बांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती, व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान याचबरोबरीने बाजारपेठेची मागणी याची माहिती असणे आवश्यक आहे. लेखमालेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बांबू लागवड आणि व्यवस्थापनाविषयी प्रश्न येत आहेत. बांबू पिकातील माझ्या अभ्यासानुसार काही प्रशांची उत्तरे आजच्या भागात देण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या लेखात बांबू लागवड करताना एकरी ५ ते ७ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन सुरवात करुया असे म्हटले होते. त्यावर काही जणांनी हे उत्पादनाचे फार कमी उद्दिष्ट आहे, त्यामुळे बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळणे शक्य होईल का? असे मत मांडले. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. मी आधीच्या लेखात व्यवस्थापन पद्धती सांगितली होती. ती पाहता आणि त्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसाधारण हवामानात चौथ्या वर्षापासून बांबू तोड सुरू होणार आहे. बांबू हे पीक नवीन असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांनी दर बेटातून एक चांगला बांबू जर उत्पन्न केला तर त्याने यश मिळवले आहे असे होईल. अर्थात याचा अर्थ असा नाही की फक्त एकच बांबू मिळेल. शेतकरी जर व्यवस्थित देखभाल करणारा असेल तर त्याला एका बेटातून तीनपेक्षा जास्त बांबू पहिल्या तोडीपासून मिळू शकतात. फक्त पहिल्या दोन ते तीन तोडीतील बांबू हे लहान, कमी जाडीचे व वजनाला कमी आढळतील. हे साहजिक आहे.
हवामानाचा अभ्यास करा
हवामान हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या हवामानात जेथे उन्हाळा तीव्र आहे, हवेत कोरडेपणा जास्त आहे त्याठिकाणी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण दमटपणा निर्माण करू शकत नाही. उन्हाळातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाणारे तापमान कमी करू शकत नाही. या आपल्या मर्यादा आहेत. कोकणासारख्या प्रदेशात भरपूर दमट हवामान आहे, चार महिने पडणारा हुकमी पाऊस आहे. अशा वेगवेगळ्या हवामानात ज्या जाती सुलभतेने वाढतात हे वर्षानुवर्षे माहीत आहे त्याच जाती तेथे लावाव्यात, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ठोकताळा आहे. याचा अर्थ इतर जाती लावून बघू नयेत असा नाही. ५ ते १० रोपे वेगळ्या जातीची लावावीत. अनुभव घ्यावा. तो बांबू आपल्याला जमला, त्याची विक्री करता आली तर अवश्य लावावा. पण, हे सरसकट सांगता येत नाही. कारण, ते शास्त्राला धरून नाही. यासाठी एक पद्धती आहे. त्यामध्ये नवीन जात ही सर्व हवामानात अनेक ठिकाणी लावून बघावयाची असते. त्यांची निरीक्षणे नोंदवावी लागतात. यासाठी किती झाडांची निरीक्षणे नोंदवायची हेही ठरलेले असते. अशाप्रकारे आपल्याकडे सर्व जातींचा विस्तृत अभ्यास झालेला नाही. तो झाल्यावर आणखी काही जातींची यात भर पडू शकते. म्हणून हवामानानुसार जातींची शिफारस केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मानवेल व कोरड्या प्रदेशात विक्रीची हमी असेल तर बल्कोवा लावता येईल. बल्कोवा सामान्य बाजारात कमी दरात खपतो हा अनुभव आहे. त्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याला बाजारात कमी किंमत मिळते, त्यामुळे त्यासाठी कोणी कायदेशीर करार केला तरच लावावा. बाल्कोवा लावताना पूर्णपणे बागायती पद्धतीने लावावा. कोरडवाहू असेल किंवा पाण्याची खात्री नसेल तर लावू नये, नुकसान होईल.
रोपांची लागवड
गटातून बाजारपेठ तयार करा कोणतेही पीक लागवड करताना त्याची कोठे विक्री व्यवस्था आहे याची सखोल चौकशी शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे. कोणीतरी सांगितले म्हणून लागवड केली आणि शेवटी पस्तावायची वेळ आली ही स्थिती असता कामा नये. जेथे वर्षानुवर्षे लागवडीखाली बांबू होतो त्या सह्याद्रीच्या ८ ते १० जिल्ह्यात विक्री व्यवस्था काही प्रमाणात अस्तित्वात आहे. जेथे नवीन लागवडी होताहेत, जेथे आधी बांबू लावायला आणि तोडीला बंदी होती अशा मराठवाडा, विदर्भ व खानदेश या प्रदेशात खासगी जमिनीवर लागवड करताना हा प्रश्न निर्माण होणार अपेक्षित आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गवारी करून जर सह्याद्रीतल्या किंवा इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांना बोलवले तर लिलाव होऊ शकतात. मेंढा लेखामध्ये बांबू लिलाव करायला व्यापारी येतात, तर तुमच्याकडे का येणार नाहीत ? यासाठी गट पद्धतीने तोड करणे, वर्गवारी करणे आणि लिलाव करणे ही पद्धत अवलंबावी लागेल.
ः डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५, (लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.