प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर

तीव्र वातावरण, ५० अंशांपेक्षा अधिक तापमान, पाण्याची कमतरता अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतही राजस्थानातील शेतकरी पुढे जात आहे. भरडधान्य, कोरडवाहू पिके, झुडूपवर्गीय वृक्ष शेती यातून मार्ग काढला जात आहे. प्रतिकूल निसर्गाशी लढताना निसर्गाच्या आयुधांचा वापर करत अनेक जण येथे आपल्या यशकथा रचत आहेत.
प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर
प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर

गत भागामध्ये आपण राजस्थानची भौगोलिक रचना जाणून घेतली. त्यातून राजस्थानचे पश्‍चिम आणि पूर्व असे दोन भाग पडतात. पश्‍चिम भाग हा थरच्या वाळवंटामुळे पूर्णपणे वालुकामय आहे. या ६० टक्के भागात शेती फारच कमी, मात्र खुरटे काटेरी जंगल जास्त आहे. येथे पाऊसही जेमतेम ३०० मि.मी., त्यामुळे वाहणाऱ्या नद्या वाळवंटातच जिरून जातात. भूगर्भातील पाणीही अल्प आणि खूप खोल गेलेले. मॉन्सूनच्या ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसावरच थोडीफार शेती होते. या तुलनेत पूर्व भाग पाणी, शेती आणि विविध पिकांनी समृद्ध आहे. येथे पश्‍चिमेच्या तुलनेत दुप्पट पाऊस (६०० मि.मी. व अधिक) पडतो. खरेतर वाळवंटात राहण्याची सवय, कडक हिवाळा आणि तेवढाच अतिउष्ण उन्हाळा याची येथील लोकांना सवय आहे. वातावरण बदलाच्या झळा गेल्या दोन, तीन दशकांमध्ये थोड्या थोड्या जाणवू लागल्या असल्या तर सर्वसामान्य शेतकरी मात्र त्यापासून अनभिज्ञ आहेत. ज्यांना हे बदल जाणवले आहेत, असे शेतकरी सावध पावले टाकत आहेत. राज्याने २०१० मध्ये वातावरण बदलाचा अहवाल तयार केला. त्यामधील संभाव्य संकटे आणि भविष्यामधील उपाययोजना याबद्दल शासनाच्या कृषी विज्ञान केंद्रे, सामाजिक संस्था मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. अहवालानुसार ‘थर’च्या विशाल वाळवंटात वादळांची संख्या वाढणार आहे, सोबत पावसाचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे. पडणारा हा पाऊस जमिनीत जास्तीत जास्त कसा मुरवता येईल. त्यातून भूजलाची पातळी वाढवता येईल, यावर भर दिला जात आहे. शेतकऱ्‍यांच्या कार्यशाळा घेतल्या जात असून, नावीन्यपूर्ण प्रयोगांचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारीही शासन दाखवत आहे. १) गावकुसामध्ये ठरावीक आकाराचे खड्डे घेऊन, प्लॅस्टिकचे अस्तर लावून शेतकरी त्यात पावसाचे पाणी साठवतात. २) वातावरण बदलास सामोरे जाण्यासाठी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या भरड धान्यांची शिफारस केली जात आहे. या वाणांचे वैशिष्ट्य म्हणजे ताण सहन करत उत्पादन देण्याची क्षमता होय. यातूनच बाजरीचे पीक राजस्थानात अधिक यशस्वी झाले आहे. कमी पावसात टपोरे दाणे, धान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध होतो. महाराष्ट्रातही हे करणे शक्य ः राजस्थानमध्ये गाव पातळीवर बाजरीचा कडबा खरेदी करून त्यापासून मुरघास केला जातो. शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये पुरवला जातो. परिणामी, शेतकऱ्यांचा पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. राजस्थानमधील दुग्ध उत्पादकांची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. आपल्या महाराष्ट्रातही गाव पातळीवर असे प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. एकाच जागी बांधून पशुपालन करणे, विकतचा चारा, कडबा, पेंड इ. पशुखाद्य यातून खर्चाचे प्रमाण वाढत आहे. सोबतच अशी बांधलेली जनावरांकडून अधिक मिथेन उत्सर्जित होतो. हा मिथेन वातावरण उष्ण करण्यात कारणीभूत ठरतो. म्हणूनच शेताला मजबूत बांध आणि त्यावर जनावरांना चरण्यासाठी गवत वाढविलेले असावे. अगदी अल्पभूधारक शेतकरीही आपल्या चार पाच गुंठ्यामध्ये बाजरीसारखी ताण सहनशील पिके घेऊ शकतो. या पिकाचे अवशेष म्हणजेच चारा गाव पातळीवर एखाद्या गटाला मुरघास करण्यासाठी देता येईल. त्याचा फायदा गावातील दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. राजस्थानमधील शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मार्ग काढला. एकापेक्षा एक यशकथा निर्माण केल्या आहेत. निसर्गाचीच आयुधे ठरली महत्त्वाची भारत पाकिस्तान सीमेपासून १५० कि.मी. आत जैसलमेर जिल्ह्यामधील चंदनगावचा रहिवासी असलेला रघुवीर सिंग. चारही दिशांना वाळवंट, जेमतेम १६० मि.मी. पाऊस, सातत्याने येणारी वाळूची वादळे, तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत. अशा प्रतिकूल वातावरणात हा शेतकरी भूगर्भामधील अल्पशा पाण्यावर बडीशेप, मोहरी आणि भुईमुगाचे उत्पादन घेत असे. पाणी कमी म्हणून उत्पादन, उत्पन्न कमी. कुणास विचारायला जावे, सर्वांची जवळपास हीच स्थिती. उलट “यापुढे शेतीत काहीच अर्थ नाही, स्थलांतर हाच मार्ग आहे” असा नकारात्मक सल्ला मिळे. मात्र २०१६ मध्ये रघुवीर सिंग यांनी बारमेर जिल्ह्यामधील बालोट्रा गावात डाळिंब बागा पाहिल्या. आपण हे नवे पीक का घेऊ नये, या विचाराने काम सुरू केले. वाळवंटात डाळिंबाची शेती करण्याच्या कल्पनेलाच अन्य शेतकरी हसू लागले. अनेकांनी त्याला वेड्यात काढले. रघुवीर सिंग यांनी हार मानली नाही. त्यांनी डाळिंब शेतीचा अभ्यास केला. अगदी महाराष्ट्रामध्ये जात विविध डाळिंब बागांना भेटी दिल्या. येथील एका बागायतदाराकडून रोपे घेतानाच मी पहिल्यांदाच लागवड करतोय, मला मार्गदर्शन करा अशी विनंती केली. त्याची हमी मिळताच सुरुवातीस ४००० रोपे शेतात लावली. संपूर्ण बागेस मल्चिंग केले. ठिबक करून पाण्याचा कमीत कमी आणि कार्यक्षम वापर सुरू केला. वाळूची वादळे येणाऱ्या दिशेला आडवी नीम, देव बाभूळ यांची लागवड केली. परिणामी, वाळूच्या वादळापासून डाळिंब बागेचे रक्षण झाले. प्रयत्न, नवीन काहीतरी करण्याची जिद्द यातून वातावरण बदलास सडेतोड उत्तर दिले आहे. आज त्यांच्या एकूण ८५ एकर शेतीपैकी ३५ एकरांवर डाळिंब, ५० एकरांवर कापूस आहे. ९००० डाळिंबाची बाग फुललेली आहे. २०२० मध्ये त्यांच्या बागेत डाळिंबाची पहिली तोडणी झाली. त्यातून त्यांना ११ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता साडेसात लाख रुपये निव्वळ नफा होता. कापसाचे उत्पादनही ३०० क्विंटल झाले. त्यातून ७ लाख रु. मिळाले. राजस्थानच्या वाळवंटात लहान मोठ्या झुडूप वर्गामधील वृक्षच जास्त टिकाव धरू शकतात, या शास्त्रीय अभ्यासावर या शेतकऱ्याने आपली यशकथा लिहिली. रघुवीर सिंग याच्याकडून आपण काय शिकायचे? परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हार मानावयाची नाही. शेतीत सातत्याने नवीन प्रयोग करत राहायचे. त्याच त्या चक्रात अडकून पडावयाचे नाही. पिकातील योग्य त्या तज्ज्ञांचा, अनुभवी व्यक्तींचा सल्ला, मार्गदर्शन घ्यायचे. प्रतिकूल निसर्ग किंवा संकटाला सामोरे जाताना त्याच्याच आयुधांचा वापर करावयाचा. नीट अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्‍वास यातून आपल्या महाराष्ट्रातही असे कितीतरी रघुवीर सिंग तयार होऊ शकतात. आपल्या शेतकऱ्यात ती क्षमता नक्कीच आहे. ------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com