आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते. ज्यामुळे मातीचा वरचा थर सैल होऊन मातीला पडलेल्या भेगा बुजल्या जातात. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो.
पेरणीनंतर बऱ्याच वेळा उगवण नीट न झाल्यामुळे वाफ्यात, सऱ्यात रिकाम्या जागा दिसतात. अशा वेळी टोकण किंवा रोपांची लागवड करावी. साधारणतः पेरणीनंतर ८ ते १० दिवसात नांग्या भराव्यात. जेणेकरून आधीच्या आणि नंतर लावलेल्या पिकांच्या वाढीत जास्त फरक पडत नाही. यामुळे रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. बऱ्याच वेळा दाट पेरणीमुळे योग्य अंतर राहत नाही. पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी व २२ ते २५ दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. यामुळे या रोपातील अंतर योग्य राहते. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करावी. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्यांपेरणी नंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी. खांदणी मुख्यतः ऊस, आले, बटाटा, हळद, भुईमूग इत्यादी पिकांसाठी केली जाते. उसासाठी खांदणी ही महत्त्वाची आंतरमशागत आहे, यामुळे पाणी एकसारखे बसते, शिवाय पीक लोळत नाही. उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळबांधणी व ४ ते ५ महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी. पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे. मात्र खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे. पेरणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी पिकांच्या दोन ओळीत सेंद्रिय पदार्थांचे, उदा. गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तुरकाठ्या, ज्वारीची धसकटे, उसाचे पाचट, पिकांचा टाकाऊ भाग इत्यादी आच्छादक म्हणून वापरावे. साधारणपणे प्रती हेक्टरी पाच टन या प्रमाणात सेंद्रिय आच्छादकाचा वापर करावा. आच्छादकामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादी फायदे होतात. आंतरमशागत केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते. ज्यामुळे मातीचा वरचा थर सैल होऊन मातीला पडलेल्या भेगा बुजल्या जातात. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो. बाजरीमध्ये दहा दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपातील अंतर १५ से. मी. ठेवावे. तुरीच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरवातीपासूनच तणविरहीत ठेवावे.पीक १५ ते २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी. पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे. हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे. भुईमुगाच्या पिकात, पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व दोन खुरपण्या घ्याव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नये. सूर्यफूल पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी करावी, दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी. भाजीपाला पिकांमध्ये आवशक्यतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवशकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्याव्यात. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारावी. आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो. डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)