हळदीची भरणी आवश्यक...

हळद भरणी
हळद भरणी

सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. वाढीच्या टप्यात भरणी, खत व्यवस्थापन आणि तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते. भरणी करताना खते दिल्यामुळे ती योग्यरीत्या मातीत मिसळली जातात. हळद लागवड होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. शाकीय वाढ होण्याचा हा कालावधी (४६ ते १५० दिवस) असतो. या काळात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित फरक होत असते. भरणी ः

  1. लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी हळदीचे पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्‍यक असते. कारण या कालावधीमध्येच हळदीस फुटवे व हळकुंड फुटण्यास सुरवात होते.
  2. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी. संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी.
  3. भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर हलकेसे पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती निघून पावसाने वाहून जाणार नाही.
  4. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते. उत्पादनामध्ये १० ते १५ टक्कांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते.
  5. गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यामधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. मजुरांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

फायदे ः

  1. भरणी केल्यामुळे उघडे पडलेले गड्डे संपूर्णपणे झाकले जातात. परिणामी गड्डे झाकल्यामुळे कंदमाशी सारख्या किडींना गड्ड्यावर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे या किडीची पुढील पिढी नष्ट होण्यास मदतच होते. तसेच कंदकुंज रोगालादेखील आळा बसतो.
  2. उघड्या गड्ड्याच्या बाजूने नव्याने येणारी हळकुंडे संपूर्ण झाकली जातात, त्यांची वाढ चांगली होते.
  3. उथळ झालेल्या सऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते. परिणामी पिकांस दिलेले पाणी व्यवस्थित व समप्रमाणात मिळते. इतस्तः पाण्याचा अपव्यय होत नाही.
  4. भरणी करतेवेळी शिफारस केलेली खत मात्रा दिल्यामुळे संपूर्ण खते मातीखाली झाकली जातात. परिणामी खतांचा ऱ्हास होत नाही. दिलेले खत हळदीच्या मुळाजवळ पडल्यामुळे चांगला फायदा होते. खतांची कार्यक्षमता वाढते.
  5. मातीखाली झाकलेल्या जेठा गड्ड्यांची वाढ चांगली होते. हळकुंडांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी उपादनात वाढते.
  6. भरणीमुळे लांब मुळे तुटली जातात. कार्यक्षम तंतुमय मुळे जास्त प्रमाणात तयार होऊन आवश्‍यक अन्नघटक शोषणाची क्रिया चांगली होऊन उत्पादन वाढीस मदत होते.
  7. लहान मोठ्या तणांचे नियंत्रण होते, निंदणीच्या खर्चात बचत होते.
  8. माती पोकळ झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाचे चांगले पोषण होते.

खतांचे व्यवस्थापन ः

  1. हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावयाचा असतो.
  2. नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा. या वेळी हेक्‍टरी २१५ किलो युरिया आणि २५ किलो फेरस सल्फेट द्यावे. भरणीच्या वेळी हेक्‍टरी दोन टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा. भरणी करताना खते दिल्यामुळे ती योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.

पाणी व्यवस्थापन ः

  1. पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याती दक्षता घ्यावी. पाणी जर साठून राहिले तर मुळांना ऑक्‍सिजन घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होताना दिसतात. अशा वेळी साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करावा.
  2. ऑगस्ट, सप्टेंबर हा हमखास पावसाचा कालावधी असल्याने शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे.
  3. पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा तपासून पाणी देण्याचे नियोजन करावे.
  4. रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी देऊ नये. त्यामुळे सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्‍यता असते. या पद्धतीने पाणी दिल्याने १० ते १५ टक्के उत्पादन जास्त मिळाल्याचे दिसून आले आहे.
  5. हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे.

तण नियंत्रण ः

  1. लागवड करताना शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेणखतातून तणांचे बी शेतात येते. या तणांचे वेळीच नियंत्रण करावे.
  2. लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने तणांच्या वाढीनुसार मजुरांच्या साह्याने निंदणी करून घ्यावी. हळद उगवणीनंतर शक्यतो तणनाशक फवारू नये. वाढीच्या काळात तणनाशकाची फवारणी केली, तर पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो.

संपर्क ः डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४ (हदळ संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com