळालेल्या तुटपुंज्या ज्ञानावर स्वतः त्या विद्यार्थ्यांचे पोषण होत नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांचे पोषण कसे होणार? याचे उत्तर इतिहासात शोधताना एक बाब लक्षात आली. १९१० मध्ये इंग्रज सरकारने भारतात चार ठिकाणी कृषी महाविद्यालये स्थापन करून कृषी शिक्षणाचा पाया घातला. पुण्यातील कृषी महाविद्यालय यापैकीच एक. युरोपात अगर इंग्लंडमध्ये त्यापूर्वी काही वर्षे या अभ्यासक्रमाला सुरवात झाली असावी. त्या काळात भारतात अजूनही रासायनिक खतांचा वापर सुरू झाला नव्हता. युरोपात नत्र, स्फुरद, पालाश व काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपयुक्तता लक्षात आली होती. जर्मन रसायनशास्त्रज्ञ लायबिग यांच्या ‘लॉ ऑफ मिनिमम’ वरून त्याला पुष्टी मिळू शकते. पिकांच्या गरजांचा अभ्यास करून कोणते रसायन दिल्यास फायदा होईल, याबाबत बहुतांश अभ्यास रसायनशास्त्र विभागाकडून होत होता. यातून पुढे आलेल्या शिफारशीमुळे उत्पादन वाढत असल्याचे पुढे आल्याने रासायनिक खतांचे कारखाने उभे राहिले. उत्पादनात वाढ होत असल्याने हा पर्याय शेतकऱ्यांतही लोकप्रिय होत गेला. भारतात १९६० नंतर यांच्या वापराला वेग आला असला तरी माझ्या वडिलांच्या १९४० मधील टिपणामध्ये माती परीक्षणातून खत मात्रा हे तंत्र सापडते. एकूणच पीक पोषणावर १००-१२५ वर्षांपूर्वीपासून कृषी रसायनशास्त्राचा प्रभाव आहे. अगदी २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना आरोग्य कार्डवाटप कार्यक्रमामागेही हेच तंत्र आहे. सूक्ष्मजीवशास्त्राचा अल्प परिचय ः
संपर्क ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.