शेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही दाखवला प्रकाश

शेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही दाखवला प्रकाश
शेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही दाखवला प्रकाश

जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील वयाची पासष्टी गाठलेले शेतकरी प्रकाश पांडुरंग लहासे यांनी अत्यंत कमी पाण्यात आपली सव्वातीन एकरांतील शेवगा पिकाची रसायन अवशेषमुक्त व विना मशागतीची सव्वी तीन एकर शेती यशस्वी केली आहे. मजुरी वगळता अन्य खर्च कमी केले आहेत. त्यांचे प्रयोग, धडपड दुष्काळाशी झगडणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी नवी ऊर्जा देऊ शकते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या समस्यात वाढ होत आहे. त्यावर मात कशी करायची, हाच मुद्दा गावोगावी चर्चेत असला तरी पाण्याशिवाय काहीच शक्य नसल्याचा नकारात्मक सूरही अनेकजण लावतात. जळगाव जिल्ह्यातील पहूर हे गावही अवर्षणग्रस्त. जानेवारीतच शेतशिवार उजाड होत असलेल्या या गावामध्ये प्रकाश लहासे यांची साडेनऊ एकर शेती आहे. लहासे हे सुरवातीला कळवण (जि. नाशिक) व नंतर फत्तेपूर (ता. जामनेर) येथील कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. सेवेत असताना ते केवळ सुटीच्या दिवशी शेतावर येऊन शेती करून घेत. निवृत्तीनंतर २०११ मध्ये शेतीची सूत्रे हाती घेतली. दोन शिवारातील या शेतीमध्ये एक विहीर खोदली तरी पाणी फारसे लागले नाही. दोन बोअरही घेतल्या आहेत. यातून केवळ पाच दहा मिनिटे चालणाऱ्या पंपावर शेती करणे म्हणजे दिव्यच! सुरवातीची दोन वर्षे बीटी कापूस, ज्वारीची शेती केली. त्यात खर्च व उत्पादन यांचा ताळमेळ बसला नाही. हिंमत न हरता त्यांनी शेवगा शेतीची कास धरली. जून २०१३ मध्ये सव्वातीन एकरांत १२ बाय १२ फूट अंतरात शेवग्याची लागवड केली. सुरवातीला पाऊस बरा होता. पीक जगले. त्यात वर्षी डिसेंबरमध्ये हंगाम हाती आला. त्या वर्षी परतीचा पाऊसही बरा होता, यामुळे शेंगा काढणीर्पंत पिकाला सिंचनाची गरजच भासली नाही. त्या वेळी ते रासायनिक खतांचा वापर, मशागत करत असत. त्याच काळात नैसर्गिक शेतीच्या शिबिरात सहभाग घेतला. त्यानुसार शेतीचे नियोजन सुरू केले. अॅग्रोवनचे नियमित वाचक असल्यामुळे त्यातील जमीन सुपीकता, विना मशागतीची शेती व तणाचे महत्त्व यासंबंधी कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे लेख वाचनात आले. चिपळूणकर यांच्याशी संपर्क वाढविला. त्यांच्या प्रेरणेतून मशागतच करायची नाही, या निष्कर्षावर पोचले. अगदी आधीच मशागतीसाठी म्हणून घेतलेला लहान ट्रॅक्टरही विकला. २०१५ पासून शून्य मशागत, नैसर्गिक शेती करीत आहेत.

  • एक देशी गाय व दोन वासरांचे संगोपन करीत आहे. फवारणीसाठी दर १० ते १२ दिवसात दशपर्णी अर्क आणि जीवामृताचा वापर करतात.
  • जे तण उगवते, त्याचे नियंत्रण न करता कापून आच्छादन करतात. जमिनीत सेंद्रिंय कर्ब वाढले आहे. आच्छादन राहत असल्याने ओलावा टिकून राहतो.
  • फळबागेमध्ये आणली विविधता

  • पुढे २०१६ मध्ये धाडस करत दोन एकर शेवगा पिकातच १६ बाय १६ फुटात डाळिंबाची रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २०० झाडे लावली. कुठलेही सिंचन न करताच डाळिंब पीक जोमात आहे. तर सव्वा एकर शेवग्यात २० बाय २० फूटवर लिंबूची १०० झाडे लावली.
  • यंदा सव्वा एकर शेवग्यात १०० आंब्याची झाडे लावली. आंब्याची रोपेही घरीच तयार केली.
  • शेवग्यात काही ठिकाणी अगदी झाडांनजीक गिरीपुष्पाची झाडे आहेत. ही झाडे जमिनीत नायट्रोजन देतात, असे लहासे म्हणतात.
  • डाळिंब पिकावर सूत्रकृमीचा त्रास होऊ नये, यासाठी बागेतच कडूनिंबाची काही झाडेही जगविली आहेत.
  • बांधावर कडूनिंब, बाभुळ, निरगुडी, तुती, हादगा, शेवरी, गिरीपुष्प, चिंच, पिंपळ, वड, उंबर, बोर, बेहडा, सीताफळ ही झाडेही जगविली आहेत. जवळपास १०० झाडे बांधावर आहेत.
  • डाळिंब व लिंबूचे उत्पादन अजून सुरू झालेले नाही. डाळिंबाला यंदा चांगली फुले लगडलेली असली तरी पाण्याअभावी फळे कितपत धरतील, याची शंका आहे. मात्र, प्रयोग करत आहे. भविष्यात शेततळे किंवा वाघूर नदीवरून उपसा सिंचन करण्याचा विचार आहे.
  • यंदा परतीचा पाऊस आलाच नाही. पहूरचे शिवार ओसाड होऊ लागले असले तरी लहासे यांचे शेत हिरवेगार, चैतन्यमयी आहे. येथे दिवसभर पशुपक्ष्यांचा चिवचिवाट असतो.
  • कापूस, तूर, वांगी, मिरची, भुईमूगही घेतला

  • लहासे दरवर्षी सव्वातीन एकरांतील शेवग्यात आंतरपीक म्हणून देशी व बीटी कापूस, तूर, भुईमूग, वांगी, मिरची यांचे उत्पादन घेतात. यंदा तीन क्विंटल कापूस घरात आला आहे. उडीद व मुगाचे मिळून सव्वा क्विंटल उत्पादन आले. मिरच्या, वांगी घरापुरते सहज मिळतात. भुईमुगाच्या दोन क्विंटल शेंगा मिळाल्या.
  • नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेवगा असल्याने त्याच्या बियांनाही परिसरात मागणी आहे. लहासे दरवर्षी चार ते पाच किलो शेवगा बियाण्याची विक्री करतात. या बियाण्याला तीन हजार रुपये किलो दर मिळतो.
  • असे असतात बाजारभाव

  • प्रमुख पीक शेवगा असून, त्याचे उत्पादन दरवर्षी ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होते. त्याची विक्री जळगाव बाजार समितीतील एका व्यापाऱ्यामार्फत करतात. मागील वर्षी प्रतिकिलो सरासरी ३० रुपये दर मिळाला. तर २०१६ मध्ये सरासरी २५ रुपये प्रतिकिलोचा दर होता.
  • डिसेंबरमध्ये सव्वा तीन एकरांत प्रतिदिन तीन क्विंटल शेवगा निघतो. डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत प्रतिकिलो ४० रुपये सरासरी दर मिळतो.
  • फेब्रुवारीच्या मध्यानंतर प्रतिकिलो २५ ते ३० रुपये दर मिळतो. मार्च महिन्यात प्रतिकिलो २० रुपये आणि एप्रिल व मेमध्ये प्रतिकिलो १५ रुपये दर मागील वर्षी मिळाला. यंदा ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
  • दरवर्षी किमान अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पादन लहासे घेत आहे. सेंद्रिय फवारणी व काढणीच्या कामासाठी दोन हंगामी मजूर असतात. मजुरीवर दरवर्षी किमान ५० हजार रुपये खर्च येतो.
  • जूनमध्ये पावसाचा अंदाज घेऊन छाटणी करतात. २० ते २५ मिलिमीटर पाऊस पडला की फुटवे जोमात येतात.
  • कमी पाण्यावर तग धरण्यासाठी...

  • पावसाळ्यात ७०० ते ९०० मि.लि. पाऊस झाला तर मार्चपर्यंत कसेबसे १० ते १२ मिनिटे पंप चालेल, एवढे पाणी मिळते. यंदा विहीर पूर्ण कोरडी आहे.
  • बोअरद्वारे प्रति दिन केवळ ४०० लिटर पाणी मिळते. त्यांचा वापर प्रामुख्याने गायींच्या पिण्यासाठी, जिवामृत आणि दशपर्णी अर्क तयार करणे व सेंद्रिय फवारणीसाठी केला जातो.
  • घराशेजारील सव्वा तीन एकर शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. उर्वरीत ६ एकर क्षेत्र अन्य शेतकऱ्याला करण्यासाठी दिले असून, त्यातून प्रति वर्ष काही रक्कम मिळते.
  • लहासे यांचे पुत्र अविनाश हे कृषी विषयातील पदवीधर असून, मुंबईत डाक खात्यात निरीक्षक पदावर सेवेत आहे. तर सून वैशाली यादेखील रेल्वे डाक खात्यात नोकरी करतात.
  • संपर्क - प्रकाश लहासे, ९४२३९३७१३६, ९३७०८०४३४६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com