द्राक्ष बागेत फळछाटणी काळातील अडचणी अन् उपाययोजना

सद्यपरिस्थितीत बागेतील वातावरण प्रत्येक ठिकाणी खराब होत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे सतत होणारा पाऊस व ढगाळ वातावरण. अशा स्थितीत फळछाटणी घेणे महत्त्वाचे असले तरी येणाऱ्या अडचणींचा विचार करून उपाययोजनाही केल्या पाहिजेत.
फळछाटणी काळातील अडचणी अन् उपाययोजना
फळछाटणी काळातील अडचणी अन् उपाययोजना

द्राक्ष बागेत फळछाटणीसाठी हा महत्त्वाचा कालावधी आहे. साधारण परिस्थितीत सर्वाधिक क्षेत्रावरील बागेत फळछाटणी ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाते. मात्र हाती आलेल्या काही माहितीनुसार बऱ्याचशा ठिकाणी ही छाटणी लवकर सुरू झाल्याचे समजते. सद्यपरिस्थितीत बागेतील वातावरण प्रत्येक ठिकाणी खराब होत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे सतत होणारा पाऊस व ढगाळ वातावरण. अशा स्थितीत फळछाटणी घेणे महत्त्वाचे असले तरी येणाऱ्या अडचणींचा विचार करून उपाययोजनाही केल्या पाहिजेत. १) फळछाटणी व पाऊस ः बागेत पानगळ झालेली असल्यास डोळे पूर्णपणे फुगणे गरजेचे असते. छाटणीच्या दिवशी जरी पाऊस आला तरी कोणतीही अडचण येणार नाही. या वेळी संजीवकांचा वापर लगेच न करता दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी केला तरी त्याचा फायदा होईल. साधारणतः फळछाटणीच्या दिवशी हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग टाळून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करावे. छाटणीच्या दिवशी पानगळ पूर्ण झालेली असते किंवा उरलेली पाने आपण काढून टाकलेली असतात. त्यानंतर काडीचा कापसुद्धा घेतला जातो. अशा वेळी काडीतून पाणी निघायला सुरुवात होते. म्हणजेच काही अंशी अन्नद्रव्यांचा प्रवाह काप घेतलेल्या टोकाकडे असतो. दुसऱ्या दिवशीपर्यंत काडीतून पाणी येणे बंद होते. म्हणजेच उरलेला सर्व दाब डोळ्यावर येतो. त्यानंतरच डोळा फुगलेला नसला तरी सुद्धा लवकर फुगतो किंवा त्या डोळ्याच्या टोकापर्यंत अन्नद्रव्याचा पुरवठा होत असल्यामुळे डोळ्यावरील आवरण अशक्त होण्यास सुरुवात होते. या वेळी वापरण्यात आलेले रसायन (हायड्रोजन सायनामाइड) चांगले काम करते. फळछाटणीच्या वेळी पाऊस आल्यास अडचणी येत नाहीत. मात्र पुढील काळात जर पाऊस सुरू असेल, तर वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीत वेगाने बदल होऊन अडचणी येऊ शकतात. त्यापैकी महत्त्वाची अडचण म्हणजे गोळी घड निघणे किंवा घड जिरण्याची समस्या होय. फळछाटणीच्या वेळी काडी परिपक्वता झालेली नसल्यास फळछाटणी पुढे ढकलावी. हे पडताळून पाहण्याकरिता आपण काडीच्या ज्या डोळ्यावर छाटणी घेणार, त्याच्या दोन ते तीन डोळे पुढे कात्रीने काप घ्यावा व त्यातील पीथ कसा आहे, हे पाहावे. त्यानुसार पुढील निर्णय घ्यावा. या पीथचा रंग जर दुधाळ असल्यास काडीची परिपक्वता झालेली नाही. अशा वेळी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

  •  वेलीला पाण्याचा ताण देणे.
  •  शेंडा पिचिंग करणे.
  •  बगलफुटी काढणे.
  •  ०-०-५० हे खत पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ०-९-४६ हे खत तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन फवारण्या तीन ते चार दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
  •  ०-९-४६ हे खत तीन किलो प्रति एकर या प्रमाणे ३ दिवस (एक दिवसाआड) द्यावे.
  • २) ढगाळ वातावरण आणि घड जिरण्याची समस्या फळछाटणीनंतर बागेमध्ये ९ ते १० दिवसांत पोंगा अवस्था येते. पानगळ किती झाली आहे व वेलीस पाण्याचा ताण किती बसला आहे, यानुसार पोंगा अवस्था मागेपुढे होईल. बागेत जर या परिस्थितीत ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस पडून मुळांच्या कक्षेत जास्त प्रमाणात पाणी साचले असेल, अशा स्थितीत वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचे संतुलन बिघडते. या वेळी मुळे जास्त कार्यरत झालेली दिसून येतात. याचाच अर्थ जमिनीतून अन्नद्रव्य व पाणी वेलीच्या फुटीच्या टोकापर्यंत पोहोचेल. त्या सोबत मुळे संजीवकांची निर्मिती करून वर पुरवठा करतील. मुळाकडून झालेला पुरवठा वेलीच्या गरजेपेक्षा जास्त असतो. म्हणूनच वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण जास्त वाढून जोम वाढलेला दिसून येतो. या वेळी पोंगा अवस्थेत जरी आपल्याला वाढ होताना दिसत नसली, तरी जैवरसायनिक प्रक्रियेमध्ये बदल झालेले दिसतात. अशा वेळी बागेतील मुळांच्या कक्षेत हवा खेळती राहून मोकळे वातावरण राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी फळछाटणीपूर्वीच बोद व्यवस्थित तयार करून दोन ओळींच्या मध्यभागी एक ट्रॅक्टरच्या साह्याने एक चारी घेतल्यास मुळांच्या कक्षेत पाण्याचा निचरा होईल. यासोबत शिफारस केलेल्या सायटोकायनिनयुक्त संजीवकांचा वापरसुद्धा करता येईल. सध्या मुळे कार्यरत आहेत. अशावेळी जमिनीतून पालाशयुक्त खतांचा वापर (०-४०-३७, ०-०-५०, ०-५२-३४, ०-९-४६ इ.) करणे फायद्याचे ठरेल. बरेच बागायतदार फळछाटणीच्या पाचव्या दिवसापासूनच संजीवकांची किंवा अन्नद्रव्याची फवारणी सुरू करतात. या कालावधीत छाटणी केल्यानंतर डोळा अजून कापसलेलाही नसेल, म्हणजेच कडक डोळ्याच्या आवरणातून फवारणीचे द्रावण शोषून घेतले जाणार नाही. जसे खोड, ओलांडा व काडीवर संजीवके किंवा अन्नद्रव्याची फवारणी केल्यास कोणतेही शोषण होणार नाही. स्पर्शजन्य कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी केल्यानंतर वेलीवरील उपलब्ध रोगांचे नियंत्रण होण्यास सोपे होईल. संजीवकांचा पुरेपूर फायदा होण्यासाठी वेलीने फवारलेले द्रावण शोषून घेण्याकरिता डोळ्याच्या बाहेर एक ते दोन पान येणे गरजेचे असेल. या पूर्वी संजीवकांची फवारणी केली तरी त्याचे कोणतेही परिणाम मिळालेले नसतील. बागेतील परिस्थितीनुसार फवारणीचा निर्णय घ्यावा. ३) तीन पाने अवस्था व रोगनियंत्रण - फळछाटणीनंतर १२ ते १३ दिवसांच्या कालावधीत ही अवस्था आढळून येईल. यानंतर लगेच द्राक्षघड बाहेर पडलेले दिसतील. आपण प्रत्येक काडीवर चार ते पाच डोळ्यावर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले होते. आता सर्वच डोळ्यांतील फुटी बाहेर निघाल्या असतील. या वेळी एका काडीवर १४ -१५ पाने असतील. या वेळी छोटी कॅनॉपी तयार झाली. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे, अशा स्थितीत डाऊनी मिल्ड्यू किंवा करपा या रोगाचे बीजाणू वाढण्यासाठी पोषक असे वातावरण तयार आहे. निर्यातीकरिता व्यवस्थापन करत असलेल्या बागेत सुरुवातीपासूनच रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅन डोळ्यासमोर ठेवून कार्यवाही करावी. शिफारशीप्रमाणे सुरुवातीच्या याच काळात फक्त आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करून रोग नियंत्रणात आणावा. वातावरणातील या संधीचा फायदा जैविक घटक उदा. ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनोस इ.चा वापर करण्यावर जोर द्यावा. वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे जैविक घटक वाढण्यास मदत होते. ४) सोर्स ः सिंक गुणोत्तर आणि घडाचा विकास आपल्याकडे फळछाटणीनंतर वेगवेगळ्या अवस्था दिसून येतील. काही ठिकाणी पोंगा अवस्था असेल, तर काडी ठिकाणी घड बाहेर निघाला असेल किंवा प्रीब्लूम अवस्थेत घड दिसून येईल. घडाच्या विकास होण्याच्या दृष्टीने घडांची संख्या मर्यादित असणे गरजेचे असेल. यावेळी वेलीच्या प्रत्येक भाग सोर्स आणि सिंक म्हणून कार्य करतो. उदा. फुटत असलेला डोळा हा सिंक, तर दोन डोळ्याचा पेरा हे सोर्स म्हणून कार्य करते. प्रीब्लुम अवस्थेतील घड सिंक, तर त्या घडाच्या शेजारी असलेली पाने सोर्स म्हणून कार्य करतात. हे पान माचिसच्या आकाराचे झाल्यानंतर प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करण्यास सक्षम होते. त्या पूर्वी हे पानसुद्धा सिंक म्हणून कार्य करते. तेव्हा बागेत सोर्स मजबूत करण्याची काळजी घ्यावी. सोर्स आणि सिंकचा समतोल असल्यास निर्यातक्षम द्राक्षे उत्पादन फार सोपे होते. यासाठी घडाची संख्या व काडीवर उपलब्ध पानांची संख्या याचा ताळमेळ बसवणे गरजेचे असेल. काडीवर घडाच्या पुढे दहा ते बारा पाने (प्रत्येक पानांचे क्षेत्रफळ १६० ते १७० वर्ग सें.मी.) असावीत. यापेक्षा अधिक पाने सिंकचेच काम करतील. त्यामुळे ही अनावश्यक पाने त्वरित काढून घ्यावीत. घडाची संख्याही अशाच प्रकारे नियंत्रणात ठेवावीत. उदा. काडीची जाडी, बागेचा उद्देश (निर्यात, स्थानिक बाजार किंवा बेदाणा). त्यापेक्षा अधिक घड काढून टाकावेत. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com