कृषी सल्ला : भात, नागली, नारळ, सुपारी, भाजीपाला

कृषी सल्ला
कृषी सल्ला

भात अवस्था - रोपवाटिका

  • भात क्षेत्रातील बांधाची बांधबंदिस्ती करावी. बांध तणमुक्त ठेवावेत.
  • मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता भात खाचरातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
  • लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत भात खाचरात पाण्याची पातळी २.५ ते ५ सें.मी. पर्यंत ठेवावी. त्यामुळे तण प्रादुर्भाव कमी होईल.
  • भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. चिखलणीच्या वेळेस हेक्टरी ८७ किलो युरिया, ३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खते मिसळावीत. गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळीस गाडल्यास ५० टक्के नत्र खताची (युरिया) मात्रा कमी द्यावी.
  • टीप : चिखलणीच्या वेळी खते देताना पावसाची तीव्रता पाहून खते द्यावी.
  • पुनर्लागवडीसाठी भाताची १२ ते १५ सें.मी. उंचीची पाच ते सहा पाने फुटलेली २० ते २७ दिवसांची रोपे योग्य असतात. यामध्ये हळव्या जातींसाठी २० दिवसांची आणि निमगरव्या आणि गरव्या जातींसाठी २७ ते ३० दिवसांची रोपे योग्य असतात.
  • भात पिकाची पुनर्लागवड १५ X १५ सें.मी.(हळव्या जातींसाठी) किंवा २० X १५ सें.मी.(निमगरव्या व गरव्या जातींसाठी) व अंतरावर करावी. लागवड सरळ आणि उथळ २.५ ते ३.५ सें.मी. खोल करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडामध्ये दोन ते तीन रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे.
  • बांधावरील खेकड्यांचा बंदोबस्त करावा. त्याच्या नियंत्रणासाठी १ किलो शिजलेल्या भातामध्ये ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ७५ ग्रॅम टाकून विषारी अमिष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणपणे १०० गोळ्या तयार करून प्रत्येक बिलाच्या आत तोंडाशी एक गोळी ठेवावी. ते छिद्र बुजवावे, दुसऱ्या दिवशी जी छिद्रे उकरली जातील अशा छिद्रामध्ये परत अमिष वापरावे.
  • नागली अवस्था- रोप

  • मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
  • नागली रोपवाटिकेतील तणांची बेणणी करावी.
  • लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये हलकी नांगरणी करून लावणीपूर्वी प्रतिहेक्टरी ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीत एकसारखे मिसळून घ्यावे.
  • नवीन फळबाग लागवड अवस्था- वाढीची अवस्था पुढील पाचही दिवस वाऱ्याच्या वेगामध्ये वाढ संभवते. त्यामध्ये नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांचा टिकाव धरण्यासाठी काठीचा आधार देणे आवश्यक आहे. नारळ/ सुपारी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नारळ व सुपारी बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. भाजीपाला अवस्था- लागवड भाजीपाला लागवड केलेल्या क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकांना काठीचा आधार द्यावा किंवा मंडपाची व्यवस्था करावी. संपर्क ः ०२३५८ - २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com