नेपाळची सीमा, हिमालयात सतत होणारे वातावरणीय बदल यामुळे बिहारवरील हवामान बदलाचे संकट यापुढेही वाढतच जाणार आहे. म्हणून शेतीवाडी सोडून कुटुंबासह स्थलांतर करण्याचा पर्याय सोपा असला तरी योग्य नव्हे, हे शेतकऱ्यांना पटवले पाहिजे. अशा वेळी कार्यरत असलेल्या विद्यापीठांसह सर्व संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे महत्त्वाची ठरणार आहे. कारण केवळ पुस्तकी धडे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार नाहीत. प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागणार आहे. छोट्या छोट्या बदलातूनच मोठे चित्र उभे राहू शकते. एकेक ठिपका जोडत तयार केलेल्या रांगोळीप्रमाणे ते समृद्धीकारकही ठरू शकते. सामान्यपणे किनाऱ्यावरील लोक, शेतकरी किंवा ग्रामीण भागातील मजूर हे वातावरण बदलामुळे प्रभावित होणारे पहिले लोक आहे. अनेक वेळा वातावरण बदलाच्या अवाढव्य संकटाशी लढताना हे सामान्य लोक एकटे पडल्याचे चित्र दिसते. अशा तीव्र स्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी नव्या संशोधनांची, संशोधकांची वेगवेगळ्या पातळीवर मदत होताना दिसते. शेतकऱ्यांना वातावरण बदलाच्या लढाईमध्ये मोलाची साथ देणाऱ्या सामाजिक संस्था, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रे यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मी तो माझ्या प्रत्येक लेखामध्ये नक्कीच करतो. वास्तविक त्यांची निर्मिती हीच मुळी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ असते. या साऱ्या संस्थांना केंद्र व राज्य शासनाची मदत होत असते. मात्र शासकीय योजना आणि निधी यांच्या साऱ्या नाड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात असतात. त्यांची साधारणपणे नियमावलीवर बोट ठेवून काम करायची सवय असते. यामुळे योजना चांगली असली तरी प्रत्येक लाभार्थींपर्यंत पोहोचण्यात अधिकच अडचणी येतात. बिहारमधील कृषी शिक्षणाचा दर्जा वरचा आहे, म्हणूनच बिहार राज्य हवामान बदलाच्या विविध आघाड्यांवर शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्याचे काम करत आहे. मला या ठिकाणी डॉ. राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाचा उल्लेख करावासा वाटतो. समस्तीपूर येथील हे विद्यापीठ भारतामधील सर्वांत जुने असून, व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी १ एप्रिल, १९०५ मध्ये याची इंपिरियल कृषी संस्था’ म्हणून स्थापना केली. भारतीय कृषी संशोधनाची बीजे सर्वप्रथम इथे रुजवली गेली. १९३४ मधील बिहारमधील मोठ्या भूकंपामुळे भव्य इमारतीला मोठे तडे गेल्यामुळे तिचे दिल्लीमधील ‘पुसा’ या ठिकाणी स्थलांतर केले गेले. आजची भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) म्हणजेच ही बिहारची स्थलांतरित इंपिरिअल कृषी शिक्षण संस्था होय. पुढे बिहार शासनाने याच समस्तीपूरच्या जागेवर १९७० मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाची स्थापना केली. भारत सरकारने यास २०१६ मध्ये केंद्रीय विद्यापीठाचा उच्चतम दर्जा दिला. हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी अनेक उपयुक्त वाण या विद्यापीठांमधील कृषी शास्त्रज्ञांनी तयार केले, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मखवानाचे अधिक उत्पादनक्षम वाणसुद्धा त्यांनी तयार केले. या विद्यापीठात दर आठवड्यास शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण होते. अनेक वेळा स्वत: कुलगुरू उपस्थित असतात. जेव्हा हे प्राध्यापक छातीएवढ्या पाण्यात मखवाना शेतीमध्ये उतरलेले मी पाहिले, तेव्हा माझी खात्री पटली. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) यशस्वी होणाऱ्या बिहारी तरुणांमध्ये या कृषी विद्यापीठाची आघाडी आहे. या विद्यापीठाचे सर्वांत उपयुक्त काम हे त्यांच्या वन विभागात चालते. हवामान बदलास सामोरे जाताना प्रत्येक राज्याकडे-राष्ट्राकडे वनश्रीमंती ही हवीच. बिहारचे वनक्षेत्र जेमतेम ८ टक्केच आहे. त्यातच वृक्ष किंवा फळबाग शेतीही फारशी नाही. या विद्यापीठाने या क्षेत्रात हजारो शेतकऱ्यांना खेचले आहे. त्यातून शाश्वत उत्पन्नाची वाटा तयार केल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.