प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागेल

केवळ पुस्तकी धडे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार नाहीत. प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागणार आहे. छोट्या छोट्या बदलातूनच मोठे चित्र उभे राहू शकते. एकेक ठिपका जोडत तयार केलेल्या रांगोळीप्रमाणे ते समृद्धीकारकही ठरू शकते.
प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागेल
प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागेल

नेपाळची सीमा, हिमालयात सतत होणारे वातावरणीय बदल यामुळे बिहारवरील हवामान बदलाचे संकट यापुढेही वाढतच जाणार आहे. म्हणून शेतीवाडी सोडून कुटुंबासह स्थलांतर करण्याचा पर्याय सोपा असला तरी योग्य नव्हे, हे शेतकऱ्यांना पटवले पाहिजे. अशा वेळी कार्यरत असलेल्या विद्यापीठांसह सर्व संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे महत्त्वाची ठरणार आहे. कारण केवळ पुस्तकी धडे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार नाहीत. प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागणार आहे. छोट्या छोट्या बदलातूनच मोठे चित्र उभे राहू शकते. एकेक ठिपका जोडत तयार केलेल्या रांगोळीप्रमाणे ते समृद्धीकारकही ठरू शकते. सामान्यपणे किनाऱ्यावरील लोक, शेतकरी किंवा ग्रामीण भागातील मजूर हे वातावरण बदलामुळे प्रभावित होणारे पहिले लोक आहे. अनेक वेळा वातावरण बदलाच्या अवाढव्य संकटाशी लढताना हे सामान्य लोक एकटे पडल्याचे चित्र दिसते. अशा तीव्र स्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी नव्या संशोधनांची, संशोधकांची वेगवेगळ्या पातळीवर मदत होताना दिसते. शेतकऱ्यांना वातावरण बदलाच्या लढाईमध्ये मोलाची साथ देणाऱ्या सामाजिक संस्था, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रे यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मी तो माझ्या प्रत्येक लेखामध्ये नक्कीच करतो. वास्तविक त्यांची निर्मिती हीच मुळी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ असते. या साऱ्या संस्थांना केंद्र व राज्य शासनाची मदत होत असते. मात्र शासकीय योजना आणि निधी यांच्या साऱ्या नाड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात असतात. त्यांची साधारणपणे नियमावलीवर बोट ठेवून काम करायची सवय असते. यामुळे योजना चांगली असली तरी प्रत्येक लाभार्थींपर्यंत पोहोचण्यात अधिकच अडचणी येतात. बिहारमधील कृषी शिक्षणाचा दर्जा वरचा आहे, म्हणूनच बिहार राज्य हवामान बदलाच्या विविध आघाड्यांवर शेतकऱ्यांना आत्मविश्‍वास देण्याचे काम करत आहे. मला या ठिकाणी डॉ. राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाचा उल्लेख करावासा वाटतो. समस्तीपूर येथील हे विद्यापीठ भारतामधील सर्वांत जुने असून, व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी १ एप्रिल, १९०५ मध्ये याची इंपिरियल कृषी संस्था’ म्हणून स्थापना केली. भारतीय कृषी संशोधनाची बीजे सर्वप्रथम इथे रुजवली गेली. १९३४ मधील बिहारमधील मोठ्या भूकंपामुळे भव्य इमारतीला मोठे तडे गेल्यामुळे तिचे दिल्लीमधील ‘पुसा’ या ठिकाणी स्थलांतर केले गेले. आजची भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) म्हणजेच ही बिहारची स्थलांतरित इंपिरिअल कृषी शिक्षण संस्था होय. पुढे बिहार शासनाने याच समस्तीपूरच्या जागेवर १९७० मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाची स्थापना केली. भारत सरकारने यास २०१६ मध्ये केंद्रीय विद्यापीठाचा उच्चतम दर्जा दिला. हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी अनेक उपयुक्त वाण या विद्यापीठांमधील कृषी शास्त्रज्ञांनी तयार केले, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मखवानाचे अधिक उत्पादनक्षम वाणसुद्धा त्यांनी तयार केले. या विद्यापीठात दर आठवड्यास शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण होते. अनेक वेळा स्वत: कुलगुरू उपस्थित असतात. जेव्हा हे प्राध्यापक छातीएवढ्या पाण्यात मखवाना शेतीमध्ये उतरलेले मी पाहिले, तेव्हा माझी खात्री पटली. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) यशस्वी होणाऱ्या बिहारी तरुणांमध्ये या कृषी विद्यापीठाची आघाडी आहे. या विद्यापीठाचे सर्वांत उपयुक्त काम हे त्यांच्या वन विभागात चालते. हवामान बदलास सामोरे जाताना प्रत्येक राज्याकडे-राष्ट्राकडे वनश्रीमंती ही हवीच. बिहारचे वनक्षेत्र जेमतेम ८ टक्केच आहे. त्यातच वृक्ष किंवा फळबाग शेतीही फारशी नाही. या विद्यापीठाने या क्षेत्रात हजारो शेतकऱ्यांना खेचले आहे. त्यातून शाश्‍वत उत्पन्नाची वाटा तयार केल्या आहेत.

  • याचमुळे लिची उत्पादनात आज हे राज्य आघाडीवर गेले. दक्षिण बिहारमधील क्षारयुक्त नापीक जमीन पुन्हा वहिवाटीसाठी आणण्याच्या उद्देशाने वनशेतीच प्रयोग व संशोधन निश्‍चितच उच्च दर्जाचे आहे.
  • शेतकऱ्यांना अशा जमिनीवर ‘पॉपलार’ वृक्षशेती करण्यास प्रोत्साहन दिले. वेगाने सरळ वाढणारा हा वृक्ष बहुउपयोगी आणि पूर संरक्षकसुद्धा आहे. लाकूड उच्च दर्जाचे असून, साधारणपणे ९ व्या वर्षी उत्पादन हाती येते. त्यातही शेतात एक वर्षाची पॉपलर रोपे लावण्याचे आणि त्यातही मका, गहू, हळद अशी आंतरपिके सतत ४ वर्षांपर्यंत घेण्याचे तंत्र बसवले आहे. या आंतरपीक तंत्रामुळे उत्पादनात ४० टक्के वाढ होते. ९ वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न सर्व खर्च वजा जाता दुप्पट होते.
  • बिहारच्या दुष्काळी भागात आवळा शेतीही हळद, आले, आलुकंद, याम या आंतरपिकांसह मोठ्या प्रमाणावर केली जाते.
  • मी लहानपणी पाहिलेली बाभूळ, तिची पिवळी फुले, शेंगा, डिंक आता आपल्याकडे कुठेही दिसत नाही. बिहारमध्ये याची चक्क शेती केली जाते. यामध्ये गवत, चारा पिकांचे विविध वाण आंतरपीक म्हणून घेतले जातात.
  • लिलीया वृक्षाची शेतीही येथे हळद या आंतरपिकासह घेतली जाते.
  • या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मधुबनी जिल्ह्यामधील एका गावात ‘सुखेत’ हा प्रकल्प २०१४ पासून राबवला आहे. यामध्ये विद्यापीठातर्फे प्रत्येक घराघरामधून ओला कचरा गोळा करून, त्यापासून उत्कृष्ट खत तयार केले जाते. त्या खताची विक्री होते. या बदल्यात विद्यापीठ प्रत्येक शेतकरी कुटुंबास एक गॅस सिलिंडर दोन महिन्यांमधून एकदा देते. विद्यापीठाचे वाहन कचरा गोळा करण्याचे काम करते. यामधून गावामधील १२ युवकांना रोजगार मिळाला आहे. वातावरण बदलास चोख उत्तर देणारे हे विद्यापीठाचे प्रारूप आता अनेक गावांमध्ये राबविण्यात येत आहे.
  • बिहारमध्ये २०१० मध्ये भागलपूर येथे बिहार कृषी विद्यापीठाची स्थापना केली गेली. तिथेही संशोधन आणि कृषी विस्ताराचे काम असेच उच्च दर्जाचे आहे. दहा कृषी महाविद्यालये या राज्यात कार्यरत आहेत. बिहारमधील या दोन विद्यापीठांतर्गत ३९ कृषी विज्ञान केंद्रेही कृषी विस्ताराचे मोलाचे काम करत आहेत. महिला शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी अनेक यशोगाथा तयार केल्या आहेत.
  • जामुई जिल्ह्यामधील ‘केडिया’ गाव ही अशीच एका कृषी विज्ञान केंद्राची यशोगाथा आहे. ते ‘परिसंस्था आणि कृषी’ यांचे सुंदर प्रारूप आहे. या लहान गावात तब्बल २८२ गांडूळ खत प्रकल्प आणि ११ बायोगॅस आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे त्यांचा अद्ययावत गोठा आहे. तेथील शेण, मूत्र, गांडूळ खत आणि बायोगॅस प्रकल्पाकडे वळविले जाते. गोमूत्राच्या वापरातून ‘अमृत पाणी’ तयार करून शेतीसाठी वापरले जाते. गावात प्रत्येकाकडे जैविक शौचालय आहे. थोडक्यात, या गावात स्वत:चे सेंद्रिय खत, आणि जैविक कीटकनाशक आहे. शेतीचा खर्च किमान पातळीवर राखला जातो. आज ‘केडिया’ गावची फळे, भाजीपाला मुंबई, दिल्ली, बंगलोर पर्यंत “फूड फॉर लाइफ” या अंतर्गत पाठवली जातात. ५ जून, २०१६ या पर्यावरण दिवशी या यशोगाथेचा जागतिक स्तरावर गौरव झाला होता.
  • बेगुसराई येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी तरुणांचे शहराकडील स्थलांतर रोखण्यासाठी फळशेतीसाठी प्रोत्साहन दिले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पपईची शेती केली जाते. विद्यापीठाने विकसित केलेल्या पपईची झाडे उंचीला कमी आणि त्यांना लागलेल्या पपया अनेक वेळा जमिनीलगत असतात. महेंद्र प्रसाद वर्मा या शेतकऱ्याने पुढाकार घेतला होता.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com