आ ले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे निवड, बीजप्रकिया व पाणी व्यवस्थापन या बाबींचे योग्य शास्त्रीय पूर्वनियोजन केल्यास आले पिकाचे उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेता येते.
पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम भारी प्रकारची जमीन असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ दरम्यान, भुसभुशीत आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ ते १ टक्का एवढे असल्यास उत्तम समजावी. पाणथळ, क्षारपड व चोपण जमीन आले पिकासाठी निवडू नये. चुनखडीचे प्रमाण ४% पेक्षा जास्त असणारी जमीन आले पिकासाठी अयोग्य असते. यात आले पिवळे पडून वाढ खुंटते. अशा जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी जुन्या बंधाऱ्यातील गाळ वापरावा. गेल्या ३ ते ४ वर्षांत आले किंवा हळद लागवड न केलेल्या जमिनीची निवड करावी. गेल्या हंगामात हरभरा, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य यांसारखी द्विदल वर्गीय पिके घेतलेली असल्यास आले पिकाची वाढ जोमदार होते. गेल्या हंगामात ऊस, गहू, ज्वारी, मका यांसारखी एकदल वर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत आले लागवड केल्यास आले पिकाची वाढ मध्यम होते. अशा जमिनीत आले लागवडपूर्व एक ते दीड महिना आधी ताग, धैंचा, चवळी यांसारखी हिरवळीचे खतपिके घेऊन गाडून टाकावीत. अथवा सेंद्रिय खतांची मात्रा वाढवावी. जमिनीची खोल नांगरट शक्यतो सकाळी करावी. या वेळी पक्ष्यांचे प्रमाण अधिक असून, नांगरटीदरम्यान बाहेर पडणाऱ्या हुमणी व हानिकारक किडींच्या विविध अवस्थांचा ते फडशा पडतात. नांगरटीनंतर १५ दिवस शेत तापू द्यावे. नंतर एकरी १० ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत वापरून कुळवाच्या उभ्या आडव्या दोन पाळ्या द्याव्यात. पुन्हा शेत २१ ते ३० दिवस उन्हात तापू द्यावे. लागवडीपूर्वी एक आठवडाभर आधी रोटॅव्हेटरने रान भुसभुशीत करून ४ फूट अंतरावर गादीवाफे ट्रॅक्टरच्या साह्याने तयार करावेत. गादीवाफ्याची तळाची रुंदी ४ फूट, माथा रुंदी ३.५ फूट व उंची १ फूट करून घ्यावी. त्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार १५० ते २०० फूट ठेवावी. सिंचन ठिबक किंवा सुक्ष्म तुषार पद्धतीने करणे सोपे होते. लागवडीपूर्वीच १ ते २ दिवस आगोदर गादी वाफे किंवा दाताळ्याने एक फूट उंचीचे करून सावरून घ्यावेत. म्हणजे जादा पावसात पाणी साचून कंद कुज होत नाही. तसेच कंद चांगले पोसतात. गादीवाफे सावरतानाच एकरी चांगले कुजलेले १ टन सेंद्रियखत किंवा गांडूळखत, २०० किलो निंबोळी पेंड वापरावे. कच्चे शेणखत गादीवाफ्यावर अजिबात वापरू नये. माती परीक्षणानुसार खताचे प्रमाण ठरवावे. हेक्टरी १२०:७५:७५ किलो अशी शिफारस असून, खतांची ५० टक्के मात्रा लागवडीवेळी, तर उर्वरित अर्धी मात्रा अडीच ते तीन महिन्यांनी मातीच्या भरणीवेळी द्यावी. नत्राची मात्रा उगवणीनंतर २ ते ३ समान हप्त्यात विभागून द्यावी. माती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचन संचातून द्यावी. केरळ राज्यातील कालिकत येथील भारतीय मसाला पीक संशोधन केंद्राने आले पिकाच्या अधिक उत्पादनक्षम अशा काही जाती विकसित केल्या आहेत. आपल्या भागात चांगली वाढणारी जात निवडवावी. ताजे आले विक्रीसाठी - यास माहिम किंवा सातारी, औरंगाबाद, छत्तीसगड, गोध्रा, उदयपुरी या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या वाणांची लागवड करावी. आले प्रकियाची असल्यास - वरदा, सुप्रभा, वायनाड, रिओ -डी- जानेरो, जमैका, मारण या सारख्या कमी तंतुमय व मांसल वाणाची लागवड करावी. मागील वर्षी कंदकुज, कंदमाशीचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील आले वेगळे काढून त्याचा बियाणे म्हणून वापर करावा. बियाणे म्हणून आले निवडताना पीक सुप्तावस्थेत असताना म्हणजेच साधारणत: १ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान पाने पूर्णपणे गळून गेलेली असताना व सुप्तावस्थेनंतर अंकुरण न झालेल्या क्षेत्रामधीलच आले बियाणे म्हणून निवड करावी. : अंकुश सोनावले, ९४२०४८६५८७ (कृषी सहायक, नागठाणे, ता. जि. सातारा)